
प्रा. मुक्ता पुरंदरे
आतापर्यंत प्रत्यक्ष युद्धात महिलांचा सहभाग कमीच होता. वरिष्ठ स्तरावर अधिकारी म्हणून महिला काम करत होत्या; परंतु प्रत्यक्ष सीमारेषांवर भारतीय चौक्यांचे रक्षण करताना शत्रूराष्ट्राच्या सैनिकांना त्यांच्या चौक्या सोडून पळायला भाग पाडल्याचे दृश्य ‘ऑपरेशन सिंदूर’च्या निमित्ताने जगाला दिसले. महिलांना संरक्षण दलात सहभागी करून घेण्याचा निर्णय किती सार्थ होता, हे ‘ऑपरेशन सिंदूर’ने दाखवून दिले आहे.
भारतात पूर्वी लष्करात महिलांचा समावेश नव्हता; परंतु शरद पवार यांनी संरक्षण दलाची दारे महिलांसाठी खुली केली. त्यावेळी अनेकांनी नाके मुरडली. लष्कर म्हणजे भाकऱ्या भाजण्याचे काम नव्हे, अशी टीकाही झाली; परंतु पवार आपल्या निर्णयावर ठाम राहिले आणि महिलांनी आपण किती उच्च कोटीची कामगिरी करू शकतो, हे ‘ऑपरेशन सिंदूर’मधून दाखवून दिले. १९९२ मध्ये महिलांच्या पहिल्या तुकडीची शॉर्ट सर्व्हिस कमिशनसाठी पाच वर्षांसाठी भरती करण्यात आली. त्यानंतर या सेवेचा कालावधी दहा वर्षांपर्यंत वाढवण्यात आला. २००६ मध्ये शॉर्ट सर्व्हिस कमिशन चौदा वर्षे करण्यात आले. भारतीय सैन्य आता महिलांना सशस्त्र दलात नियुक्तीसाठी निश्चित केलेल्या धोरणांची अंमलबजावणी करून प्रोत्साहन देते. यासाठी आर्मी मेडिकल कॉर्प्स, आर्मी डेंटल कॉर्प्स आणि मिलिटरी नर्सिंग सर्व्हिसेसमध्ये महिलांसाठी कायमस्वरूपी कमिशन मंजूर करण्यात आले आहे. आता महिला अधिकाऱ्यांना ११ शस्त्रास्त्रे आणि सेवांमध्ये कायमस्वरूपी कमिशन मिळते. कायमस्वरूपी कमिशननंतर महिला अधिकाऱ्यांना भारतीय सैन्याच्या सर्वांत महत्त्वाच्या भागांपैकी एक असलेल्या तोफखान्याचा भाग बनण्यास सुरुवात झाली आहे. सध्या, भारतीय सशस्त्र दलांमध्ये नियुक्त्यांमध्ये लिंगाच्या आधारावर कोणताही भेदभाव नाही. शस्त्रे आणि सेवांसाठी पुरुष आणि महिला सैनिकांच्या तैनातीत कोणताही फरक नाही. सर्वांना सैन्याच्या गरजेनुसार तैनात केले जाते. या कणखर निर्णयाची परिणती आता देशाला, जगाला बघायला मिळत आहे.
भारतीय सैन्यात महिला अधिकाऱ्यांना कायमस्वरूपी कमिशन देण्यासाठी २३ नोव्हेंबर २०२१ रोजी लिंग तटस्थ करिअर प्रगती धोरण सुरू करण्यात आले. याद्वारे महिलांना शस्त्रास्त्रे आणि इतर सेवांमध्ये समान संधी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. अर्थात हे सहजासहजी घडलेले नाही. महिलांना संधी दिल्याचे आता श्रेय घेत असलेल्या नेत्यांच्या सरकारच्या काळातच महिलांना कायमस्वरुपी कमिशनसाठी सर्वोच्च न्यायालयात लढा द्यावा लागला. ‘एनडीए’मधील महिला अधिकाऱ्यांची एक तुकडी दोनच दिवसांपूर्वी बाहेर पडली. ‘एनडीए’ प्रवेशासाठीही महिलांना सर्वोच्च न्यायालयात दाद मागावी लागली होती. ‘ऑपरेशन सिंदूर’च्या काळात दररोज पत्रकार परिषदेत माहिती देणाऱ्या दोन महिला अधिकाऱ्यांचे चेहरे दिसत होते; परंतु त्याच वेळी सीमेचे प्रत्यक्ष रक्षण करणाऱ्यांमध्येही सीमा सुरक्षा दलाच्या रणरागिणी बंदुकीसह अन्य शस्त्रास्त्रे घेऊन सज्ज होत्या, हे कुणालाच माहीत नव्हते. पाकिस्तानचा हल्ला परतवून लावूनच केवळ त्या थांबल्या नाहीत, तर त्यांनी पाकिस्तानी सैनिकांना पळता भुई थोडी केली.
