
डोंबिवली : शहरात रिक्षा प्रवासात चालकाने चौथी सीट बसविल्यास त्याला दहा हजार रुपये दंड आकराला जात आहे. आधीच हातावर पोट असणाऱ्या रिक्षाचालकांवर एवढा मोठी दंड रक्कम आकारून अन्याय होत आहे. रिक्षा टॅक्सी चालक मालक असोसिएशन व रिक्षा चालक संघटना यांनी डोंबिवली वाहतूक पोलीस निरीक्षक श्रीराम पाटील यांची भेट घेऊन रिक्षात चौथी सीट बसविल्यास रिक्षाचालकाला तब्बल दहा हजार रुपयांचा दंड अशी कारवाई नको अशी मागणी केली. याबाबत पोलिसांनी गंभीर्याने विचार करून कारवाई करू नये अशी पोलिसांना विनंती करून निवेदन देण्यात आले.
रिक्षा टॅक्सी चालक मालक असोसिएशन अध्यक्ष (कोकण विभाग) प्रणव पेणकर यांच्या मार्गदर्शनाखाली डोंबिवली शहर अध्यक्ष महेश पाटील, विजय बाकडे, दत्ता वाठोरे, गजानन पाटील, प्रदीप ढवळे, समाधान पवार, शंकर यादव विलास चौधरी यांनी डोंबिवली वाहतुक पोलीस निरीक्षक श्रीराम पाटील यांची भेट घेतली.

नवी दिल्ली: अहमदाबाद येथे १२ जून रोजी झालेल्या भीषण विमान अपघातानंतर आता मोठी कारवाई करण्यात आली आहे. या दुर्घटनेत २७० हून अधिक नागरिकांचा मृत्यू ...
यावेळी डोंबिवली शहरअध्यक्ष महेश पाटील म्हणाले, डोंबिवलीतील ८० टक्के नागरिक कामानिमित्त मुंबईला जातात. सायंकाळी परत डोंबिवलीत आल्यावर घरी जाणारे प्रवासी रिक्षा प्रमाण कमी असल्याने आणि वेळेत घर गाठायचे असल्याने चौथ्या सीटवर बसतात. मात्र रिक्षाचालकांना दंड भरावा लागतो. दंडाची रक्कम मोठी असल्याने दंड भरणे शक्य होत नाही. डोंबिवलीतील अनेक रिक्षाचालक कर्जबाजारी आहेत.
रिक्षाचालक संघटना डोंबिवली अध्यक्ष राजा चव्हाण, सरचिटणीस भगवान मोरजकर, सचिव विजय गावकर यांनीही फ्रंट सीट प्रवासी घेणाऱ्या रिक्षाचालकाला दहा हजार रुपये दंड आकारला जात असल्याबद्दल प्रश्न विचारून आंदोलनाचा इशारा दिला आहे.
याविषयी मोरजकर यांनी सांगितले की, वाहतूक विभागाने ६६ व १९२ कलमानुसार रिक्षाच्या फ्रंट सीट प्रवासी घेणाऱ्या रिक्षाचालकाला दहा हजार रुपये दंड आकारला आहे. हा दंड सर्वस्वी अमानुष आहे. रिक्षाचालक रोज रस्त्यावरच्या त्रासाला तोंड देत कसाबसा आपला व्यवसाय करत आहेत. ते म्हणाले कसेबसे मासिक उत्पन्न पोटापाण्यापुरते मिळवत आहेत. अशावेळी रिक्षा चालकाला दहा हजार रुपये दंड कसा परवडेल, त्याचे जगणे मुश्किल होईल. आधीच डबघाईला आलेला व्यवसाय कोणत्याही प्रकारच्या सोयी सुविधा शासन पुरवत नाही आणि म्हणून या दंडास आमचा कडकडून विरोध आहे. आपण रिक्षाचालकांच्या भवितव्याचा विचार करून लवकरात लवकर याबाबत काहीतरी चांगला मार्ग काढावा, अशी मागणी त्यांनी केली आहे.