Sunday, June 22, 2025

लीड्स कसोटीत दुसऱ्या दिवसअखेर इंग्लंड पिछाडीवर

लीड्स कसोटीत दुसऱ्या दिवसअखेर इंग्लंड पिछाडीवर
लीड्स : भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना हेडिंग्ले लीड्स येथे सुरू आहे.या सामन्यात दुसऱ्या दिवसअखेर इंग्लंड तीन बाद २०९ धावांवर खेळत आहे. इंग्लंडचा संघ २६२ धावांनी पिछाडीवर आहे. प्रथम फलंदाजी करणाऱ्या भारताने पहिल्या डावात सर्वबाद ४७१ धावा केल्या आहेत.

इंग्लंड तीन बाद २०९ धावा

भारताच्या दमदार खेळीनंतर इंग्लंडचा संघ फलंदाजीसाठी आला. त्यांना पहिला धक्का लवकर बसला. झॅक क्रॉली फक्त चार धावा करुन परतला. बेन डकेट ६२ धावा करुन बाद झाला. जो रूटने २८ धावांचे योगदान दिले. ओली पोप १०० धावांवर खेळत आहे. ओलीच्या सोबतीला हॅरी ब्रूक मैदानात आला आहे. भारताकडून जसप्रीत बुमराहने इंग्लंडच्या तीन फलंदाजांना बाद केले आहे.

भारत सर्वबाद ४७१ धावा

लीड्स कसोटीत नाणेफेक जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेणे इंग्लंडला भोवले. भारताने चांगली सुरुवात केली. टीम इंडियाकडून सलामीवीर यशस्वी जयस्वाल (१०१ धावा), कर्णधार शुभमन गिल (१४७ धावा) आणि यष्टीरक्षक फलंदाज रिषभ पंत (१३४ धावा) या तिघांनी शतके केली. केएल राहुलने ४२ आणि रवींद्र जडेजाने ११ धावांचे योगदान दिले. मोहम्मद सिराज तीन धावा करुन नाबाद राहिला तर शार्दुल ठाकूर आणि प्रसिद्ध कृष्णा या दोघांनी प्रत्येकी एक धाव काढली. साई सुदर्शन, करुण नायर आणि जसप्रीत बुमराह हे तिघे शून्यावर बाद झाले. इंग्लंडकडून कर्णधार बेन स्टोक्सने चार जणांना बाद केले. जोश टंगनेही चार जणांना बाद करत त्याला उत्तम साथ दिली. शोएब बशीर आणि ब्रायडन कार्से या दोघांनी प्रत्येकी एक बळी घेतला.

रिषभ पंतची कमाल

भारताचा यष्टीरक्षक फलंदाज रिषभ पंत (१३४ धावा) याने कमाल केली. कसोटी क्रिकेटमध्ये यष्टीरक्षक फलंदाज रिषभ पंतने आतापर्यंत सात शतके केली आहे. लीड्स येथे खेळताना त्याने कसोटी क्रिकेटमधील वैयक्तिक कारकिर्दीतले सातवे शतके केले. या शतकाद्वारे त्याने माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी (६ शतके) आणि वृद्धिमान साहा (३ शतके) यांना मागे टाकले. शतक पूर्ण करताना पंतने १० चौकार आणि चार षटकार मारले. इंग्लंडमधील पंतचे हे तिसरे कसोटी शतक होते. पंतने परदेशातील भूमीवर एकूण ५ कसोटी शतके आणि मायदेशात २ कसोटी शतके केली आहेत. इंग्लंडच्या भूमीवर इंग्लंडविरुद्ध ३ शतके करणारा पंत हा एकमेव भारतीय यष्टीरक्षक फलंदाज आहे.

नाणेफेकीचा कौल

नाणेफेक इंग्लंडने जिंकली. त्यांनी गोलंदाजीचा निर्णय घेतला. या निर्णयाचा भारताला फायदा झाला. टीम इंडियाने चांगली सुरुवात केली. पण तीन फलंदाजांनी शतके केली तरी नंतरच्या फलंदाजांना टिकाव धरणे जमले नाही यामुळे भारताचा डाव ४७१ धावांतच आटोपला.

इंग्लंड-भारत कसोटी मालिकेचे वेळापत्रक (२०२५)

पहिली कसोटी: २० ते २४ जून, हेडिंग्ले (लीड्स)

दुसरी कसोटी: २ ते ६ जुलै, एजबॅस्टन (बर्मिंगहॅम)

तिसरी कसोटी: १० ते १४ जुलै, लॉर्ड्स (लंडन)

चौथी कसोटी: २३ ते २७ जुलै, ओल्ड ट्रॅफर्ड (मँचेस्टर)

पाचवी कसोटी: ३१ जुलै ते ४ ऑगस्ट, ओव्हल (लंडन)
Comments
Add Comment