Saturday, June 21, 2025

मरण सगळ्यात स्वस्त आहे...!

मरण सगळ्यात स्वस्त आहे...!

स्वाती पेशवे


निरपराध, निष्पापांचे निष्कारण होणारे मृत्यू नेहमीच चटका लावून जातात. यामुळे जगण्याची भ्रांत आणि कसरत वाढत असताना स्थैर्याचे दोन क्षण शोधणारे जीव नाहक कवेत घेणाऱ्या, कोणत्या ना कोणत्या रूपात अकाली झडप घालून आपल्या सदनी नेणाऱ्या यमदुतांप्रती संताप वाढतो. काही दिवसांपूर्वी पहलगाममध्ये ते दहशतवाद्यांच्या भेसूर रूपात आले आणि देशाच्या नंदनवनातच सामान्यांच्या सुखस्वप्नांची राखरांगोळी करून गेले. याच यमदुतांनी विजयाचा आनंद व्यक्त करणाऱ्या क्रिकेटप्रेमींना चेंगरले. रेल्वे मार्गावरील एका वळणावर प्रवाशांना ओढून घेतले. लगोलग त्यांचा मोर्चा अहमदाबादमध्ये वळला. उद्योगनगरी असणाऱ्या या शहरातील व्यस्त विमानतळामध्ये ते कधी आणि कसे दबा धरून बसले हे कोणाला कळलेही नाही. त्यामुळेच हसत, प्रवास सुरू झाल्याने नि:श्वास सोडत, कमरेचे सीट बेल्ट सुटताच पुढचे दहा तास आकाशात निवांत विहार करण्याचे स्वप्न बघत विसावलेले जीव थेट आगीच्या लोळात खाक झाले. इतके की त्यांच्या शरीराचे तुकडे गोळा करणाऱ्यांनाही जन्माची भीती बसावी. यात कोणी अगदी लहान, कोणी बाल्यावस्थेतील, तर कोणी वयाच्या पुढच्या टप्प्यातील होते. कोणाला नव्या देशात घर वसवायचे होते, कोणाला वसवलेल्या घरी परतायचे होते, तर कोणाला आपल्या घरातील व्यक्तीने वसवलेले घर बघायचे होते. पण या सगळ्यांच्याच सगळ्याच अपेक्षा, इच्छा, स्वप्ने एका भयानक धमाक्यात, जोरदार धडकीमध्ये बेचिराख झाली आणि होत्याचे नव्हते झाले. त्यात वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचाही मृत्यू झाला. आगीने वेढलेल्या मेसमधून बाहेर पडण्यासाठी काहींनी उड्या मारल्या, तर एवढाही अवधी न देता हातात अन्नाचा घास असणाऱ्या अनेकांना आगीने आहुतीसमान स्वीकारले.


हा भयावह अपघात पाहून देशच नव्हे, तर अवघे जग स्तब्ध झालेले दिसले. यथावकाश यामागील कारणे, मृतांच्या नातलगांना आर्थिक मदत, आगीत नुकसान झालेल्या इमारतीची पुनर्बांधणी यासारखे उपचार पार पडतील आणि आणखी एक दुर्घटना काळाच्या तसेच स्मृतीच्या पडद्याआड जाईल; परंतु मुळातच असे अपघात का होतात, उड्डाणानंतरचा वेळ सर्वाधिक धोक्याचा का असतो हा आणि यासारखा तपशील जाणून घ्यायला हवा. विमानाच्या टेकऑफचा वेळ हा विमान उद्योगातील सर्वात ‌‘क्रिटिकल‌’ काळ मानला जातो. आकडेवारीनुसार, जगातील एकूण विमान अपघातांपैकी सुमारे ३५ टक्के अपघात टेकऑफ दरम्यान किंवा त्यानंतर होतात. ‌‘टेकऑफ‌’नंतर हा दर लक्षणीयरीत्या कमी होतो. टेकऑफदरम्यान विमान जमिनीवरून उच्च वेगाने उड्डाण घेते. या काळात पायलटला धावपट्टी, इंजिन, हवामान आणि विमानाच्या यंत्रणेवर बारकाईने लक्ष ठेवावे लागते, कारण उड्डाणकाळात हे घटक सर्वाधिक महत्त्वाचे असतात.


टेकऑफच्या वेळी इंजिन कमाल क्षमतेने काम करत असते. अशा परिस्थितीमध्ये इंजिनमधील कोणत्याही प्रकारचा तांत्रिक बिघाड (जसे की पक्षी धडकणे, इंधन दाबाची समस्या किंवा उत्पादन दोष) त्वरित अपघातास कारणीभूत ठरू शकतो. त्याचबरोबर ‌‘टेक ऑफ‌’दरम्यान पायलटची चूक हे विमान अपघाताचे एक प्रमुख कारण असू शकते. पायलट स्वत: पिच अँगल, वेग किंवा रनवे लिफ्ट ऑफ पॉइंटबद्दल चुकीचा निर्णय घेतो तेव्हा परिस्थिती गंभीर होऊ शकते. बहुतेक विमान अपघात टेकऑफ आणि लँडिंगदरम्यान होणाऱ्या मानवी चुकांमुळे होतात. थोडक्यात, हवामानाची साथ नसेल, तर विमानप्रवास धोक्यात येऊ शकतो. ‌‘टेक ऑफ‌’दरम्यानच्या विमान अपघातात तांत्रिक बिघाडदेखील महत्त्वाची भूमिका बजावू शकतात. विमानाच्या लँडिंग गियर, ऑटोथ्रॉटल सिस्टीम, हायड्रॉलिक्स किंवा एअरस्पीड इंडिकेटरमधील कोणत्याही बिघाडामुळे अपघात होऊ शकतो. टेकऑफ आणि लँडिंगदरम्यान दुरुस्तीसाठी खूप कमी वेळ असल्यास सिस्टीममधील कोणताही बिघाड अत्यंत धोकादायक ठरू शकतो.


