
(२६ जून कालिदास दिनाच्या निमित्ताने...)
विशेष : लता गुठे
स्कृत साहित्यातील सर्वोत्कृष्ट काव्यांमध्ये ‘मेघदूत’ हे कालिदासाचे एक अमर काव्य मानले जाते. मेघदूत ही केवळ एक काव्यकृती नसून ती प्रेम, विरह, निसर्ग आणि सौंदर्य यांच्या अभिव्यक्तीची सर्वोच्च शब्दसंहिता आहे असे मला वाटते. या काव्याच्या माध्यमातून कालिदासाने दूतकाव्य या प्रकाराची निर्मिती केली. हे एक खंडकाव्य असून यामध्ये एक यक्ष मेघाला आपला दूत बनवून आपल्या पत्नीला निरोप पाठवतो, ही कल्पना आहे.
मला समजलेल्या या श्लोकाचा अर्थ आणि त्यावरून कवी श्रेष्ठ कालिदास यांच्याविषयी माहिती आपल्यापर्यंत पोहोचवावी वाटली...
आषाढस्य प्रथम दिवसे मेघमाश्लिष्टसानुं
वप्रक्रीडपरीतदिशं
स्पोर्टयन्तं रसालम्।
गन्तुं वाञ्छत्येष पवनपथात्रयित्वा
सद्यः खिन्नं श्रवणकठिनं वर्तते
तस्य चित्तम्॥
श्लोकाचा अर्थ - आषाढ महिन्याच्या पहिल्या दिवशी, पर्वताच्या पायथ्याशी असलेल्या मेघाला आलिंगन देऊन, रसाळ वृक्षांना स्पर्श करत, वाऱ्याच्या मार्गाने जाण्याची इच्छा असलेला यक्ष, आपल्या खिन्न आणि कानी कठोर वाटणाऱ्या अंतःकरणाने व्याकूळ झाला आहे. का व्याकुळ झाला आहे तर? आषाढ महिन्यातील दाटून आलेले ढग, पावसाच्या सरी, सुंदर वातावरण या वातावरणामध्ये कशाला त्याच्या प्रेयसीची सखीची आठवण होते आणि त्या आठवणीने तो व्याकुळ होतो अशा वेळेला तो मेघालाच आपला दूत बनवून दूर असलेल्या प्रिय सखीकडे निरोप पाठवतो... या छोट्याशा एका घटनेवर आधारलेले हे मेघदूत महाकाव्य अतिशय रोमांचकारी असे आहे. यक्ष मेघाकडे संदेश पाठवतो तेव्हा मेघ त्याला विचारतो, तुझ्या प्रियेला मी ओळखत नाही मग हा संदेश मी कोणाला देऊ? त्यावेळेला यक्ष तिचे
वर्णन करतो...
मेघदुताच्या कथानकाचा सारांश: मेघदूत हे दोन भागांमध्ये विभागले आहे. पूर्वमेघ आणि उत्तरमेघ. यामध्ये जो यक्ष आहे, तो कुबेराचा सेवक आहे, त्याने आपले कर्तव्यपालन न केल्यामुळे एक वर्ष हिमालयातील रामगिरी पर्वतावर निर्वासित होण्याची शिक्षा मिळते. तिथे राहून त्याचे मन आपल्यापासून दूर असलेल्या पत्नीच्या आठवणींमध्ये रमते. आषाढ महिन्यातल्या पहिल्या दिवशी आकाशात भरून आलेले मेघ दिसतात आणि त्याच क्षणी यक्षाच्या मनात विचार येतो-“या मेघाला दूत बनवून मी माझ्या पत्नीला संदेश का
पाठवू शकतो?”
त्यांच्यामध्ये काय बरं संवाद
झाला असेल?
माझ्या कल्पनेतून या संवादाची मी निर्मिती केली आहे ती अशी...
हिरव्यागार वनराईने नटलेला रामगिरी पर्वत. आजूबाजूला विविध रंगी फुलांनी नटलेल्या वेली आहेत. पाऊस येण्याचे चिन्ह दिसत आहे. वारा पावसाचा निरोप घेऊन आला आहे. घरट्यातील पक्षांचा किलबिलाट सुरू आहे... याकडे या यक्षाचे अजिबात लक्ष नाही, तो एका दगडावर बसून आकशाकडे पाहत आहे...
यक्ष स्वतःशीच बोलत आहे... ‘कशी असेल माझी प्रिया? तिलाही माझी आठवण येत असेल का? ही विरह यातना किती विलक्षण आहे. तिच्या आठवणी मला दिवस-रात्र व्याकुळ करतात. माझी ही अवस्था तिला कळत असेल का? काय करू काही सुचत नाही... आज या काळ्या सावळ्या मेघांमध्येच का बरं मला तिचा भास होत आहे.’
