निसर्गवाचक हरपला...

  24

प्रसिद्ध निसर्ग अभ्यासक : किरण पुरंदरे


अरण्यऋषी, वन्यजीव अभ्यासक पद्मश्री मारुती चितमपल्ली म्हणजे निसर्गातील ठेवा समाजाला कळावा यासाठी सतत कार्यरत राहणारा सकारात्मक विचारांचा ऊर्जाकोशच. त्यांनी पक्षीकोश, प्राणिकोश आणि मत्स्यकोशाचे लेखन केले. त्यांनी वन्यजीव अभ्यासक म्हणून मोठे कार्य केलेच, त्यासोबत मराठीलादेखील मोठे योगदान दिले. असा प्रसिद्ध पक्षीतज्ज्ञ आणि वृक्ष अभ्यासक आपल्यातून जाणे ही मोठी हानी
म्हणावी लागेल.


मारुतीराव गेले... त्यांनी पक्षी, प्राणी, झाडे, वाळव्या अशा सगळ्या विषयांवरच भरपूर लिहिले. निसर्गातील कोणताही विषय त्यांनी वर्ज्य ठेवला नाही. अनेकांच्या वाचनात बाळपावलांच्या, संस्कारक्षम वयातच मारुतीरावांचे हे लिखाण आल्यामुळे भारावून टाकणारे वातावरण निर्माण झाले, यात शंका नाही. यांच्या लिखाणातून निसर्ग किती मोठा तसेच रंजक आहे, हे अनेकांना समजले. आयुष्यातील खूप मोठा काळ निसर्गाशी रममाण होण्यात, तो समजून घेण्यात घालवलेले आणि अलीकडेच ‌‘पद्मश्री‌’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले ‌‘अरण्यऋषी‌’ मारुती चितमपल्ली यांच्या निधनाची बातमी अस्वस्थ करणारी आहे. असंख्य लोकांना, काही पिढ्यांना निसर्गाचे अक्षरश: वेड लावणारे हे नाव आता काळाच्या उदरात गडप झाले आहे. त्यांनी आपल्या अनुभव संपन्न लिखाणाद्वारे, निरीक्षणांद्वारे लोकांच्या मनात उत्सुकताच निर्माण केली नाही, तर तो किती सुंदर आहे हे दाखवून दिले. हे निसर्गाबरोबरच स्थानिक लोकांशी नाळ जोडणारे व्यक्तिमत्त्व होते. त्यांच्या व्यक्तिमत्त्वातील हे एक वेगळेपण म्हणावे लागेल. बरेचदा लोक स्वतंत्रपणे लिखाण करतात. त्यात त्या व्यक्तीच्या मनोगताला महत्त्वाची जागा असते. पण मारुती चितमपल्ली यांची नाळ निसर्गाबरोबरच स्थानिक वाटाडे, रहिवासी, आदिवासी, मजूर अशा अनेकांशी घट्ट जुळली होती. परिणामस्वरूप त्यांच्या लेखनामध्ये निसर्गातील रमणीयतेबरोबरच त्यांचेही अस्सल संदर्भ आले. ते तपासून पाहणे आदी गोष्टी पुढच्या आहेत. पण मुळात या शैलीमुळे त्यांच्या लेखनामध्ये, कामामध्ये एक प्रकारचा जिवंतपणा आला.


आयुष्यभर निसर्गपूजक राहिलेल्या या व्यक्तीने लिहिलेल्या पुस्तकांमधून आपल्याला अनेक कथा वाचायला मिळतात. लिखाण करत असताना त्यांना भावलेले अनेक नवीन शब्द आपल्या लिखाणात आवर्जून आणले. अर्थात ते शब्द पूर्वी अस्तित्वात नव्हते अशातला भाग नाही. झाडीबोलीमध्ये ते शब्द होतेच. पण मारुतीरावांनी हे शब्द आपल्या लेखनामध्ये आणले आणि सर्वसामान्यांना त्यांचा परिचय घडवला. त्यांनी ईशान्य महाराष्ट्रातील, विदर्भातील निसर्गाचा ठेवा मोठ्या जनसमुदायापर्यंत पोहोचवण्याचे काम इतक्या प्रभावी पद्धतीने केले की, हे करता करता जणू काही तेच या दोहोंमधला सेतू झाले. त्यांची निरीक्षणे अनेकांना अभ्यासास प्रवृत्त करणारी होती. अशा प्रकारे निसर्ग दीर्घकाळ जवळून बघणारा, त्यावर प्रेम करणारा, त्याच्याशी एकरूप होणारा आणि एकेक आविष्कार अनुभवत एक प्रकारे त्याला शरण जाणारा माणूस असेच त्यांचे वर्णन करावे लागेल. एकदा अशी समरसता साधली की, निसर्गदेखील पाठीवर कौतुकाची थाप देतो. हे भाग्य मारुतीरावांना लाभले
होते, असे म्हटल्यास अतिशयोक्ती ठरणार नाही.


