Friday, June 20, 2025

जागतिक योग दिन आणि निरोगी जीवनशैली

जागतिक योग दिन आणि निरोगी जीवनशैली

वर्षा हिवराळे


भारताची मूळ संस्कृती योग आहे. ही योग संस्कृती लोप पावत गेली. या योग संस्कृतीला पुनः जीवित करण्यासाठी भारताचे पंतप्रधान, नरेंद्र मोदी यांनी दिनांक २७ सप्टेंबर, २०१४ रोजी संयुक्त राष्ट्र महासभेच्या ६९ व्या सत्राला संबोधित करताना वर्षामधील एक दिवस हा ‘आंतरराष्ट्रीय योग दिवस’ साजरा करण्याचे आवाहन केले व दिनांक ११ डिसेंबर, २०१४ रोजी संयुक्त राष्ट्र महासभेच्या १९३ सदस्यांपैकी १७७ सदस्य देशांनी २१ जून रोजी ‘आंतरराष्ट्रीय योग दिवस’ आयोजित करण्याच्या ठरावाला मान्यता दिली. तसेच प्रत्येक वर्षी आंतरराष्ट्रीय योग दिवसाची थीम ठरविलेली असते. या वर्षी १० वा आंतरराष्ट्रीय योग दिन आपण साजरा करत आहोत. या वर्षी आंतरराष्ट्रीय योग दिवसाची ‘एक पृथ्वी आणि एक आरोग्यासाठी योग’ ही थीम ठरविलेली आहे. जागतिक आरोग्यासाठी आणि पर्यावर्षीय सुसंवादासाठी योगाच्या योगदानावर भर देते. म्हणजेच योगाद्वारे संपूर्ण जग निरोगी बनविण्याची इच्छा ‘एक पृथ्वी आणि एक आरोग्यासाठी योग’ या थीमद्वारे स्पष्ट दिसून येते.


योग ही प्राचीन भारतीय विद्या, संस्कृती आहे. ही संस्कृती वेद, उपनिषद, रामायण व महाभारत इतकेच नाही, तर भारतातील समस्त अध्यात्मिक पवित्र ग्रंथांमध्ये याचा समावेश आहे. साक्षात देवांनाही योग सुटला नाही. योगाचे आदिगुरू, प्रथमगुरू ‘शिव’. शिवाने पार्वतीला योग सांगितला, अशी आख्यायिका आहे, पण आदिगुरू शिव आहे. आदिगुरूंनी ही योगविद्या सप्तऋषींना दिली. या सप्तऋषींनी या योगविद्येचा प्रसार आशिया खंडात, तसेच जगातील अनेक भागांत केला. पुढे वैदिक काळात महामुनी पतंजलींनी योग या विषयाला योगसुत्रात सूत्रबद्ध केले. योग या शब्दाची उत्पती कशी झाली? योग म्हणजे नक्की काय? योग या शब्दाची उत्पती प्राचीन काळी झाली. योग हा शब्द संस्कृत युज या धातूपासून तयार झालेला आहे. योग म्हणजे जोडणे, एकत्र आणणे, काय एकत्र आणणे, तर शरीर आणि मन यांना एकत्र आणणे, दुःखाला सुखासोबत जोडणे, आत्म्याला परम्यात्मासोबत जोडणे. आत्मा हा स्वयंप्रकाशित आहे. आत्म्याचा हा ईश्वरीप्रकाश अनुभव करावयाचा असेल, तर योगाची साधना करणे
आवश्यक आहे.