एअर इंडियाच्या ताज्या विमान अपघाताची अधिकृत कारणे तपासांती समोर येतीलच. मात्र या अपघातामुळे अनेक प्रश्न निर्माण झाले. विमान उद्योगाशी संबंधित अनेक तज्ज्ञांनी विमान ६०० फुटांपेक्षा जास्त उंचीवर होते तेव्हा लँडिंग गियर खाली का ठेवण्यात आले हा प्रश्न उपस्थित केला. विमानउड्डाण करताच लँडिंग गियर वर येतो. मात्र अपघातग्रस्त विमानाचा लँडिंग गियर खालीच असल्याने इंजिनमध्ये बिघाड झाल्याचे आधीच आढळून आले असण्याची शक्यता नाकारता येत नाही. विमान टेकऑफ केल्यानंतर अचानक वेगाने खाली आल्याचे व्हायरल व्हीडिओमध्ये दिसून आले आहे. हवेत कोणताही स्फोट झालेला नाही. पायलटचा ‌‘मेडे कॉल‌’ हा एक संकेत असतो. ही आपण अडचणीत असल्याची आणि तत्काळ मदत मागणारी विनंती असतेच; त्याचबरोबर याद्वारे ‘क्रू’लाही समस्येची जाणीव करून दिली जाते. त्यांनी पुढे येणारी परिस्थिती हाताळण्यासाठी सज्ज राहण्याचा संदेश याद्वारे मिळतो; परंतु विमानचालकाच्या या कॉलला उत्तर देण्यापूर्वीच ते अपघातग्रस्त झाले. मदत मिळवण्यात अयशस्वी ठरल्याने अनेकांना जीव गमवावे लागले.


पक्षी किंवा पक्ष्यांचा थवा विमानाला आदळण्याचा प्रश्न लक्षात घेतला, तर ही शक्यताही नाकारता येत नाही; परंतु मोठा पक्षी किंवा पक्ष्यांचा थवा असेल तरच हे शक्य आहे. याचे कारण विमानतळाभोवती दुर्बिणीद्वारे पक्ष्यांच्या हालचालींचे निरीक्षण केले जात असते. त्यामुळे खूप पक्षी असतील तरच टक्कर होण्याची शक्यता असते. पक्ष्यांच्या टकरीमुळे एका इंजिनने काम करणे थांबवले असेल आणि दुसरे इंजिन नादुरुस्त झाले असेल, अशीही एक शक्यता आहे.


तसे पाहिले तर विमानाने उड्डाण करण्यापूर्वी सर्व उपकरणे तपासली जातात. ‌‘ड्रीमलाइनर‌’चा तपासणी इतिहास बोईंगशी शेअर केला जातो. हे एक प्रगत विमान आहे. त्यात तांत्रिक बिघाड होण्याची शक्यता कमी आहे. इथे लक्षात घेण्यासारखी आणखी एक बाब म्हणजे विमान शेवटच्या क्षणापर्यंत नियंत्रणात होते. पायलटने इमारतीला होणारी धडक वाचवण्याचाही प्रयत्न केला; परंतु ते पुढे जाऊ शकले नाही. म्हणजेच विमानाची दोन्ही इंजिन्स नादुरुस्त झाली होती. यामुळे विमानाचा वेगही कमी होता. एव्हिएशन सेफ्टी नेटवर्कच्या माहितीनुसार २००९ मध्ये सेवेत आल्यानंतर ड्रीमलायनर विमानाचा हा पहिलाच अपघात आहे. पण त्याने शिकवलेला धडा मात्र खूप मोठा आहे.


आता वर स्पष्ट केलेल्या सर्व शक्यता लक्षात घेऊन अपघाताची नेमकी कारणे शोधण्यासाठी चौकशी सुरू झाली आहे. मात्र या घटनेने पुन्हा एकदा हवाई सुरक्षेचे महत्त्व आणि उड्डाणाच्या प्रत्येक टप्प्यावर घ्यावयाच्या खबरदारीचे महत्त्व अधोरेखित केले आहे. या अपघातातील २७५ जणांचे मृतदेह हाती आले. या अपघाताची भीषणता रस्त्यांवर विखुरलेल्या मृतदेहांवरूनही समजण्याजोगी होती. अचानक इतक्या गंभीर जखमींवर उपचार करताना, मृतदेहांची ओळख पटवताना, डीएनए टेस्ट करुन आप्तेष्टांकडे मृतदेह सोपवताना प्रशासकीय यंत्रणेवर किती ताण आला असेल, हे आपण समजू शकतो. अपघातामुळे घटनास्थळाचे तापमान इतके वाढले होते की, त्यामुळे सुरूवातीला बचावकार्यात मोठ्या अडचणी आल्या. या अपघातापासून धडा घेत काम केले जाईल आणि नाहक मनुष्यहानी होणार नाही, अशीच आशा करु या.


बदलत्या काळात जगण्याच्या कक्षा रुंदावत आकाशाला भिडल्या खऱ्या, पण आभाळच फाटल्यावर काय होते हे ताज्या विमान अपघाताने दाखवून दिले. भीषण अपघातात प्रवासी गेलेच, पण काम संपवून जेवायला बसलेल्या युवकांनाही जीव वाचवणे अवघड झाले. भयावह धडक, आगीचा लोळ आणि ओळखही पटू नये अशा अवस्थेतील विखुरलेले मृतदेह हे चित्र सध्या मरण सगळ्यात स्वस्त असल्याचे वास्तव समोर आणणारे आहे.
Comments
Add Comment