मारुतीरावांनी लिखाणामधून आपले अनुभव मांडले. लोकांनी पुस्तकांमधील शब्द वाचले, पण त्याव्यतिरिक्त त्यांनी सांगितलेले सगळ्यांनाच समजले असेल असे नाही. पाडगावकरांनी लिहिल्याप्रमाणे ‌‘शब्दावाचून कळले सारे, शब्दांच्या पलीकडले...‌’ असे बरेच काही त्यांच्या लिखाणात होते. अर्थातच खऱ्या अर्थी निसर्गाशी एकरूप झालेल्यांना, निसर्गाच्या संवेदना समजणाऱ्या लोकांनाच अशा गोष्टी दिसतात, समजतात. संवेदनांचे मीलन झाल्याखेरीज शब्दांपलीकडच्या जागा सापडणे कठीण असते. कारण चितमपल्लींसारखी व्यक्ती लिहिते, एखादी गोष्ट सांगते तेव्हा त्याच्या आत लपलेले बरेच काही शोधून काढणे सामान्य माणसाच्या आवाक्याबाहेरचे आहे, असे वाटते. म्हणूनच कदाचित जी. ए. कुलकर्णी यांनी ‌‘त्यांच्या पावलांना रानवाटांची माहेरओढ आहे‌’ असे म्हटले असावे.


मारुती चितमपल्ली निसर्ग, झाडापानांमध्ये, पशूपक्ष्यांमध्येच रमले. हे रमणे त्यांनी शब्दबद्ध केले. चांगली गोष्ट म्हणजे माझ्यासारख्या अनेकांच्या घडत्या वयामध्ये त्यांचे लेखन वाचायला मिळाले आणि एका वेगळ्या जगाबद्दल जाणून घेण्याची ऊर्मी बळावली. त्यांच्या कथा वाचताना गुंतून पडायला होते. वाचक त्यात अडकतो. त्यांच्या निरीक्षणांना शास्त्राची साथ आहे का, हे वा यासारखे मुद्दे तूर्तास बाजूला ठेवू या. या वादात आता पडायला नको. पण त्यांचे वाचकांपुढे मांडणेदेखील अत्यंत महत्त्वाचे होते कारण तरुण पिढीसमोर अशा प्रकारच्या निरीक्षणांची मांडणी केल्यामुळे समोर एक आव्हान उभे राहिले हे नक्की. त्यातूनच असे खरेच होते का... हे पडताळून बघण्यासाठी अनेकांची पावले निसर्गाकडे वळली. त्यांनी एक प्रकारे अनेकांच्या मेंदूला, विचारांना खुराक पुरवला. मुख्य म्हणजे आपली निरीक्षणे तपासून बघण्यासाठी त्यांनी अनेकांशी पत्रव्यवहारही केला. याविषयी आम्ही दोघेही बोलायचो. उदाहरणार्थ, कावळे कोणत्या झाडाच्या कोणत्या भागात घरटी करतात यावरून एखाद्या वर्षी किती पाऊस पडणार आहे, असा विषय आमच्या चर्चांमध्ये असायचा. जिज्ञासा आणि उत्सुकतेपोटी मारुतीरावांनी पुन्हा पुन्हा असे अनेक विषय हाती घेतले आणि त्यावर अभ्यास केला. चतन केले. अभ्यासक असण्याबरोबरच एक रसिक म्हणून त्यांनी या क्षेत्रात मुशाफिरी केली. त्यामुळेच ते अनेक विषय हाताळू शकले, असे म्हणता येईल.


