Saturday, June 21, 2025

कोणी युती करताय का युती?

कोणी युती करताय का युती?

उबाठा सेनेची अगतिकता...


स्टेटलाइन : डॉ. सुकृत खांडेकर


एकनाथ शिंदे यांनी तीन वर्षांपूर्वी बंडाचा झेंडा फडकवल्यापासून उबाठा सेनेची सतत घसरण व अधोगती बघायला मिळत आहे. राहुल गांधी व शरद पवार यांच्या मदतीने उद्धव ठाकरे यांनी राज्याचे मुख्यमंत्रीपद मिळवले. पण अडीच वर्षांतच त्यांना एककल्ली वागणुकीमुळे सर्वोच्चपदावरून पायउतार व्हावे लागले. राज्याची सत्ता गेली. पक्षाचे नाव, चिन्हही गेले आणि देशातील सर्वांत श्रीमंत असलेल्या मुंबई महापालिकेतील सत्तेलाही ग्रहण लागले. मुंबई महापालिकेवर अविभाजित शिवसेनेने शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या पुण्याईने पंचवीस-तीस वर्षे सत्ता उपभोगली. पण शिवसेनाप्रमुखांच्या हयातीनंतर पक्षाला मोठी गळती लागली. चार महिन्यांवर राज्यात महापालिका, जिपच्या निवडणुका अपेक्षित आहेत. वाट्टेल ते करून मुंबई महापालिकेची सत्ता कशी मिळवायची, या प्रश्नाने उबाठा सेनेतील नेत्यांची व पक्षप्रमुखांची झोप उडाली आहे. उबाठा सेनेतील बहुतेक सर्व दिग्गज नेते शिवसेनेत किंवा भाजपात गेले आहेत. शिल्लक सेनेला बरोबर घेऊन पुन्हा सत्ता मिळवता येणार नाही, याची उद्धव ठाकरे यांना पूर्ण जाणीव आहे, म्हणूनच राज ठाकरे यांच्या मनसेने महापालिका निवडणुकीसाठी उबाठा सेनेशी युती करावी म्हणून त्यांना आळवणी करण्याची पाळी उद्धव यांच्यावर आली आहे.


गेले दोन-तीन महिने उबाठा सेनेकडून मनसेचे लक्ष वेधण्यासाठी सतत प्रयत्न केले जात आहेत. उबाठा सेनेच्या मुखपत्रातून उद्धव व राज एकत्र असलेले छायाचित्र प्रसिद्ध करून जणू दोघे बंधू आता मनाने एकत्र आलेले आहेत, अशी हूल उठविण्यात आली. राज ठाकरे यांनी वेगळा पक्ष स्थापन केल्यापासून कधी नव्हे ते उद्धव यांना त्यांची राजकीय गरज भासू लागली आहे. उबाठा सेनेच्या सैनिकांनाही उद्धव - राज एकत्र येणार, म्हणून पक्षातून मधाचे बोट लावण्यात आले आहे. दि. १९ जूनला शिवसेना पक्षाचे दोन वर्धापन दिन मुंबईत साजरे झाले. उद्धव ठाकरे यांच्या पक्षाचा वर्धापन दिन शीव येथील षण्मुखानंद सभागृहात, तर एकनाथ शिंदे यांच्या पक्षाचा वरळी डोममध्ये साजरा झाला. या दोन्ही मेळाव्यात मनसेची संभाव्य युती हा कळीचा मु्द्दा राहिला. महापालिका निवडणुकीत राज ठाकरे कुणाबरोबर जाणार की स्वबळावरच लढणार? हे अद्याप गूढ आहे. ते स्वत: या विषयावर काहीच बोलत नाहीत. पण युतीचा मुद्दा निघाला की त्यांचे शिलेदार इतकी वर्षे उद्धव ठाकरे यांनी मनसेला कशी वागणूक दिली असा प्रश्न विचारून अनेक उदाहरणांचा पाढा उगाळतात. उबाठा सेना व मनसे यांच्या युतीच्या चर्चेला उधाण आले असतानाच मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुंबई पश्चिम उपनगरातील पंचतारांकित हॉटेलमध्ये भेट घेतली आणि उबाठा सेनेबरोबर युतीच्या चर्चेला तडा गेला. षण्मुखानंद सभागृहातील मेळव्यात उद्धव ठाकरे यांनी मनसेबरोबर युतीच्या मुद्द्यावर बोलताना जे महाराष्ट्रातील जनतेच्या मनात आहे, तेच होईल असे वक्तव्य केले. या विषयावर निर्णय घेण्यास आम्ही सक्षम आहोत, इतरांनी त्याची चिंता करू नये, असेही त्यांनी बोलून दाखवले. उबाठा सेना व मनसे युतीविषयी भाजपाचे नेते बोलताना, दोन्ही भाऊ एकत्र येत असतील तर ते चांगलेच आहे, अशी भूमिका मांडताना दिसतात. पण त्यांना नक्की ठाऊक आहे, हे दोघे बंधू एकत्र येण्याची शक्यता कमी आहे. उद्धव यांच्याकडून राज ठाकरे एकदा नव्हे तर अनेकदा कमालीचे दुखावले गेले आहेत, हे त्यांना कधीही विसरता येणार नाही. अविभाजित शिवसेनेत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हयात असताना पक्षात राज यांचे महत्त्व वाढता कामा नये, याची दक्षता उद्धव यांनी नेहमीच घेतली होती. निर्णय प्रक्रियेत राज यांना डावलण्यात येत होते. उमेदवार निवडताना राज यांच्या शिफारसीला किमत दिली जात नव्हती. राज यांनी स्वत:चा वेगळा राजकीय पक्ष स्थापन केला, त्यामागे अनेक कारणे आहेत. पण उद्धव यांनी आपल्या भावाची कदर कधीच केली नाही. राज ठाकरे यांनी आपला स्वतंत्र पक्ष स्थापन केल्यापासून उद्धव व राज यांच्यात कधीच सुमधुर संबंध नाहीत. एवढेच नव्हे तर शिवसेनाप्रमुख हयात असताही ते नव्हते. उद्धव यांनी पक्षात सर्वकाही हातात घेतल्यापासून दोघा भावांमध्ये दुरावा आहे. शिवसेनाप्रमुखांच्या अंत्ययात्रेतही राज यांना अवमानकारक वागणूक मिळाली होती हे कसे विसरता येईल?


