
बऱ्याच वेळा आपल्याला आपत्ती व्यवस्थापन म्हणजे काय हेच माहिती नसते. तेव्हा आपत्ती व्यवस्थापन म्हणजे नैसर्गिक किंवा मानवनिर्मित आपत्तींमुळे होणाऱ्या धोक्यांपासून संरक्षण करण्यासाठी केलेली उपाययोजना. यात आपत्ती येण्याआधी तयारी करणे, आपत्ती आल्यावर तातडीने प्रतिसाद देणे आणि आपत्तीनंतर पुनर्बांधणी करणे यासारख्या गोष्टींचा समावेश होतो. तेव्हा सध्या पावसाळा सुरू आहे. राज्यात मुसळधार पाऊस पडत असल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. यात काही ठिकाणी दुर्घटना घडून मनुष्यहानी झाल्याने अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले आहेत. अजून बराच पावसाळा बाकी आहे. तसेच पावसाच्या पाण्याच्या पुरामुळे अनेकांचे नुकसान झाले आहे. यामुळे राज्यातील प्रत्येक जिल्ह्यामधील आपत्ती व्यवस्थापकाने सतर्क राहण्यासाठी थोडक्यात घेतलेला आढावा.
पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यामधील कुंडमळा या ठिकाणी इंद्रायणी नदीवरचे लोखंडी पूल १५ जून, २०२५ रोजी दुपारी ३.३०च्या सुमारास कोसळले. जवळजवळ ३० वर्षांपूर्वीचे हे जुने पूल होते. त्याआधी २ ऑगस्ट, २०१६ रोजी रायगड जिल्ह्यातील महाड-पोलादपूर दरम्यान रात्री ११.३०च्या सुमारास सावित्री नदीवरील पूल मुसळधार पावसात वाहून गेले. या आपल्या राज्यातील मागील दहा वर्षांतील अतिशय दोन दुर्दैवी दुर्घटना आहेत. यात निरपराध पर्यटक आणि प्रवाशांना आपल्या जीवाला मुकावे लागले आहे. सावित्री नदीवरील पूल वाहून गेल्यानंतर ताबडतोब राज्यातील सर्व पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याचे आदेश तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले होते. आता सुद्धा राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सुद्धा पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याचे आदेश दिले आहेत. मग मागील दहा वर्षांत किती पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्यात आले. जर झाले असते तर मागील रविवारी पन्नासहून अधिक पर्यटक जखमी आणि चार पर्यटकांना आपल्या जीवाला कायमचे मुकावे लागले असते का? ही आपल्या राज्यातील अतिशय दुर्दैवी घटना आहे. तेव्हा राज्यातील आपत्ती व्यवस्थापकांनी सतर्क राहाणे गरजेचे आहे. जर त्या ठिकाणच्या आपत्ती व्यवस्थापकांनी वेळीच दखल घेतली असती तर असा प्रसंग घडला नसता. आता आपत्ती व्यवस्थापकांनी सुद्धा पुलावर गर्दी किंवा वाहनचालकांमध्ये वाद होणार नाही याची काळजी घ्यावी लागेल. या दोन कारणांमुळे हे पूल कोसळल्याचे त्या ठिकाणचे स्थानिक रहिवासी गणेश पवार सांगतात. तर सावित्री नदीच्या पुलाशेजारी वास्तव्याला असणारा सुरज कुमार यांनी जे धाडस दाखविल्यामुळे अनेक वाहने व प्रवासी बचावले. म्हणजे दोन्ही दुर्दैवी