Friday, June 20, 2025

सत्तेचा गड राखणारे थोरात की, सत्ता उखाडणारे विखे?

सत्तेचा गड राखणारे थोरात की, सत्ता उखाडणारे विखे?

पंचायत ते नगर परिषदेच्या प्रत्येक मतांवर विखे-थोरात संघर्षाची छाया


शिर्डी : सतत आठ पंचवार्षिक आमदारकी व मंत्रीपद भूषवणाऱ्या संगमनेरच्या थोरात कुटुंबाच्या अभेद्य गडाला भेदण्याचा इतिहास अलीकडे घडला आणि तो घडवला विखे पाटील गटाने ! पारंपरिक राजकीय वारसा नसलेल्या नवख्या अमोल खताळ यांना उमेदवारी देऊन विखे पाटलांनी थेट थोरातांचा राजकीय किल्ला सर केला असून येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये संगमनेरचा राजकीय रंग कोणता असेल, याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. थोरातांचे पारंपरिक प्रतिस्पर्धी असलेल्या विखे पाटलांनी राजकीय नवखे पण प्रामाणिक व अभ्यासू म्हणून ओळखले जाणारे अमोल खताळ यांना उमेदवारी देऊन मोठा राजकीय जुगार खेळला आणि थोरातांच्या गडाला कडवे आव्हान देऊन मास्टर स्ट्रोक मारला आहे.संगमनेर नगरपालिकेपासून जिल्हा परिषदेपर्यंत ठाण मांडलेला थोरातांचा प्रभाव विखेंच्या या धक्क्यामुळे डळमळीत होण्याची चिन्हे आहेत का याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.आगामी संगमनेर नगरपालिका निवडणूकित कोण होणार नवा किंगमेकर ? १६५ वर्ष जुनी असलेल्या संगमनेर नगरपालिकेच्या पुढील निवडणुकीत सत्ता कोणाची, विखे समर्थक अमोल खताळ यांची कि थोरातांची पारंपरिक गढी टिकणार ? असा रोचक संघर्ष होण्याची शक्यता आहे.विधानसभा विजयानंतर विखे पाटलांचा गट आता पंचायत समित्या, नगरपरिषद, सोसायट्यांवर लक्ष केंद्रीत करत आहे. थेट स्थानिक स्वराज्य संस्थांवर वर्चस्व मिळवण्याचा त्यांचा कटाक्ष आहे.तर आपला गड वाचवण्यासाठी माजी मंत्री थोरातांनी जुने निष्ठावान कार्यकर्ते व गावपातळीवरील नेतृत्व पुन्हा एकत्र केले आहे.गावभेटी व संपर्क मोहिमा जोरात सुरु केल्या आहे.



विखेंचा दावा - "नव्या नेतृत्वाला संधी" तर थोरातांचा साद- "परंपरेला विसरू नका." हाच मुद्दा स्थानिक स्वराज्य संस्थेच्या पुढील निवडणुकांत प्रचाराचे मुख्य शस्त्र ठरणार आहे. महत्त्वाचा प्रश्न म्हणजे संगमनेर तालुक्यातील युवा वर्ग विखेंच्या ‘नवीन चेहरा’ धोरणाकडे झुकणार का थोरातांच्या अनुभवी नेतृत्त्वाला पसंती देणार हे बघणे औत्सुक्याचे ठरणार आहे.पंचायत समित्या, ग्रामपंचायती, जिल्हा परिषद या स्तरावरही विखे-थोरात गटांची चुरशीची लढत होणार असून मतांचे विभाजन स्पष्ट दिसू लागले आहे.दोन्ही बाजू स्थानिक स्तरावरील जनतेचा मूड समजून घेण्यासाठी अंतर्गत सर्वेक्षणे करत आहेत.प्रत्येक पॅनल व उमेदवार निवडीवर काटेकोर चर्चा सुरु झाल्या आहे.संगमनेरकर मात्र या संघर्षाकडे ‘किंवा नाही तर’ म्हणून पाहत आहेत. विखे पाटलांचा नविन सत्ता गड उभा राहणार की थोरातांचा गड पुन्हा अभेद्य ठरणार ? संगमनेरचा राजकीय रंग बदलणार का, हे ठरवणाऱ्या लढतीस सुरुवात खऱ्या अर्थाने आता सुरुवात झाली असून या युद्धात ‘श्रद्धा व परंपरा’ विरुद्ध ‘नवा विचार व विकास’ असा थेट मुकाबला पाहावयास मिळणार आहे. संगमनेरचे राजकारण या लढतीमुळे पुन्हा महाराष्ट्राच्या राजकीय नकाशावर झळकणार हे नक्की !


Comments
Add Comment