निसर्गाचा पट खूप मोठा आहे. विशाल आहे. याचे भान राखत त्यांनी पक्षी, प्राणी, झाडे, वाळव्या यांच्यावर लिहिले. आदिवासींवर लिहिले. म्हणजेच निसर्गातील कोणताही विषय त्यांनी वर्ज्य ठेवला नाही. अनेकांच्या वाचनात बाळपावलांच्या, संस्कारक्षम वयातच मारुतरावांचे हे लिखाण आल्यामुळे पोषक वातावरण निर्माण झाले असे वाटते. कारण त्यांच्या लिखाणातून निसर्ग किती मोठा आणि रंजक आहे, हे अनेकांना समजले. भटकंतीला बाहेर पडता, निसर्गात जाता तेव्हा स्थानिक लोकांकडे दुर्लक्ष न करण्याचा विचार त्यांनी सर्वसामान्यांना दिला. या पारंपरिक शहाणपणाकडे त्यांनी जाणीवपूर्वक लक्ष वेधले. त्यांचे हे योगदान अत्यंत महत्त्वाचे वाटते. व्यकंटेश माडगुळकर त्यांच्या लिखाणातून एखादा रामोशी उभा करतात तर गोनीदांना ‌‘माचीवरला बुधा‌’ साद घालतो. अगदी त्याच पद्धतीने मारुतीरावांवर स्थानिकांची भुरळ होती, असे वाटते. या क्षेत्रातील मारुतीरावांच्या योगदानाबद्दल बोलायचे तर असे म्हणता येईल की, त्यांनी लोकांना निसर्गाकडे जाण्याचा संदेश दिला. निसर्गाकडे बघण्याची वेगळी दृष्टी दिली. कारण तिथे गेल्यानंतरच आपल्याला अनेक प्रश्नांची उत्तरे सापडतात, असे त्यांचे म्हणणे होते. माणूस निसर्ग समृद्ध करत नाही तर निसर्ग माणसाला समृद्ध करतो. मारुतीरावांनी आपल्या लेखनातून, कामातून हाच विचार देण्याचा प्रयत्न केला.


निसर्गसाधना करायला शिक, असे त्यांनी मला सांगितले होते. नागझिऱ्यामध्ये साडेचारशे दिवस राहिलो असता ते तेथे आले होते. तेव्हा झालेल्या मनमोकळ्या गप्पांमध्ये ‌‘मला काहीही नको..‌.’ या विचारस्थितीपर्यंत पोहोचणे म्हणजे निसर्गसाधना... हे त्यांचे वाक्य कधीही विसरण्यासारखे नाही. खरे तर याचा अर्थ समजणे अवघड आहे. ते समजून देण्यासाठी मारुतीरावांसारखी ऋषीतुल्य व्यक्तीच लागते. आता त्यांनी आपला निरोप घेतला आहे. पण अशा विचारांच्या माध्यमातून त्यांचे स्मरण सतत राहील. भावपूर्ण श्रद्धांजली!



