Sunday, June 22, 2025

खासगी जलमापके बंद असल्यास अंदाजित बिले येणार दुप्पट

खासगी जलमापके बंद असल्यास अंदाजित बिले येणार दुप्पट

महापालिकेने प्रचलित जलआकाराच्या नियमांमध्ये केली सुधारणा


मुंबई: मुंबईकरांना वितरीत करण्यात येणाऱ्या पाण्याच्या देयकांची रक्कम जलआकारांतर्गत वसूल करण्यात येत असून यापुढे पाण्याचे मोजमाप ठेवणारी खासगी जलमापके बंद असल्यास यापूर्वीच्या सरासरी रकमेवर १०० टक्के अधिक शुल्क आकारले जाणार आहे, तर झोपडपट्टी भागांमध्ये जलमापके बंद राहिल्यास पूर्वीच्या सरासरी बिलाच्या रकमेवर २५ टक्के अतिरिक्त शुक्ल आकारले जाणार आहे.


महापालिकेने याबाबत नियमावलीत पोटनियमांमध्ये बदल करून या सुधारीत नियमांची अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे यापुढे खासगी जलमापके बंद असल्यास त्यांना अंदाजित दुपटीने बिले पाठवली जाणार आहेत.


मुंबई महापालिकेच्यावतीने मुंबईतील जनतेला सुमारे ४१०० दशलक्ष लिटर पाण्याचा पुरवठा केला जातो. पिण्यासाठी तसेच इतर वापरासाठी पुरवठा करण्यात येणाऱ्या घरगुती आणि कमर्शियल वापराच्या पाण्याची देयके जल आकार नियमावली आणि मलनिःसारण व टाकाऊ पदार्थ निष्कासन नियमावलीअंतर्गत जारी केली जातात. या नियमावलीतील सुधारीत पोट नियमांमध्ये सुस्पष्टता आणण्यासाठी सुधारणा करण्यात आली आहे. याबाबत सुधारीत पोट नियमांना महापालिकेने मंजुरी
दिली आहे.


या जुन्या नियमांमध्ये, खाजगी जलमापक ६ महिन्यांहून अधिककाळ जर नादुरुस्त असेल तर अंदाजित वापर म्हणजे पाण्याची दैनिक गरज किंवा मागील कालावधीतील प्रत्यक्ष वापराच्या आधारावर संगणना करुन काढलेला वापर यापैकी जो जास्त असेल तो असेल तसेच त्या वापरावर २५ टक्के अधिक वाढ करण्यात येईल,असे नमुद होते.


परंतु आता सुधारणा करून अशाप्रकारे खासगी जलमापक सहा महिन्यांहून अधिक कालावधीसाठी बंद असल्यास पूर्वीच्या २५ टक्क्यांऐवजी १०० टक्के अधिक वाढ प्रस्तावण्यात आली आहे. त्यामुळे सरासरी अंदाजित पाण्याची जेवढी रक्कम येणार आहे, त्यावर १०० टक्के अधिक वाढ करून खासगी जलमापक असणाऱ्या ग्राहकाला दुपटीने अंदाजित बिले पाठवली जणार आहेत.


तसेच खासगी जलमापक जर सहा महिन्यांहून अधिक काळ वाचनास उपलब्ध नाही किंवा जमिनीखाली गाडलेल्या अवस्थेत आहेत अशा पाण्याच्या वापरावर नोटीस देण्यासापेक्ष २५ टक्के अधिक वाढ लागू होणार आहे. तसेच जर झोपडपट्टीतील निवासी खाजगी जलमापक जर १२ महिन्यांहून अधिक काळ नादुरुस्त असेल तर त्यांना अंदाजित बिले पाठवली जातात, त्याऐवजी आता सरासरी अंदाजित रक्कम जेवढी येईल त्यावर १०० टक्के अधिक वाढ केली जाणार आहे, तर १२ महिन्यांपासून अधिक काळ वाचनास उपलब्ध नसेल किंवा जमिनीखाली गाडलेल्या अवस्थेत असेल तर अंदाजित बिलावर २५ टक्के अधिक वाढ केली जाणार आहे.


त्यानुसार आता पाण्याच्या बिलांमध्ये बंद पडलेल्या आणि वाचनासाठी उपलब्ध नसलेल्या जलमापकांसाठी अंदाजित शुल्क आकारताना नवीन नियमावलीचा आधार घेतला जाणार आहे. त्यामुळे पाण्याची वापराचे अचूक मापन करणारी जलमापके सुस्थितीत नसतील तर अंदाजित बिले टाळण्यासाठी लगेच बदलून घ्या.

Comments
Add Comment