नॉस्टॅल्जिया : श्रीनिवास बेलसरे
गझल हा काव्यप्रकार लोकप्रिय करण्यात जगजीत सिंग आणि चित्रा सिंग या जोडीचे योगदान फार मोठे होते. त्यांची आज लोकप्रिय असलेली अनेक गाणी केवळ त्यांच्या समकालीन गझलकारांचीच नव्हती, तर ती अनेक दशके आधी होऊन गेलेल्या अभिजात उर्दू कवींचीही होती. त्यांनी काही शायर तर इंग्रजांच्या राजवटीत होऊन गेलेले निवडले. मात्र अभिजात उर्दू साहित्याचा तो खजिना काही उर्दू भाषिकांच्या उर्दू लिपीच्या आग्रहामुळे इतर रसिकांपर्यंत पोहोचत नव्हता. जगजीतजींनी तो एका वेगळ्याच मार्गाने सर्वांसाठी खुला केला.
चित्रा सिंग, जगजीत सिंग या युगुलाने त्या गझला त्यांच्या खास शैलीत गायल्यामुळे त्यातली साहित्यिक संपदा उर्दू न येणाऱ्या अगणित रसिकांना कळाली. त्या रचना श्राव्य झाल्यामुळे त्या वाचण्याची, त्यासाठी उर्दूची लिपी शिकण्याची, गरज उरली नाही आणि अगदी तरल पातळीवरची रोमँटिक उर्दू कविता सहज लोकांपर्यंत सहज पोहोचली. जुन्या शायरांच्या उत्तम रचना लोकांसमोर आणल्यामुळे इतर भाषिक लोकही उर्दू शिकू लागले. वाचकवर्गात विक्रमी वाढ होण्याची शक्यता दिसल्यामुळे ते साहित्य देवनागरी लिपीतही छापले जाऊ लागले. हा अर्थशास्त्राने मानसशास्त्रावर मिळवलेला विजय होता आणि आनंदाची बाब म्हणजे तो एकंदर भारतीय साहित्याच्या हिताचा होता. उर्दू गझलेच्या खूबसुरत चेहऱ्यावरचा तो अपरिचित लिपीचा पडदा जगजीत सिंग यांनी नकळत बाजूला केला.
जगजीतजींनी गायलेली एक गझल होती आजपासून तब्बल १९६ वर्षांपूर्वी जन्माला आलेल्या अमीर मीनाई यांची. ती सुद्धा अशाच शब्दांनी सुरू झाली होती. देशभर अतिशय लोकप्रिय असलेल्या त्या गझलेचे शब्द होते -
“सरकती जाये है
रुखसे नकाब आहिस्ता आहिस्ता,
निकलता आ रहा है
आफताब आहिस्ता आहिस्ता.”
‘अमीर मीना लखनवी’ यांचा जन्म १८२९ सालचा. ते गझला आणि प्रामुख्याने नाती लिहीत. ‘नात’ म्हणजे पैगंबरसाहेबांच्या किंवा परमेश्वराच्या स्तुतीचे काव्य. हा काव्यप्रकार उर्दूत पसरविण्याचे त्यांचे योगदान मोठे मानले जाते. त्यांनी उर्दू, अरबी आणि पारसीमध्ये रचना केल्या. प्रसिद्ध शायर दाग दहलवी, मुहम्मद इक्बाल आणि खुद्द मिर्झा गालिब यांनी अमीरसाहेबांचा सत्कार केला होता. अलीकडे त्यांच्या आगळ्या शैलीच्या लिहिलेल्या ‘नात’ पाकिस्तानी गायक नुसरत फतेह अली, कव्वाल बहाउद्दीन खान यांनी गायल्या आहेत, तर त्यांच्या गझला गाणाऱ्यात होते जगजीत सिंग, गुलाम अली, उस्ताद बरकत अली खान, फरीदा खानम आणि कविता सेठ.
अमीरसाहेब त्यांच्या प्रेयसीच्या चेहऱ्याचे वर्णन या गझलेत कसे करताहेत, पाहा. ‘तिच्या चेहऱ्यावरचा नकाब ती बाजूला करू पाहते आहे, पण मला मात्र असा भास होतोय की,
जणू ढगाच्या मागून सूर्य हळूहळू उगवून वर
येतो आहे.’
कवीचे आणि त्याच्या प्रेयसीचे हे प्रेम बरेच जुने असावे. कारण ते दोघे एकमेकाला लहानपणापासून ओळखतात असे कवी सांगतो आहे. पण त्याची प्रेयसीबद्दलची एक खट्याळ तक्रार आहे. तो म्हणतो, तारुण्यात पदार्पण करताच तिची वागणूक किती बदलली पाहा! जसे आम्ही यौवनात आलो तिने तर माझ्यापासून पडदा पाळणेच सुरू केले! खरे तर आम्ही बरोबरच्या वयाचेच होतो ना. दोघांचा तारुण्यातला प्रवेश
बरोबरच झाला. तिचे यौवन कसे हळूहळू खुलत गेले, पण तिची ही लाजण्याची सवय मात्र किती झटकन सुरू झाली!