ज्या घटना घडल्या त्याचे प्रथमदर्शनी साक्षीदार गणेश पवार (इंद्रायणी नदी) व सुरज कुमार (सावित्री नदी) आहेत. सध्या राज्यात पावसाचा जोर सुद्धा वाढत आहे. त्यामुळे नदीनाले तुडुंब भरून वाहत असल्यामुळे आपत्ती व्यवस्थापकांनी अधिक सतर्क राहाणे गरजेचे आहे. मागील दहा ते पंधरा वर्षांचा राज्यातील पुराचा अनुभव लक्षात घेऊन प्रत्येक जिल्ह्यातील पूर परिस्थितीचा सामना करण्यासाठी आपत्ती व्यवस्थापकाने सतर्क राहाणे गरजेचे आहे. तशा सूचना त्यांना प्रत्येक जिल्ह्याच्या प्रशासनाकडून दिलेल्या आहेत. मागील एक महिना आपत्ती व्यवस्थापकांनी रंगीत तालीम सुद्धा केलेली आहे. त्यामुळे त्यांना काहीसा अनुभव आलेला आहे. त्यात पुण्याची घटना ताजी आहे. मात्र रंगीत तालीम आणि प्रत्यक्ष पुराचा सामना करणे म्हणजे तारेवरची कसरत असते. तेव्हा आपत्ती व्यवस्थापकाच्या दृष्टीने पावसाळ्याचे चार महिने अतिशय महत्त्वाचे असतात. डोळ्यांत तेल घालून आपली जबाबदारी पार पाडायची असते. यात घड्याळाच्या काट्याकडे लक्ष ठेवायचे नसते तर आकाशाकडे लक्ष ठेवायचे असते. मागील वर्षाची पूरपरिस्थिती लक्षात घेऊन त्यांना कामाचे नियोजन करावे लागेल. त्याचप्रमाणे वेधशाळेचा अंदाज घ्यावा लागेल. कारण पाऊस आणि आपत्ती व्यवस्थापन यातील महत्त्वाचा दुवा म्हणजे वेधशाळा आहे. ज्याठिकाणी पूरस्थिती निर्माण होते त्याठिकाणी ठोस उपाय सुचविले गेले पाहिजेत. ते सुद्धा स्वत:चा जीव सांभाळून.
कारण पाऊस केव्हा आपले रुद्ररूप धारण करील हे समजणार सुद्धा नाही. तेव्हा आपत्ती व्यवस्थापकानी गाफील राहू नये. ज्याठिकाणी पूरपरिस्थिती निर्माण होते त्याठिकाणी स्थानिक पथक स्थापन करावे कारण त्या परिसरातील अधिक माहिती त्यांना असते. ते स्थानिक व अनुभवी असल्यामुळे तातडीने योग्य ती काळजी घेऊ शकतात. त्यासाठी त्यांना योग्य तो मोबदला दिला गेला पाहिजे. म्हणजे नैसर्गिक आपत्तीपासून नागरिकांना संरक्षण मिळेल. पावसाळ्यात दर वर्षी आपल्या राज्यात पूर आल्याने अनेकांना नैसगिक संकटांना सामोरे जावे लागते.
अनेकांचे संसार उद्ध्वस्त होतात. अशात शासकीय यंत्रणांची धावपळ सुरू होते. त्यांचे काम युद्धपातळीवर सुरू होते आणि काही दिवसाने थांबते. पूरग्रस्तांना शासकीय मदत सुद्धा जाहीर होते. असे अनेक वर्षे चालत आले आहे. तेव्हा अशा पूरग्रस्त भागात आपत्ती व्यवस्थापनाने योग्य उपाय सुचवून त्याची तत्काळ अंमलबजावणी होणे आवश्यक आहे. कारण दरवर्षी पुरात निरपराध माणसे व मुके प्राणी यांचा हकनाक जीव जातो. हे थांबणे गरजेचे आहे. अशा वेळी नागरिकांनी सुद्धा संयम राखणे गरजेचे आहे. तेव्हा पावसाळ्यातील राज्यातील पूरपरिस्थितीचा अभ्यास केल्यास प्रत्येक जिल्ह्यातील आपत्ती व्यवस्थापकाने सतर्क राहावे ही पावसाळ्यातील नागरिकांची खरी गरज आहे.