
जव्हार : पिंपूर्णा लघुपाटबंधाऱ्यांच्या कालव्याचा शेतकऱ्यांना काहीच फायदा नसल्याचे सांगितले आहे. धरणातील पाणी २० वर्षातून कालव्याला एकाच वेळा पाणी सोडल्याचे सांगितले. त्यामुळे काही ठिकाणी पाण्याचा पाट देखील गायब झाला आहे. मात्र आता पाऊस सुरू झाला की त्या बांधाऱ्यातील करोडो लिटर्स पाणी वाया जाणार याकडे आताच लक्ष घालून शेतकऱ्यांचे म्हणणे ऐकावे अशी मागणी आमदारांकडे त्या भागातील ग्रामस्थ, शेतकऱ्यांनी केली आहे.
जून महिन्यानंतर त्या भागातील वडोली, दाभोसा, पिपूर्णा, चिरेचापाडा, या शेतकऱ्यांना पिण्याच्या पाण्याची टंचाई जाणवायला लागल्यानंतर त्या भागातील शेतकऱ्यांनी सांगितले. तसेच धरण भागातील या गावांना मे अखेरीस पिण्याचा पाण्याचा सामना करावा लागतो. मात्र या आदिवासी शेतकऱ्यांनी यावर्षी आपल्या गावातील आमदार झाल्याचे सांगत आमदारांकडे लेखी तक्रार केली आहे.
पिंपूर्णा धरणाच्या, पाटाची दुरुस्ती दरवर्षी केली जाते, मात्र प्रत्यक्षात त्या पाटात, पाणीच शेतकऱ्यांपर्यंत पोहोचत नाही. त्यामुळे या योजनेचा प्रत्यक्ष लाभ शेतकऱ्यांना होत नाही. शेतीसाठी पाण्याची टंचाई कायम असून, शेतकरी अजूनही शेतीसाठी पावसावरच अवलंबून आहे.
या पिंपूर्णा भागातील शेतकऱ्यांनी एवढ्या वर्षानंतर माझ्याकडे तक्रार केली. हा त्यांच्या शेतीचा मोठा मुद्दा असून, त्या धरणातील पाणी त्या पाटाला कधीच सोडले नाही. या पाटालगत शेती करणारा शेतकरी शेती करायला तयार आहे, मात्र धरणातील पाणी सोडले जात नाही. ही शेतकऱ्यांची गंभीर बाबीकडे आमचे लक्ष असेल.- हरिश्चंद्र भोये, आमदार विक्रमगड विधानसभा.
आम्ही शेतकऱ्यांनी यापूर्वी अनेक वेळा पाठ बंधारा विभागाकडे तक्रार करूनही पाटाला पाणी सोडले जात नाही. ही दरवर्षीची परिस्थिती आहे. आम्हाला जून महिना उजाडला की, गावात पाणी समस्या जाणवते. गावातून धरणांचा पाट जातो पण काय फायदा, याकडे
लक्ष घालावे.
- गणपत हिरकुडा, शेतकरी, पिंपूर्णा गाव.