उबाठा सेनेला युतीसाठी घाई झाली असली तरी मध्यस्थ कोण आहे, एवढा परिपक्व, विश्वासू व दोघांनाही मान्य होईल असा नेता दोन्ही पक्षांत नाही. युती झाली तर बॉस कोण? जागा वाटप कसे होणार? दोघांची मदार मराठी मतांवर. मग माघार कोण घेणार? गेल्या वीस वर्षांत दोन्ही पक्षांत नवीन नेतृत्व निर्माण झालेले नाही. दोन्ही पक्षप्रमुख हेच दोन्ही पक्षांत सुप्रीम आहेत व त्यांच्याभोवतीच सारा पक्ष फिरताना दिसतो आहे. जरी दोन्ही पक्ष युती करायला तयार झाले तरी भाजपा त्यांना एकत्र येऊ देईल का? हा सर्वांत मोठा व कळीचा मुद्दा आहे.


राज्यात व केंद्रात भाजपा सत्तेवर आल्यापासून मराठी माणसाची अवस्था वाईट झाली आहे. मराठी माणूस, मराठी भाषा व मराठी अस्मिता यांची गळचेपी चालू आहे. महाराष्ट्राला अवमानास्पद वागणूक मिळत आहे म्हणून मराठी माणसासाठी व महाराष्ट्राच्या हितासाठी उद्धव व राज यांनी एकत्र यावे अशी भावनिक मोहीम चालवली जात आहे. आमच्या वादांपेक्षा मराठी माणूस व महाराष्ट्र हित मोठे आहे असेही उबाठा सेनेने आवाहन केले आहे. ठाकरे बंधूच मराठी माणसाला वाचवू शकतील असे सांगण्यात आहे. पण या भावनिक जाळ्यात मनसे अडकणार नाही किंवा मनसेची तशी मानसिकता नाही असे आजचे तरी चित्र आहे.


मनसेबरोबर युती व्हावी यासाठी उबाठा सेना अगतिक झाली आहे. उबाठा सेनेला खूप घाई झाली आहे. एकनाथ शिंदे यांच्यात शब्दांत सांगायचे तर उबाठा सेना लाचार झाली आहे. ठाकरे बंधू एकत्र येणार म्हणून राज्यात काही ठिकाणी पोस्टर्सही झळकले. मनसे सैनिकांच्या बरोबर उबाठा सेनेच्या सैनिकांच्या भेटी-गाठी वाढल्या आहेत. मनसे नेते भेटल्यावर उबाठा सेनेचे पदाधिकारी गळाभेटी घेत आहेत. पण हे सर्व एकतर्फी चालू आहे असे दिसते. एकीकडे भाजपा हा महाराष्ट्र व मराठी विरोधी आहे असे चित्र निर्माण करायचे व दुसरीकडे मराठी माणसाला वाचविण्यासाठी ठाकरे बंधूंनी युती करणे गरजेचे आहे असे सांगायचे अशी दुहेरी प्रचार मोहीम उबाठा सेनेकडून चालू आहे. मात्र उबाठा सेनेच्या आवाहनाला मनसेचा प्रतिसाद थंड आहे.