त्याच्या मनातील हे विचार त्याला अधीर करतात आणि आकाशाकडे पाहून तो हात जोडून ढगाला विनंती करतो, ‘‘हे मेघराज, फक्त आता तूच माझी मदत करू शकतोस. माझा संदेश घेऊन माझ्या प्रियेकडे गेलास, तर माझ्यावर खूप उपकार होतील.” त्याच क्षणी एक ढग यक्षाच्या समोर येऊन उभा राहतो...
“हे मेघराजा, तू या आषाढमासात माझ्यासमोर प्रकट झालास, म्हणजे हा नुसता योगायोग नाही. तूच माझ्या भावनांचा वाहक व्हावास अशी मी तुला विनंती करतो हे मान्य करशील?”
“ हो मी तुझी मदत करायला तयार आहे. सांग तुझा संदेश काय आहे तो...”
“ हे मेघराज, माझ्या प्रिय सखीकडे जा. ती अलकानगरीत राहते. तिला माझा संदेश दे. ती माझ्यासारखी विरहानी व्याकूळ होऊन माझी वाट पाहत असेल. मृगनयनी माझी प्रिया तिच्या डोळ्यांत माझ्या आठवणींत व्याकुळत असेल.”
“मी तुझ्या भावना समजू शकतो, पण माझ्याकडे शब्द नाहीत. तुझा संदेश मला दे. मी तो घेऊन जातो; परंतु मला तुझी अलकानगरी माहीत नाही. तिचे जर वर्णन तू केलेस तर मी तिथे पोहोचू शकेन.’’
“थांब, मी तुला मार्ग सांगतो त्याप्रमाणे तू जा. पुढे गेलास की नर्मदा नदीचे पात्र लागेल. त्यानंतर विंध्य पर्वत असेल तो ओलांडून पुढे गेलास की, उज्जैन, माळवा, चंबळ आणि पुढे हिमालय ओलांडत अलकानगरी. माझी नगरी आहे तिथे. माझी प्रिय सखी यक्षिणी राहते. तू आकाश मार्गाने जाताना तुझ्या सौंदर्याने सारा परिसर आल्हादित होईल. माझी प्रिया दिसली की, तिला हा संदेश दे, (एका मोठ्या वृक्षाच्या पानावर यक्ष काही ओळी लिहितो आणि मेघाला वाचून दाखवतो... तिला सांग, माझ्या हृदयात अजूनही तुझ्याच आठवणी आहेत. तुझ्याशिवाय मला क्षणभरही चैन पडत नाही. तिच्या सहवासातील मधूर आठवणी माझ्याजवळ आहेत. त्या आठवणीवरच माझं हे वर्ष संपेल आणि मी लवकरच तुला भेटायला येईल. तुझ्या सौंदर्याची मोहिनी आजही माझ्या मनात आहे.
हे मेघराजा. माझ्या प्रेयसीकडे हे पत्र घेऊन जा आणि निघताना तिला आवर्जून सांग... की जरी मी दूर असलो, तरी प्रत्येक क्षणी मी तिच्याच सोबत आहे.”
यक्षाचा संदेश घेऊन मेघ जातो आणि त्याचे ‘मेघदूत’ हे महाकाव्य तयार होते, हे फक्त एक प्रेमकाव्य नाही; तर ते कालिदासाच्या कल्पनाशक्तीचे शिखर आहे, असे मला वाटते. हे महाकाव्य प्रत्येक विराहानी व्याकूळ झालेल्या स्त्री-पुरुषाचे प्रतिनिधित्व करते. कालिदास हे शब्दप्रभू असल्यामुळे त्यांनी वर्णन केलेल्या या शब्दांच्या महाजाळामध्ये वाचक अडकून पडतो. अनेक भाषांमध्ये झालेले अनुवाद हे अनेक कवींच्या प्रतिभेला ......अवाहच होते. संस्कृत विषयाची उत्तम जाण असलेल्या शांता शेळके यांनी मेघदुताचा खूप सुरेख मराठी अनुवाद केला आहे. हा पद्य अनुवाद म्हणजे, मेघदूत महाकाव्याचे एक अत्यंत प्रभावी व भावनापूर्ण रूप आहे. १९९४ साली हा अनुवाद केला, ज्यामध्ये त्यांनी ‘पादाकुलका’ या छंदाचा वापर करून संस्कृताच्या मूळ भाषासौंदर्याला मराठी रसात वाचकांच्या समोर उभे केले, म्हणून आमच्यासारख्या रसिक कवींना त्याचा आस्वाद घेता येतो. खरंतर मेघदूत हे आपल्या संस्कृतीचे एक अनमोल शब्द भांडार आहे.