‘जवाँ होने लगे जब
वो तो हमसे कर लिया परदा,
हया यकलख्त आई और
शबाब आहिस्ता आहिस्ता.’
ती मला चक्क टाळूच लागली. तिच्या या अचानक आलेल्या लाजाळूपणामुळे आमची भेट तर सोडाच मला साधे तिचा सुंदर चेहरा पाहणेही दुरापास्त होऊन बसले. तिचे दर्शन न झाल्याने मला रात्ररात्र झोपही येत नाही. त्यामुळे आज मी तिच्यापासून दूर आलोय. आजची रात्र माझ्यासाठी तिच्या ताटातुटीची, असह्य विरहाची रात्र ठरते आहे. मी या रात्रीत क्षणभरही झोपू शकलेलो नाही.’ कवी इस्लामिक संस्कृतीत वाढलेले असल्याने त्यांचा देवदूत, जिन्न यावर पक्का विश्वास आहे. मग प्रेयसीच्या विरहाने व्याकूळ झालेले रात्रभर जागलेले कविवर्य देवदुतांना विनंती करतात. ‘बाबांनो, माझ्या कर्माची झाडाझडती, माझे काय चुकले तिचे काय चुकले हे लगेच विचारू नका. ते सगळे आपण नंतर पाहूयात! आता नका माझा अजून छळ करू. सकाळ झाली असली तरी मला आता तरी झोपू द्या. जेव्हा वेळ असेल, फुर्सत असेल तेव्हाच आपण तो हिशोब करू!
‘शब-ए-फुर्कतका जागा हूँ
फरिश्तों अब तो सोने दो,
कभी फुर्सतमें कर लेना हिसाब,
आहिस्ता आहिस्ता.’
कवीला मधेच आठवते जेव्हा आपण तिला भेटीविषयी विचारले होते तेव्हा ती किती घाबरली होती. कुणीतरी (शत्रू) ऐकेल या भीतीने तिने किती संकोचून दबक्या आवाजात हळूहळू उत्तर दिले होते -
‘सवाल-ए-वस्लपे उनको
अदूका खौफ है इतना,
दबे होंठों से देते हैं
जवाब आहिस्ता आहिस्ता.’
विरहात असताना प्रियकराच्या मनात अनेक विचार येत असतात. आपली ताटातूट कशामुळे झाली असावी? कशामुळे इतके छान फुललेले आपले प्रेम शेवटी आटले? एकदा त्याला असेही वाटून जाते की, आपण उगाचच इतकी घाई केली! कदाचित माझ्या घाई करण्याच्या स्वभावानेच तर घात केला नसावा? तिचा स्वभाव किती लाजराबुजरा आहे, हळवा आहे, हे मी लक्षातच घेतले नाही का? अरेरे! मग कवी प्रेमिकेला उद्देशून अगदी सौम्यपणे तिची तक्रार
करताना म्हणतो -
‘हमारे और तुम्हारे प्यार में बस फर्क है इतना,
इधर तो जल्दी-जल्दी है, उधर आहिस्ता आहिस्ता.’
उर्दू शायरी ज्या संस्कृतीत जन्मली तिथे शीर कलम करणे, मृत्यूदंड देणे हे अगदी सामान्य आहे. त्या पार्श्वभूमीवर कवी सरळ अशी कल्पना करू लागतो की, मला शिक्षा द्यायची म्हणून ती कदाचित माझा ‘कत्ल’च करून टाकेल, पण त्यातही हा रोमँटिक वल्ली काय म्हणतो पाहा, ‘तिला मला शिक्षाच द्यायची असेल, तर तिने कठोरपणे माझे शिरसुद्धा धडावेगळे करावे, पण कृपा करून ते एकाच झटक्यात नको! उलट माझी तिला विनंती असेल, “राणीसाहेब, हळू, जरा हळू, थोडे सावकाशच चिरा मला!”
‘वो बेदर्दीसे सर काटें ‘अमीर’
और मैं कहूँ उनसे,
हुजूर आहिस्ता आहिस्ता जनाब
आहिस्ता आहिस्ता.’
कसले हे कलंदर कवी आणि अगदी प्रेयसीलासुद्धा कसल्या यांच्या विचित्र विनंत्या! अफलातून प्रेमाचा हा असला बेछूट व्यवहार पाहण्यासाठी उर्दू गझला, कव्वाल्या ऐकण्याला पर्याय नाही हेच खरे!