मृदुला घोडके
परवा माझ्या एका मैत्रिणीला फोन करत होते. २-४ वेळा बेल वाजली पण तिने उचलला नाही... काही मेसेजही नाही... म्हटलं कुठे बिझी झाली ही... रात्री मात्र तिचा फोन आला. दिवसभर शाळेत ॲडमिशनमध्ये व्यस्त होते असं सांगितलं. अरे खरंच की... शालेय किंवा महाविद्यालयीन पालकांच्या भूमिकेतून बाहेर पडून आता बरीच वर्षं झाली असल्याने या अॅडमिशनची धांदल माझ्या लक्षातच आली नाही. आपल्याकडे शाळेत ॲडमिशन म्हणजे एक सोहळाच असतो नाही? अलीकडच्या काळात तर त्याचं स्वरूप विलक्षण झालं आहे. मूल जन्माला यायच्या आधीपासूनच त्यांच्या दाखल्याची नोंदणी करण्यात येत आहे. आजच्या या स्पर्धेच्या युगात आपल्या मुलांच्या बाल लीलांचा आनंद घेत असतानाच त्या बाळाचं ॲडमिशन कुठल्या बालवाडीत, प्ले स्कूलमध्ये घ्यायचं... नंतर कुठल्या शाळेत घालायचं या तणावात मुलाचं संगोपन केलं जातं. आपल्या मुलांसाठी शैक्षणिक प्राधान्य आणि गरजा, भवितव्याचा विचार करून शाळांची निवड केली जाते. शाळेतला शैक्षणिक अभ्यासक्रम, जागा, तिथल्या सुविधा, फी, इतर वैशिष्ट्य इत्यादी संदर्भात मोठं संशोधन केलं जातं. बहुतेक शाळांमध्ये प्रवेशासाठी त्या इवल्या इवल्या मुलांच्या मुलाखती, चाचणी घेतली जाते. त्याचं टेन्शन आई-वडिलांना असतं. मुलांकडून सराव करून घेतला जातो. दिवसातून एकदा तरी अपेक्षित प्रश्नांची उत्तरं घोकून घेतली जातात. इच्छित शाळेत दाखला, त्यासाठी असलेली स्पर्धा, निवडीची प्रक्रिया आणि सामाजिक स्तर राखण्याचा दबाव... यामुळे शाळेत दाखला घेण्याची प्रक्रिया अत्यंत तणावपूर्ण आणि चिंताजनक ठरू शकते.
एवढा सगळा खटाटोप करून पाल्याला शाळेत ॲडमिशन मिळाल्यावर आणखी एक कसरत सुरू होते. २-३ वर्षांची ती इटुकली पोरं... शाळेत जायचं म्हणून आधी उत्सुक असतात पण तिथलं अनोळखी वातावरण, पालकांपासून काही काळ विलग होणे आणि नवीन अनुभव यामुळे ती गोंधळून जातात. अनेक भावनांचा कल्लोळ त्यांच्या मनात निर्माण होतो. बरीच मुलं शाळेतले कार्यक्रम, खेळ, खेळणी, गाणी, समवयस्क मुलं यांच्यामध्ये रमायला लागतात... पण अनेक बालकांना नव्या वातावरणाशी जुळवून घेता येत नाही. ती रडतात, गोंधळतात... शाळेविषयी त्यांच्या मनात एक भीती निर्माण होते. अशावेळी आपल्या मुलाला आपली गरज आहे हे पालकांनी ध्यानात घेतलं पाहिजे. आपल्या मुलाची मानसिकता जाणून घेऊन त्यांना सकारात्मक प्रेरणा, प्रोत्साहन दिलं पाहिजे.
शाळेत जाणं म्हणजे जागा बदल... तसंच घरातल्या ओळखीच्या व्यक्तींव्यतिरिक्त दुसऱ्या नव्या लोकांशी संबंध येणं. कोणत्याही बालकाच्या आयुष्यात हा एक महत्त्वाचा टप्पा आहे. मुलांना कुठल्याही प्ले स्कूलमध्ये किंवा मोठ्या शाळेत दाखला घेण्याआधी आपल्या मुलाशी मोकळा संवाद साधावा. मुलाला तिथे कोण कोण भेटेल? तिथे वातावरण कसं असेल? तिथे कसे खेळ असतील? याची चर्चा करावी. अलीकडे बऱ्याच प्रि स्कूलमध्ये, शाळा सुरू होण्यापूर्वी ओरिएंटेशन सेशन आयोजित करतात. तिथे इतर पालक आणि मुलांबरोबर ओळख होऊ शकते. गप्पा मारता येतात. विश्वासाचं वातावरण तयार होऊ शकतं. मुलांची शाळा सुरू झाल्यानंतर त्यांना तिथे सोडताना धीर द्या, विश्वासात घ्या. शाळेविषयी चांगल्या गोष्टी गमतीजमती सांगा. त्यांना खोटी आश्वासने किंवा प्रलोभने दाखवू नका. इतर मुलांशी तुलना करू नका. अचानक तोडल्यासारखं करून सोडून जाऊ नका. निरोप घेताना मुलाला जवळ घेऊन, आपण शाळा सुटल्यावर त्यांच्यासाठी तिथे असणार आहात याची आठवण करून द्या.
एवढे प्रयत्न करूनही काही मुलांना शाळेत जाणं आवडत नाही. शाळा म्हटली की, ती बिथरतात. याची वेगवेगळी कारणं असू शकतात. शाळेत कोंदट खोल्या किंवा वर्ग असतील तर मुलांना तिथे रुळायला त्रास होतो. मोकळ्या हवेशीर वातावरणात मुले रमतात. प्रत्येक मुलाचं एक वेगळं भावविश्व असतं. काहींना खेळायला आवडतं तर काहींना चित्र रंगवण्यात किंवा चित्राची पुस्तकं पाहण्यात रस असतो. मुलाच्या कलेकलेने त्याला हाताळलं जात आहे की नाही याकडे लक्ष द्यावं. शाळेत काय प्रसंग घडतात यावरही मुलांची मनःस्थिती अवलंबून असते. एखाद्या वेळी त्यांना दुर्लक्षित वाटलं किंवा कुठे भांडण, मारामारी झाली तरी शाळेत जायला ती नको म्हणतात. त्याचा आत्मविश्वास कमी होऊ लागतो.
मुलांना शाळेची गोडी लावण्यात शिक्षकांचा मोठा वाटा आहे आणि जबाबदारीही आहे. शिक्षक आणि मुलांमध्ये छान, आनंददायी, विश्वासाचं भावनिक नातं निर्माण झालं की, मुलांना रविवारची सुट्टी सुद्धा नको वाटते.
शाळेचा पहिला दिवस मुलांसाठी आयुष्यभराची एक आठवण असते. त्याचं शिक्षण आणि विकासासाठी हे प्रारंभीचे दिवस खूप महत्त्वाचे आहेत. आपलं सकारात्मक मार्गदर्शन, आधार, प्रोत्साहन, समजूतदारपणा आणि प्रेम यामुळे आपलं मूल मोकळेपणानं आणि आश्वस्त होऊन हा नवीन अध्याय स्वीकारू शकेल.