आता ‘ऑपरेशन सिंदूर’शी संबंधित अनेक कथा समोर येत आहेत. पाकिस्तानने ८, ९ आणि १० मे रोजी भारतीय चौक्या आणि नागरी क्षेत्रांवर जोरदार गोळीबार केला. या दरम्यान, भारतीय सीमा सुरक्षा दलाच्या सात महिला सैनिकांनी काश्मीरमधील अखनूर सेक्टरमध्ये त्यांच्या पदांचा कार्यभार स्वीकारला. असिस्टंट कमांडंट नेहा भंडारी यांच्या नेतृत्वाखाली सहा शूर सैनिकांनी तीन दिवस आणि तीन रात्री दोन महत्त्वाच्या सीमा चौक्यांचे रक्षण केले. पाकिस्तानकडून झालेल्या प्रचंड गोळीबार आणि तोफगोळ्यांना न जुमानता या महिला केवळ धैर्याने लढल्या नाहीत, तर शत्रूला माघार घेण्यास भाग पाडले. ‘बीएसएफ’च्या या शूर मुलींनी पुरुष सैनिकांसोबत खांद्याला खांदा लावून शत्रूंचा सामना केला. भंडारी यांनी त्यांच्या कंपनीची कमान स्वीकारली आणि घुसखोरी रोखलीच नाही, तर पाकिस्तानी चौक्यांवर हल्लाही केला. नेहा म्हणाली, ‘आम्हाला पुरुषांसारखेच कठीण प्रशिक्षण देण्यात आले आहे. ‘ऑपरेशन सिंदूर’मध्ये आम्ही एक इंचही मागे न हटण्याचा निर्णय घेतला.’ तिच्या धाडसाचे ‘बीएसएफ’चे उपमहानिरीक्षक एस. एस. मंद यांनी कौतुक केले. सक्रिय युद्ध परिस्थितीत महिला सैनिकांनी इतकी मोठी भूमिका बजावण्याची ही पहिलीच वेळ होती. त्यातून पुरुष सैनिकांच्या बरोबरीची त्यांची क्षमता सिद्ध झाली. ‘ऑपरेशन सिंदूर’दरम्यान, अखनूर सेक्टरमध्ये आंतरराष्ट्रीय सीमेवर तैनात असलेल्या या महिला सैनिकांनी सिद्ध केले, की त्या कोणापेक्षाही कमी नाहीत.
फक्त तीन वर्षांपूर्वी ‘बीएसएफ’मध्ये सामील झालेल्या नेहा भंडारी यांनी या संधीला ‘आयुष्यात एकदाच मिळणारी संधी’ मानले. तिच्या नेतृत्वाखाली मनजीत कौर, मलकीत कौर (पंजाब), स्वप्ना रथ, शंपा बसक (पश्चिम बंगाल), सुमी जेस (झारखंड) आणि ज्योती बानियान (ओडिशा) या सहा महिला सैनिकांनी मिळून अखनूरच्या दोन चौक्या वाचवल्या. यापैकी चार महिला २०२३ मध्ये भरती झाल्या होत्या, तर मनजीत आणि मलकीत यांना १७ वर्षांचा अनुभव होता. सियालकोट सेक्टरमध्ये पाकिस्तानकडून जोरदार गोळीबार होऊनही या शूर सैनिकांनी हार मानली नाही. त्यांनी सपाट मार्ग आणि प्रादेशिक शस्त्रांचा वापर करून पाकिस्तानी चौक्यांचे मोठे नुकसान केले, त्यानंतर शत्रूला त्यांच्या पुढच्या चौक्या सोडून पळून जावे लागले. ‘ऑपरेशन सिंदूर’दरम्यान पुरुष अधिकाऱ्यांनी या महिलांना युद्धातून माघार घेण्याचा पर्याय दिला; परंतु नेहा आणि तिच्या टीमने नकार दिला. नेहाचे पालक ‘सीआरपीएफ’मध्ये सेवा बजावत आहेत. तिचे आजोबाही लष्करात होते. ती म्हणाली की आम्ही आमच्या वरिष्ठांसमोर आग्रह धरला, की आम्ही मागे हटणार नाही. त्यांनी आम्हाला आमची सर्वोत्तम सेवा देण्यास प्रोत्साहित केले. ‘बीएसएफ‘चे डीआयजी वरिंदर दत्ता म्हणाले, की नेहाने केवळ बीएसएफ जवानांचेच नव्हे, तर सैन्याच्या अतिरिक्त तुकड्यांचेही नेतृत्व केले. तिने शस्त्रे आणि तोफांचा वापर करण्याचे निर्णय स्वतंत्रपणे घेतले. एका महिला अधिकाऱ्याने सक्रिय युद्धात पहिल्यांदाच अशी कामगिरी केली.