मुंबई, ठाणे, नवी मुंबई, कल्याण-डोंबिवली, वसई - विरार, मीरा - भाईंदर, अंबरनाथ तसेच पुणे, पिंपरी - चिंचवड, छ. संभाजी नगर, नाशिक अशा प्रमुख महापालिकांमध्ये मराठी मतांचे विभाजन होऊ नये यासाठी उबाठा सेना मनसेला बरोबर घेण्यासाठी उतावीळ झाली आहे. एकनाथ शिंदे यांची शिवसेना, उद्धव ठाकरे यांची उबाठा सेना आणि राज ठाकरे यांची मनसे असे तिन्ही पक्षांत मराठी मताचे विभाजन झाले, तर उबाठा सेनेचे सर्वाधिक नुकसान होणार आहे. भाजपा, काँग्रेसकडेही मराठी मतांचा टक्का आहे हे विसरून चालणार नाही. मराठी मतदारांची एकगठ्ठा मते एकाच पक्षाकडे अशी स्थिती नाही. भाजपाला मराठी मतांबरोबरच अमराठी मतांचा मोठा लाभ मिळतो ही या पक्षाची मोठी जमेची बाजू आहे. राज ठाकरे यांच्या संपर्कात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जसे आहेत तसेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, माजी केंद्रीयमंत्री व खासदार नारायण राणे, भाजपाचे अनेक नेते नियमित असतात. तसे उबाठा सेनेतून राज यांच्या संपर्कात उघडपणे कोण असते? आता महापालिका निवडणुकीसाठी उबाठा सेनेला एकदम राज ठाकरे यांच्या पक्षाची गरज भासू लागली यामध्ये स्वार्थाशिवाय दुसरे काय असू शकते


सन २०१९ मध्ये विधानसभा निवडणुकीनंतर उद्धव ठाकरे काँग्रेसबरोबर गेले, मुख्यमंत्री झाले. तेव्हा निर्णय घेताना त्यांनी मतदारांना, पक्षातील पदाधिकाऱ्यांना किंवा शिवसैनिकांना कोणाला विश्वासात घेतले होते? तेव्हा मतदारांना विचारले होते का? तेव्हा राज ठाकरे यांना बोलावून चर्चा केली होती का, मनसेला काय वाटते अशी विचारणा केली होती का? शिवसेना पक्ष व चिन्ह हातातून गेले. फूट पडली. जेमतेम २० आमदार निवडून आले म्हणून उद्धव यांना राज यांची आठवण होते आहे का? चारच महिन्यांपूर्वी मनसेच्या कार्यकर्त्यांनी शिवसेनाप्रमुखांचे फोटो लावले म्हणून उबाठा सेनेच्या नेत्यांनी व प्रवक्त्यांनी आक्षेप घेतला होता, मग आता एकदम मनसेची उबाठा सेनेला उचकी का लागते आहे? खरी शिवसेना कोणती हे एकनाथ शिंदे यांनी लोकसभा व विधानसभा निवडणुकीत दाखवून दिले आहे, असे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी पुन्हा एकदा मुंबईत येऊन ठणकावून सांगितले, यातच उबाठा सेनेने आपले भविष्य काय आहे हे समजून घ्यावे... कम ऑन किल मी... असे आवेशात आव्हान द्यायचे, अंगावर यायचे तर येताना अॅम्ब्युलन्स घेऊन या असे सांगताना, जाताना आडवे होऊन जाल अशी भाषा वापरायची, मग एवढी ताकद आहे, तर मनसेने युती करावी यासाठी अगतिकता कशासाठी? ७६ हजार कोटींचे बजेट असलेल्या मुंबई महापालिकेची निवडणूक ही उबाठा सेनेच्या अस्तित्वाची लढाई आहे म्हणूनच कोणी युती करताय का युती? असे विचारण्याची पाळी आली आहे...


[email protected]
[email protected]

Comments
Add Comment