
जिल्हा कृषी विभागाकडून ८० क्विंटल बियाणांचा पुरवठा
ठाणे : पावसाने चांगलाच जोर धरला असल्याने शेतकरी सुखावला असून पेरण्या अंतिम टप्प्यात आहेत. ठाणे जिल्ह्याचे नागरीकरण अधिक झाले असले तरी जिल्ह्यात ५४ हजार २३१ हेक्टरवर शेतीची लागवड होणार असून त्यासाठी ३३९२ हेक्टरवर पेरणी होऊन रोपांची लागवड करण्यात आली आहे. त्याकरिता जिल्हा अधीक्षक आणि ठाणे जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाकडून ५० टक्के अनुदानावर ९२२ क्विंटल बियाणांचा पुरवठा शेतकर्यांना झाल्याची माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रामशेर पांचे यांनी दिली.
ठाणे जिल्ह्यात भात व नाचणीची लागवड होते. जिल्ह्यात शेतीचे प्रमाण कमी होत असून नागरीकरणाकडे अधिक भर दिला जात आहे. मुरबाड, शहापूर, भिवंडी तालुक्यात मोठ्या प्रमाणावर भात शेती व नाचणी होते. कल्याण, अंबरनाथ तालुक्यातील काही भागात शेती केली जाते. ठाणे तालुक्यात काही भागात शेतकरी पारंपरिक पद्धतीने शेती करताना दिसतात. त्यामुळे ठाणे जिल्ह्यातील ५४ हजार २३१ हे. जमिनीवर भात लागवड केली जाते. त्यासाठी ३,३९२ हेक्टरवर भाताचे रोप तयार करण्यासाठी पेरणी झाली आहे. या पेरणीसाठी शेतकर्यांना ५० टक्के अनुदानावर बियाणांचा पुरवठा केला जातो. महाबीजकडून हे बियाणे पुरविले जाते. यावर्षी रत्नागिरी ८ या जातीच्या बियाणांसह रत्नागिरी ६ जातीची बियाणी पुरवण्यात आली. रत्नागिरी ६ जातीच्या बियाणातून बारीक तांदूळ मिळतो. त्याची मागणी शेतकर्यांकडून झाली आहे. त्यानुसार २४ क्विंटल बियाणी उपलब्ध करून दिली आहेत.
जिल्हा कृषी विभागाकडून ८० क्विंटल बियाणांचा पुरवठा करण्यात आला असून ८ क्विंटल नाचणी बियाणे अनुदानावर गटांना देण्यात आले आहे. तर ठाणे जिल्हा परिषेदेकडून ८४२ क्विंटल बियाणांचा पुरवठा करण्यात आलेला आहे.
बियाणांबरोबर ठाणे जिल्ह्यासाठी ४ हजार ५९३ मॅट्रिक टन खत उपलब्ध झाले असून त्यापैकी २ हजार ६२३ मॅट्रिक टनांची विक्री झाली आहे. सुमारे १,९७० खत शिल्लक आहे. सप्टेंबरपर्यंत खताची मागणी होत असल्याने जिल्ह्यात मुबलक खत उपलब्ध झाले असल्याचे कृषी अधिकारी पाचे यांनी सांगतिले.