‘ऑपरेशन सिंदूर’मध्ये ७० हून अधिक पाकिस्तानी चौक्या उद्ध्वस्त करण्यात आल्या. ‘बीएसएफ’ने सांबा, कथुआ आणि जम्मू सेक्टरमध्ये ७० हून अधिक पाकिस्तानी चौक्या आणि तीन दहशतवादी लाँचपॅड उद्ध्वस्त केले. या यशाचे स्मरण करण्यासाठी ‘बीएसएफ’ने सांबा सेक्टरमधील एका चौकीला ‘सिंदूर’ असे नाव देण्याचा प्रस्ताव मांडला आहे. या ऑपरेशनमध्ये हुतात्मा झालेल्या सैनिकांची नावे आणखी दोन चौक्यांना दिली जातील. ‘ऑपरेशन सिंदूर’ ही महिला देशाच्या सुरक्षेत समान भूमिका बजावू शकतात, हे दाखवण्याची संधी होती. नेहा भंडारी आणि त्यांच्या टीमने हे सिद्ध केले की, महिलादेखील सक्रिय युद्धभूमीवर पुरुषांसारख्याच धैर्याने आणि दृढ निश्चयाने लढू शकतात. ही कारवाई लष्करी सेवेतील महिलांसाठी एक नवी प्रेरणा बनली आहे. त्यांच्या शौर्यामुळे सीमेवरील सुरक्षा आणखी मजबूत झाली आणि हा देशासाठी अभिमानाचा क्षण बनला. ‘ऑपरेशन सिंदूर’दरम्यान सीमा सुरक्षा दलाच्या महिला जवानांनी असाधारण धैर्य आणि शौर्य दाखवले. तसेच, पाकिस्तानी हल्ल्यांना योग्य उत्तर दिले.
महिला जवानांना पुरुष कर्मचाऱ्यांइतकेच खडतर प्रशिक्षण घ्यावे लागले. ‘ऑपरेशन सिंदूर’दरम्यान त्यांनी त्याच भावनेने सीमांचे रक्षण केले. ‘ऑपरेशन सिंदूर’दरम्यान त्यांनी पाकिस्तानी चौक्यांना लक्ष्य केले आणि आपल्या स्थानापासून एक इंचही मागे हटल्या नाहीत. सीमेवर असलेल्या चौक्यांवर ठाण मांडून पाकिस्तानी सैन्याचा आणि दहशतवाद्यांचा हल्ला परतवून लावला. सीमा सुरक्षा दलाच्या महिला जवानांनी केवळ शत्रूचाच धाडसाने सामना केला नाही, तर देशाप्रती असलेल्या जबाबदाऱ्यांची पूर्ण जाणीव असल्याने दाखवून देत देशालाही आश्वस्त केले. कथुआ, सांबा आणि जम्मू सेक्टरमधील सीमा चौक्यांवर शत्रूंचा सामना करणाऱ्या भारतीय सीमा सुरक्षा दलाच्या या तरुणी केवळ देशाच्या सीमांचे रक्षण करत नाहीत, तर धैर्य आणि दृढनिश्चयाचे जिवंत उदाहरण ठरतात. ही कारवाई संरक्षणात महिलांच्या वाढत्या भूमिकेतील एक मैलाचा दगड मानली जात आहे.