Saturday, June 21, 2025

भविष्यातील ढासळती विवाह व्यवस्था...

भविष्यातील ढासळती विवाह व्यवस्था...

आरती बनसोडे : (मानसिक समुपदेशक, मुंबई )


हल्ली काही घटना आपल्या बघण्यात ऐकण्यात येत आहेत की, ज्यामुळे भविष्यातील लग्न व्यवस्थेविषयी चिंता निर्माण झालेली आहे. काही घटनांमध्ये आपल्याला असे निर्दशनास येते की, नवरा बायकोचे भांडण झाल्यामुळे रागात नवऱ्याने बायकोला ठार मारून बाथरूममध्ये तिचा मृतदेह कोंडून ठेवला, तर काही घटनांमध्ये बायकोने हनिमूनला गेल्यानंतर नवऱ्याची सुपारी देऊन त्याचा खून केला. त्याचप्रमाणे अशाही घटना आपल्याला बघायला मिळाल्या की, जिथे संपूर्ण कुटुंबाने महिलेवर अत्याचार करून तिचा जीव घेतला. लग्नाला अवघे ३६ दिवस झालेले असताना नवरा आपल्या मनासारखा नाही हे लक्षात येताच महिलेने त्याच्या जेवणामध्ये विष कालवून त्याला ठार मारले त्याचप्रमाणे अशी एक घटना बघण्यात आली की, जिथे घरगुती किरकोळ वादातून नवऱ्याने बायकोचा जीव घेऊन स्वतःदेखील आत्महत्या केली.


एकंदरीत काय तर समाजामध्ये एक दृष्टिक्षेप टाकल्यास लक्षात येईल की, हल्ली लग्न व्यवस्थाही धोक्यात आलेली आहे. पूर्वी नवरा आणि बायको ही संसाराची दोन चाकं मानली जातं; परंतु हल्लीच्या पिढीला लग्नव्यवस्थेचं महत्त्व आणि गांभीर्य राहिलेलं नाही. पूर्वी एकमेकांच्या मनाची नातेवाइकांची, आपल्या कुटुंबाच्या मनाची काळजी घेत सामाजिक दडपणाखाली येऊन कुटुंब व्यवस्थाही व्यवस्थितपणे टिकत होती. नवरा-बायको दोघेही तडजोड करत ही व्यवस्था अधिकाधिक घट्ट बनवत होते; परंतु हल्लीच्या पिढीमध्ये तडजोड करणे किंवा समोरच्याच्या मनाचा विचार करणे हे कुठेच दिसून येत नाही. स्वार्थ, राग, चिडचिड, मनासारख्या गोष्टी न घडल्यास टोकाची भूमिका घेत दुसऱ्याचा जीव घेण्याइतपत हिंसक विचार हल्ली सगळीकडे पाहावयास मिळत आहे. हे असंच चित्र जर चालू राहिलं, तर भविष्यातील पिढी लग्न करण्यास उत्सुकता दाखवणार नाही.


पूर्वी महिला गृहिणी आर्थिक परावलंबित होत्या. हल्ली मुली सुशिक्षित झाल्या, स्वतःच्या पायावर उभ्या राहून त्या त्यांचा उदरनिर्वाह स्वतः करू शकतात. त्यामुळे त्यांच्या मानसिकतेमध्ये देखील बराच परिणाम झालेला आहे. पूर्वी १८ ते २४ वर्षे वयोगटातील मुलींची तर २५ ते २८ वयोगटातील मुलांशी लग्न होत असत; परंतु हल्ली आपली स्वप्न पूर्ण करण्यात आणि मनासारखा जोडीदार मिळवण्यात हे वय मुलींचे २८ नंतर तर मुलांचे ३०-३२ नंतर झालेले आहे आणि एवढ्या उशिरा लग्न झाल्यानंतर सर्व गोष्टींवर यांचा परिणाम होतो आणि त्यामुळे मानसिक बदल देखील घडून येतात. तडजोड करत संसार करण्याची वृत्ती कमी होत जाते आणि आयुष्य स्वतःभोवती फिरायला लागतं. आई-वडिलांचा हस्तक्षेप मुला-मुलींना मान्य नसतो, त्यातच विभक्त कुटुंबपद्धतीमुळे लग्न झालेल्या नवीन जोडप्यांवर कौटुंबिक जबाबदाऱ्या व बंधन नसतात. त्यामुळे दोघांमध्ये जरी काही कारणानिमित्त वाद झाले तरी ते वाद संपवण्यासाठी घरात वरिष्ठ मंडळींची उपस्थिती नसते. त्यामुळे हे वाद रागाच्या भरात आक्रमक रूप धारण करून एकमेकांचा जीव घेण्याचे प्रमाण वाढले आहे. अशा वेळेस पालकांनी मुला-मुलींना हस्तक्षेप वाटू नये अशा पद्धतीने त्यांच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला आणि त्यांच्या वैवाहिक आयुष्यामध्ये नक्की काय सुरू आहे याचा कानोसा घेतला, तरुण मंडळींनी देखील आपल्या मनातील घालमेल आई-वडिलांना सांगितली, तर नक्कीच घरातील वरिष्ठ मंडळी त्यात मधला मार्ग निवडून दोघांना आनंद कसा मिळेल यावर विचार करतील. यामुळे गोष्टी हाताबाहेर न जाता कदाचित वेळीच उपाय करणे सोपे जाईल. शिवाय मुला-मुलींनी शिक्षणाचा आणि आपल्या आर्थिक स्वावलंबनाचा दुरुपयोग-उपयोग करून गर्व न बाळगता, मनुष्य हा कुटुंबशील आणि समाजशील प्राणी आहे. हे मान्य करून सामाजिक भान जपून कुटुंबात मन रमवले पाहिजे. हल्ली चाळीशी-पन्नाशीमधील पालक स्वातंत्र्याच्या नावाखाली, मध्यमवयीन आयुष्य जगल्यानंतर उरलेल्या आयुष्याची मजा घेण्यासाठी सर्रास क्लब, डिस्को, पब या ठिकाणी जातात, विवाहबाह्य संबंध देखील प्रचंड प्रमाणात वाढीस आलेले दिसून येत आहे. याचे अवलंबन व अनुकरण आपली पुढील पिढीदेखील करत आहे.


कुटुंब व्यवस्थेबद्दलचे संस्कार लहानपणापासून घराघरातून त्यांच्यात रुजवणे गरजेचे आहे. पालकांनी मुलं लहान असताना आपापसामधील वाद मुलांसमोर न येऊ देता कौटुंबिक सामंजस्याने मुलांचे संगोपन केल्यास मुलांमध्ये कुटुंब आणि विवाह व्यवस्थेविषयी त्या पद्धतीचे संस्कार रोवण्यास मदत होईल.

Comments
Add Comment