
गंगापूर धरण क्षेत्रात पावसाचे प्रमाण जास्त असल्याने नद्या, नाले दुथडी भरुन वाहत आहे. आज दुपारपासून धरणातून ६,१६० क्युसेक वेगाने धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवला आहे . यापूर्वी धरणातून ४ हजार क्यूसेक विसर्ग सुरू होता. धरण क्षेत्रात पावसाचा जोर वाढल्यास पाण्याचा विसर्ग आणखी वाढवण्यात येईल, अशी माहिती धरण प्रशासनाकडून देण्यात आली आहे. नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशाराही देण्यात आला आहे .
गोदावरी नदीची पाणी पातळी वाढली
गंगापूर धरणातून मोठ्या प्रमानात होणाऱ्या विसर्गामुळे गोदावरी नदीच्या पाणीपातळीत मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे, रामकुंड परिसरातील पूल आणि छोटी-मोठी मंदिरे पाण्याखाली गेली आहेत. दुतोंड्या मारुतीच्या गुडघ्यापर्यंत पाणी आले आहे. गोदावरी नदीला पुराचा संभाव्य धोका लक्षात घेता, प्रशासनाकडून नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. स्थानिक आपत्कालीन यंत्रणाही सतर्क ठेवण्यात आल्या आहे.
पेरणीची कामे खोळंबली
ऐन मे महिन्यात शेतीच्या मशागतीच्या वेळी पावसाने हजेरी लावली , मे महिन्यापूर्वी होणारी शेतीची मशागतीची कामे आणि पेरण्या पावसामुळे खोळंबल्या आहेत . शेतीची कामे रखडल्याने आता शेतकरी वर्गात चिंतेचे वातावरण आहे . पावसाने दमदार हजेरी लावल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होण्याची शक्यता आहे . टोमॅटो लागवड व इतर धान्य उत्पादनासाठीच्या कोलमडलेल्या नियोजनातून सावरण्याच्या प्रयत्न शेतकरी करत आहे .