...आणि प्रत्यक्ष भेट झाली : श्रीकांत इंगळहळीकर, वनस्पती अभ्यासक


चितमपल्ली यांची पुस्तके वाचल्यामुळे, त्यांच्या कामाविषयी जाणत असल्यामुळे थेट भेट झाली नसली तरी त्यांच्याबद्दल मोठी उत्सुकता होती. मात्र पुढे ‌‘आसमंत‌’ या माझ्या पुस्तकाच्या निमित्ताने प्रत्यक्ष भेटीचा योग आला. या पुस्तकात मी जंगलातील अनुभव मांडले होते. यावर मारुतीसरांनी प्रस्तावना लिहावी, आपले पुस्तक वाचावे असे वाटत होते. मी त्यांना पुस्तक पाठवले होते. त्यानुसार ते पुण्यात आले असता प्रत्यक्ष भेटलो आणि प्रस्तावना लिहिण्यासंदर्भात चर्चा झाली. भेटीनंतर मी त्यांना गाडीतून हर्णेला सोडले. कारण त्यावेळी सागरी जलचरांचा अभ्यास करण्यासाठी त्यांचा मुक्काम तिथे होता. ही व्यक्ती जंगल, प्राणी, पक्षीच नव्हे तर, समुद्रातील जीवसृष्टीचाही अभ्यास करते, हे तेव्हा मला समजले. जलचरांची नावे, वैशिष्ट्ये, जीवनपद्धती या सगळ्यांचा अभ्यास करण्यासाठी ते बरेच दिवस हर्णे या गावात राहिले होते. स्वाभाविकच प्रवासात याविषयी गप्पा झाल्याच, खेरीज हर्णेमध्येही मी त्यांच्याबरोबर दोन-तीन दिवस राहिलो. त्यामुळे त्यांचा जवळून परिचय झाला. यानिमित्ताने लक्षात आले की, आवडते काम करण्याची संधी प्रत्येकालाच मिळते असे नाही. पण हाती आलेल्या कामाची आवड उत्पन्न करत त्यात कसे रमता येते याचे दर्शन घडवणारी ही व्यक्ती आहे. त्यांनी कामामध्ये आनंद शोधला आणि कामानिमित्त झालेल्या जंगलातील नियुक्तीला वेगळा आयाम दिला. त्यांनी अनेक गोष्टींची माहिती घेतली आणि आवडलेल्या गोष्टी इतरांपर्यंत पोहोचवल्या. त्यांची ही शैली मला खूप भावते आणि त्याचा प्रभाव जाणवतो. आपल्यापैकी अनेकजण निसर्गात जातात. भवताल बघतात. पण बघताना काही आत्मसात करण्याची, नोंद घेण्याची आणि भावलेले दुसऱ्याशी शेअर करण्याची प्रत्येकाची धारणा असतेच असे नाही. मात्र सरांकडे हा विचार होता. म्हणूनच त्यांनी नोंदवून ठेवलेल्या छोट्या छोट्या गोष्टींमधूनही अनेकांना अभ्यासाचे अनेक विषय मिळाले. अनेकांचे कुतूहल जागृत झाले. निसर्गवाचनातून आपल्याला मिळालेला आनंद त्यांनी लेखन, भाषणे या माध्यमांमधून अनेकांपर्यंत पोहोचवला. अर्थातच यानिमित्ताने त्यांनी वन अधिकारी म्हणून मिळालेल्या संधीचे सोने केले. त्यांच्या लिखाणामुळे अनेकजण जंगलाकडे वळले. जंगल कसे वाचायचे हे आपल्याला समजले. आज जंगल सफारीचे नियोजन करता येते. मात्र पायी जंगल फिरण्याच्या त्या काळात जंगलाचे नियम आत्मसात करण्याचे बाळकडू देणारा हा अरण्यऋषी आता आपल्यातून निघून गेला आहे. त्यांना विनम्र आदरांजली!

Comments
Add Comment

चला जाऊ शाळेला!

मृदुला घोडके परवा माझ्या एका मैत्रिणीला फोन करत होते. २-४ वेळा बेल वाजली पण तिने उचलला नाही... काही मेसेजही नाही...

थोर विचारवंत पांडुरंगशास्त्री आठवले

कोकण आयकॉन : सतीश पाटणकर योगेश्वर कृषी, वृक्षमंदिर, मत्स्यगंधा, घरमंदिर अशा एकापेक्षा एक विलक्षण सामाजिक

आषाढ : मनोकामना पूर्ण करणारा महिना

विशेष : मृणालिनी कुलकर्णी जेव्हा जुलैमध्ये सूर्य कर्क राशीत प्रवेश करतो तेव्हा हिंदू पंचागानुसार आषाढ हा

कृत्रिम बुद्धिमत्ता

ओंजळ : पल्लवी अष्टेकर आजचे जग स्मार्ट झालेय, पण आपणही तितकेच स्मार्ट झालोय का? मोबाइल हातात घेणाऱ्या प्रत्येक

‘इधर तो जल्दी जल्दी हैं...’

नॉस्टॅल्जिया : श्रीनिवास बेलसरे गझल हा काव्यप्रकार लोकप्रिय करण्यात जगजीत सिंग आणि चित्रा सिंग या जोडीचे

आषाढस्य प्रथम दिवसे

(२६ जून कालिदास दिनाच्या निमित्ताने...) विशेष : लता गुठे स्कृत साहित्यातील सर्वोत्कृष्ट काव्यांमध्ये ‘मेघदूत’ हे