योग साधनेत वयाला बंधन नाही. योग काय करतो? तर शरीर आणि मन जोडण्याचे काम करतो. योगशास्त्रात शरीर, मन आणि आत्मा या तीन संकल्पनांना महत्त्व आहे. योगशास्त्र हे मनाभोवती फिरणारे शास्त्र आहे. आजच्या धावपळीच्या जीवनात आपण कोठे आहोत? हे एकदा डोकावून बघा. वरील मुद्यांचा विचार करा. बघा काही उत्तर मिळते का? नाही ना! जेव्हा आपल्याला म्हणजेच शरीराला, मनाला काही वेदना, व्याधी निर्माण झाली की आपण काय करतो? आपण डॉक्टरांकडे जातो. डॉक्टरांनी दिलेले औषधी आपण घेतो आणि आपल्याला बरे वाटते. बरं शरीराला व्याधी झाली, तर औषधी आणि मनाला व्याधी झाली तर काय? यासाठी योग व योगासने, प्राणायाम आणि ध्यान करणे आवश्यक आहे. आजचे धावपळीचे आयुष्य पाहता, अनेक ताणतणाव यास आपल्याला सामोरे जावे लागते. मनावर ताण निर्माण झाला की मधुमेह, उच्च रक्तदाब, थायरॉईड यासारखे विकार उद्भवतात आणि शरीरावर ताण निर्माण झाला की कंबरदुखी, पाठदुखी, मानदुखीचा त्रास आपल्याला होतो. वास्तविक पाहता, ९५ टक्के आजार हे सायकोसोम्याटीक आहेत. उरलेले ५ टक्के हे आजार हे शारिरीक आहेत.


प्राचीन काळी योग करणे हे सभ्यतेचे लक्षण मानले जाई, का तर गुरू गोरक्षनाथ, मच्छेंद्रनाथ, या नाथ सांप्रदायांनी योग आचरण करून अनेक विकारांना दूर ठेवले. स्वतः व समाजातील लोकांना योग जीवनशैली कशी अंगीकारायची हे शिकवले. पुढे संत ज्ञानेश्वर महाराज, संत तुकाराम या संतांनी भक्तीयोगातून योगसाधना केली व ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी लिहिली. तसेच पतंजली महामुनींनी सर्वसामान्य व्यक्तीला समजेल असा अष्टांगयोग सांगितला. हा अष्टांगयोग यम, नियम, आसन, प्राणायाम, धारणा, ध्यान, समाधी होय. आजच्या धावपळीच्या जीवनात आपल्याला योग समजून घ्यायचा असेल, शिकायचा असेल तर पतंजलींचा योग अभ्यासावा. हा योग अभ्यास सहज सोपा आहे. आजचा महिलावर्ग हा घरात आणि घराबाहेर धावपळ करून काम करत असतो. हे काम करत असताना महिला वर्गाची होणारी चीडचीड, द्वेष, राग आणि याच्यातून उत्पन्न होणारे आजार, जसे वजन नियंत्रणात न राहणे, निद्रानाश, थायरॉईड, पीसीओडी, लोहाची कमतरता, मोनोपॉज या गोष्टी कळत -नकळत यातून महिला वर्गाचा प्रवास होत राहतो. औषधोपचार करून या आजारांना काही काळ दाबलं जात. कालांतराने परत हे आजार उफाळून वर येतात. या विकारांना मग ते शारिरीक असो किंवा मानसिक असो, त्या विकारांना नष्ट करायचे आहे. निरोगी जीवनशैली जगायची आहे. त्यासाठी पतंजली मुनींचा अष्टांगयोग समजून घेऊन योगसाधना सुरू करू या.


समाजातील जे संघर्ष चालू आहेत ते पतंजलींनी सांगितलेल्या अष्टांग योगातील ‘यम’ या अंगाच आचरण करून आपण टाळूया. ‘यम’ तत्त्वात अहिंसा, सत्य, अत्सेय, ब्रह्मचर्य व अपरीग्रह ही पाच तत्त्व येतात. या पाच तत्त्वांचे पालन केल्यास बाह्य संघर्ष आपण टाळू शकतो. पुढचे अंग आहे ‘नियम’. या नियमामध्ये शौच, संतोष, तप, स्वाध्याय, ईश्वरप्रणिधाण या पाच तत्त्वांचे पालन केले, तर आपल्या अंतर्गत असलेले संषर्घ दूर होतात. ही दोन तत्त्वे आपल्याला समाजात व स्वतःशी कसे वागायचे हे शिकविते. योगरूपी इमारतीचा पाया ‘यम’ व ‘नियम’ ही दोन तत्त्वे आहेत. या दोन तत्त्वांच्या अभ्यासाने पुढे आपण शरीर आणि मनाला स्थिर करू. हे स्थिर झालेले शरीर आणि मन पुढे आसन करण्यासाठी तयार होतं. अष्टांग योगातील तिसरे अंग ‘आसन’ हे आहे.


