
कथा : प्रा. देवबा पाटील
आता रोजच शाळेच्या मधल्या सुट्टीत आदित्य, त्याचे मित्र व सुभाष यांची डबे खाता खाता सूर्याबद्दल चर्चा
रंगू लागली.
“बरे मग सूर्याजवळ प्रकाश कसा काय निर्माण झाला?” मोन्टूनेच पुन्हा विचारले.
“त्याचे असे आहे मित्रांनो, सूर्याजवळ अतिशय भयंकर उष्णता आहे आणि प्रकाश तर उष्णतेपासूनच निर्माण होत असतो. म्हणूनच सूर्याला स्वत:चा प्रकाश आहे म्हणजे तो स्वयंप्रकाशी वा स्वप्रकाशी आहे. विशेष म्हणजे सूर्याचा मुख्य घटक हायड्रोजन हा वायू आहे. सूर्याच्या भयंकर उष्णतेमुळे हायड्रोजनचे कण अत्यंत वेगाने फिरतात, एकमेकांवर जोरजोराने आपटतात व तेथे त्यांची आपापसात रासायनिक प्रक्रिया
घडून ते हेलियम वायूमध्ये रूपांतरित होतात. ही रासायनिक प्रक्रिया होत असताना तेथे खूपच उष्णता निर्माण होते व त्यामुळे ही प्रक्रिया अजून वाढत जाते नि आणखी जास्त हायड्रोजनचे हेलियममध्ये रूपांतर होते. असे हे चक्र सदोदित अखंड चालूच राहते. त्यामुळे सूर्यामध्ये सदैव उष्णता निर्माण होत असते. त्याच महाभयंकर उष्णतेतून प्रचंड प्रकाश निर्माण होतो. तीच उष्णता व तोच प्रकाश सूर्य बाहेर फेकत असतो आणि तीच उष्णता व तोच प्रकाश सूर्यमालेतील सर्व ग्रहांना नि आपल्या पृथ्वीला व पर्यायाने आपणा सर्वांनाही मिळत असतो.” सुभाषने सांगितले.
“सूर्याजवळ एवढा प्रकाश असूनही तो रात्री का तळपत नाही मग?” अंतूने प्रश्न टाकला.
“तसे पाहता प्रत्यक्षात सूर्य हा रात्रंदिवस प्रखर तेजाने सतत तळपतच असतो. आपला सूर्य आज रोजी ५ अब्ज वर्षांचा झाला असून त्याचे अपेक्षित आयुष्यमान १० अब्ज वर्षांचे आहे. म्हणजे तो ५ अब्ज वर्षांपासून तळपत असून भविष्यातही तेवढीच वर्षे तळपत राहील, असा शास्त्रज्ञांचा अंदाज आहे. मात्र रात्री तो आपणास दिसत नाही त्याचे कारण असे आहे की, आपली पृथ्वी स्वत:भोवती २४ तासांत एक प्रदक्षिणा पूर्ण करते. या प्रदक्षिणेदरम्यान पृथ्वीचा प्रत्येक भाग हा ठरावीक काळापर्यंतच सूर्यासमोर राहतो व त्या ठरावीक काळानंतर तोच भाग सूर्याच्या विरुद्ध बाजूस जातो. ज्यावेळी सूर्यासमोर जो भाग येतो त्या भागात तळपता सूर्य दिसतो म्हणजेच त्यावेळी त्या भागात दिवस असतो. तोच भाग जेव्हा सूर्याच्या विरुद्ध बाजूला जातो तेव्हा त्यावेळी त्या भागात सूर्य दिसत नाही. त्यावेळी तेथे रात्र होते. रात्री पृथ्वीचा तो भाग सूर्याच्या विरुद्ध बाजूस असतो म्हणून रात्री सूर्य दिसत नाही.” सुभाषने सांगितले.
“सूर्याचा आकार केवढा आहे मग?” पिंटूने विचारले.
“त्याचा व्यास ८ लक्ष ६५ हजार मैल अर्थात १४ लाख कि.मी. आहे. म्हणजे पृथ्वीच्या व्यासाच्या १०८ पट मोठा आहे. त्याच्या व्यासावर पृथ्वीसारखे १०८ ग्रह एकापुढे एक असे बसू शकतात. त्याचा आकार पृथ्वीच्या १ कोटी ३३ लाख पट मोठा आहे. आपल्या पृथ्वीच्या आकाराएवढे तेरा लाख ग्रहगोल त्यावर बसतील एवढा सूर्य आकाराने प्रचंड मोठा आहे. एवढा मोठा असूनही तो आपल्या आकाशगंगेतील सर्वात लहान तारा आहे. तो आपल्या सर्व ग्रहांना सोबत घेऊन २५० कि.मी. प्रतिसेकंद वेगाने आपल्या आकाशगंगेला प्रदक्षिणा घालत असतोे. तो आकाराने एवढा प्रचंड मोठा असूनही पृथ्वीपासून खूपच दूर असल्यामुळे आपणास केवळ बशीएवढा लहान दिसतो.” सुभाषने खुलासा केला.
“म्हणजे सूर्य हा बशीसारखा
खोल गोल आहे का?” मध्येच पिंटूने शंका विचारली.
“नाही, सूर्य हा बशीसारखा खोलगट गोल किंवा तबकडीप्रमाणे चापटगोल नसून चेंडूसारखा, पण विशेष म्हणजे संत्र्यासारखा गोल आहे.” सुभाष पुढे सांगू लागला, “सूर्यापेक्षाही प्रचंड मोठमोठे तारे या विश्वात आहेत. सूर्याचे वस्तुमान पृथ्वीच्या ३ लाख ३२ हजार १०० पट जास्त आहे. त्याचे गुरुत्वाकर्षण पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणापेक्षा २८ पटींनी जास्त आहे. रोजच्याप्रमाणे त्यांच्या शाळेची मधली सुट्टी संपली व त्यांची
चर्चाही संपली.