
मुंबई : राज्य सरकारने गृहविभागाअंतर्गत २०२१ मध्ये ५३० पदासाठी भरती प्रक्रिया सुरु केली होती. राज्य सरकारच्या परिपत्रकानुसार प्रकल्पग्रस्तांसाठी २६ जागा राखीव ठेवण्यात आल्या होत्या. पोलिस खात्यात नोकरी मिळवण्यासाठी तरुणाने राखीव गटात बोगस प्रमाणपत्र सादर करुन नोकरी मिळवली, त्यामुळे पोलिस शिपायाला खात्यातून बडतर्फ करण्यात आले. सदरचा पोलिस शिपाई २०२१ मध्ये पोलीस दलात भरती झाला होता. भरती प्रक्रिया दरम्यान कागदपत्रांमध्ये प्रमाणपत्र नसल्याचे माहिती पोलीस अधिकाऱ्यांनी पोलिस शिपायाला दिली होती.
संबंधित पोलिस शिपायाने प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र उशिरा सादर केल्यामुळे बोगस प्रमाणपत्र असल्याची बाब त्यावेळी पोलिस अधिकाऱ्यांच्या लक्षात आली नव्हती, परंतू कागदपत्रांची पुन्हा तपासणी करण्यात आल्यानंतर बोगस प्रमाणपत्र असल्याची धक्कादायक बाब समोर आली. सदरचा पोलिस शिपाई मुंबईतील नायगाव येथील शस्त्रास्त्र विभागात कार्यरत आहे.
नायगाव मुख्य विभागातली उपआयुक्त शेख यांनी संबंथित पोलिस शिपायाला कामावरुन काढून टाकले आहे. पोलिस खात्याअंतर्गत पोलिस शिपायावर गेला वर्षी गुन्हा नोंद करण्यात आला होता. तसेच पोलिस अधिकाऱ्यांनी बीड जिल्ह्यातील जिल्हाअधिकारी कार्यालयात चौकशी केल्यानंतर प्रमाणपत्राची कार्यालयात नोंद नसल्याचे निष्पन्न झाले.