Saturday, June 21, 2025

आषाढ : मनोकामना पूर्ण करणारा महिना

आषाढ : मनोकामना पूर्ण करणारा महिना

विशेष : मृणालिनी कुलकर्णी


जेव्हा जुलैमध्ये सूर्य कर्क राशीत प्रवेश करतो तेव्हा हिंदू पंचागानुसार आषाढ हा वर्षातील चौथा महिना सुरू होतो. आषाढ महिन्याच्या पौर्णिमेच्या आसपास चंद्र पूर्वाषाढा किंवा उत्तराषाढा नक्षत्राच्या जवळ असतो म्हणून या महिन्याला आषाढ किंवा आखाड असे म्हणतात.


आषाढात मान्सून पावसाला सुरुवात होते. असे बोलतात, ‘आषाढात पावसाला अडथळा नाही म्हणजे एकदा पाऊस सुरू झाला की, तो रोखता येत नाही.’ ग्रीष्म ऋतूमुळे हवेत खूप उष्मा असतो, वातावरण तापलेले असते. आषाढात पावसाच्या आधी आकाश काळ्या ढगांनी झाकोळले जाते. या दाटलेल्या घनगर्द काळ्या मेघालाच ‘आषाढ घन’ म्हणतात. अशावेळी वातावरण कुंद होते. अचानक सुटणाऱ्या जोरदार वाऱ्याने मेघ फुटतो आणि आषाढ सरी बरसू लागतात. हा तापलेला निसर्ग आषाढ सरीने शांत होतो. वातावरण थंड होते. शेतीसाठी आवश्यक तेवढा ओलावा जमिनीत राहिल्याने शेतातल्या पेरणीसाठी आषाढ पाऊस चांगली परिस्थिती निर्माण करतो. शेतकरी खरीप पिकाची पेरणी करण्याच्या तयारीत असतात. आषाढात पेरलेल्या बियांचे भरणं पोषण आषाढातील सरीवर होते, म्हणून आषाढाला ‘सृजनाचा महिना’ म्हणतात. निसर्गातील विविध सृजनाचा अाविष्कार पाहण्यासाठी कवी बा. भ. बोरकर मेघाला म्हणतात, थोडावेळ थांब, ‘मला हिरवीगार शेते, पोवळ्याच्या लाल रंगाच्या मातीत चालणारे नांगर, पाचूची बेटे... निसर्गातील ताजेपण, हे सारे मला पाहू दे. आषाढात प्रत्येक घरांत तळण तळले जाते. …“आषाढात पेरावं आणि भाद्रपदात काढावं’. शेतकरी जीवनातील पेरणी-कापणीचे चक्र सूचित करणारी ही म्हण.


आषाढ महिन्याच्या पहिल्याच दिवशी आकाशात हत्तीच्या आकाराचा काळ्या रंगाचा पाण्याने भरलेला पावसाळी मेघ पाहून, चौथ्या शतकांत कवी कालिदासाने ‘‘मेघदूत’’ हे सुंदर खंडकाव्य मंदाक्रांता वृत्तात (मंद + अक्रांता) लिहिले आणि ते जगात अजरामर झाले. त्याची सुरुवात “आषाढस्य प्रथम दिवसे... ” या शब्दांनी होते. त्यामुळे महाकवी कालिदासाचा जन्म आषाढ शुद्ध प्रतिपदेला झाला, असे मानले जाते आणि तो दिवस ‘कालिदास दिन’म्हणून साजरा केला जातो. रामटेक येथील स्मृतिस्थळाला लोक भेट देतात. कवी कालिदास हे प्राचीन भारतातील एक महान संस्कृत कवी आणि नाटकार होते, म्हणून त्यांना कविकुलगुरू असे ओळखले जाते.


आषाढ महिन्याला कृषी, साहित्याबरोबरच, धार्मिक, सांस्कृतिक, दृष्ट्याही फार मोठे महत्त्व आहे. आषाढाचे धार्मिक महत्त्व म्हणजे हा भगवान विष्णूचा महिना ! या महिन्यात भक्त भगवान विष्णूची उपासना, नामस्मरण, ‘ओम नमो भगवते वासुदेवाय !’ हा मंत्रही जपतात. आषाढी एकादशी (देवशयनी एकादशी)पासून भगवान विष्णू चार महिन्यांसाठी योग निद्रेला पातळात जातात. म्हणून या काळात मंगलकार्ये केली जात नाहीत. दुसरीकडे आषाढ महिन्यातील सांस्कृतिक परंपरा लाभलेली आषाढी एकादशी! ज्ञानदेव तुकारामाच्या जयघोषात, अभंग गात अनेक ठिकाणाहून तीन आठवडे पायी चालणारे वारकरी, वारकरी संप्रदायासह इतरही अनेक विठ्ठलमाऊलीच्या दर्शनासाठी वेडे झालेले भाविक आषाढी एकादशीला पंढरपूरला येतात. अध्यात्मिक आणि धार्मिक दृष्टिकोनातून आषाढातील आषाढी एकादशीला खूप महत्त्व आहे.
आषाढातील आषाढ पौर्णिमा हा दिवस भारतीय परंपरेतील एक विशेष महत्त्वाचा दिवस आहे. महाभारतकार आणि वेदाचे निर्माते महर्षी व्यास यांचा जन्मदिवस म्हणून ‘व्यास पौर्णिमा’ ! महर्षी व्यासाच्या शिष्यांनी हा दिवस गुरुपौर्णिमा म्हणून साजरा करण्याची परंपरा सुरू केली. ज्ञानाच्या सर्व क्षेत्रांत महर्षी व्यास पारंगत होते. म्हणूनच व्यास गुरूंना ‘आद्य गुरू’ असेही म्हटले जाते. भगवान बुद्धाने आषाढ पौर्णिमेला पहिले प्रवचन दिले असे म्हणतात. तेच ‘धर्मचक्र प्रवर्तन’ होय. म्हणून बौद्धधर्मीयही आषाढी पौर्णिमेला भगवान बुद्धांना नमन करतात.


आषाढ महिन्याच्या शेवटच्या दिवशी जी तिथी येते तिला आषाढ अमावास्या किंवा दिव्याची अमावास्या (आवस) असे म्हटले जाते. जरी अमावास्या असली तरी त्या दिवसाचे पावित्र्य जपले जाते. घरातील सारे तेल-तुपाचे दिवे लावले जातात. त्या दिवशी दिव्याची पूजा करून घरात सर्वांना ओवाळले जाते. या दिवशी सुख-समृद्धीसाठी आणि उत्तम आरोग्यासाठी दिव्याजवळ प्रार्थना करतात आणि पुढे येणाऱ्या सणाचे स्वागत करतो. अशा या आषाढ महिन्यांत पावसामुळे शेतकरी, विठुरायाच्या दर्शनाने भक्त वारकरी सुखावतात. महाकवी कालिदास आणि महर्षी व्यासमुनींचा (साहित्य आणि ज्ञान) जन्मदिवस! असा हा सर्वांच्या मनोकामना पूर्ण करणारा सृजनशील आषाढ महिना!

Comments
Add Comment