आपला शरीर स्वभाव हा ताठर असतो. आसने करताना सुरुवातीला शरीराला पुढे, मागे वाकवणे जमत नाही, पण आसनाच्या सरावाने आपल्या शरीर आणि मनाला लवचिकता येते. आसनामध्ये शरीराचे जे वेगवेगळे आकार होतात, त्या आकारामध्ये आपल्या शरीरावर खूप चांगले परिणाम दिसून येतात. उदा. अपचन, गॅसेस या पोटाच्या समस्या आहेत, तर पवनमुक्तासन हे ‘आसन’ केले तर पोटाला होणारा त्रास हळूहळू कमी होईल. पवनमुक्तासनात पोटावर दाब येतो व या दाबामुळे अंतर्गत क्रिया घडून येते. आपल्या आतड्यांवर या दाबाचा परिणाम होतो. पोटात वायूचा जो अवरोध होतो त्याला अपानमार्गाद्वारे दूर केले जाते. ‘भूजंगासन’ हे थायरॉईड, मणक्याचे विकार, पाठदुखी, मानदुखी यावर उपयोगी आहे, तर ‘पर्वतासन’ हे श्वसन समस्येसाठी उपयोगी आहे. त्यामुळे रोज आसने केली, तर नक्कीच अनेक आजारांना आपण दूर ठेवू शकतो. ‘प्राणायाम’ हे चौथे अंग आहे. ‘प्राणायाम’ या अंगाचा अभ्यास केला असता शरीर ऊर्जावान होते. ‘प्राणायाम’ म्हणजे प्राणाचा आयाम वाढवणे. या प्राणशक्तीचा संचय वाढविण्यासाठी दीर्घश्वसन, अनुलोम विलोम, भ्रामरी या प्राणायामाचा अभ्यास करावा. ‘प्रत्याहार’ हे पाचवे अंग आहे. ‘प्रत्याहार’ म्हणजे इंद्रियाचा प्रती आहार. वरील चार अंग आपण अाचरणात आणली की ‘प्रत्याहार’ या अंगाचा अभ्यास आपोआप व्हायला लागतो. पुढे आपले मन हे धारणेसाठी तयार होते. ‘धारणा’मध्ये आलंबनावर मन स्थिर करणे. हे आलंबन म्हणजे एखादी वस्तू, चित्र, मूर्ती याद्वारे चित्ताला एकाग्र करणे आणि यातून पुढे ध्यान साधने, ‘ध्यान’ हे अष्टांगयोगातील सातवे अंग आहे. ‘ध्यान’ म्हणजे एकाग्रता, मनाला धारणेवर स्थिर करून ध्यानाकडे नेणे. या ध्यानातून आत्मप्रकाश बघणे. ही दिव्यदृष्टी अनुभवणे. यातूनच पुढे शेवटचे अंग म्हणजे समाधीपर्यंत पोहोचणे. येथे समाधीचा अर्थ म्हणजे देहत्याग नव्हे, तर जेव्हा शरीराची व मनाची शून्य अवस्था गाठली जाते ती समाधी अवस्था होय. आपण आपल्या चांगल्या-वाईट कर्मांमध्ये एवढे बांधले गेलेलो आहोत, की शरिराची व मनाची शुन्य अवस्था अनुभव व्हायला खूप योगसाधना करावी लागते. ही साधना साध्य होण्यासाठी अष्टांगयोगातील काही अंगाचा अभ्यास सुरू करावा. जसे की, यम, नियम, आसन, प्राणायाम, ध्यान. २१ जून या आंतरराष्ट्रीय योग दिनापासून योगाचा अभ्यास सुरू करून निरोगी जीवन जगण्याचा संकल्प करूया.


(योग शिक्षिका,आयुर्वेद महाविद्यालय व शेठ र. व. आयुर्वेद रूग्णालय, शीव, मुंबई)

Comments
Add Comment