
'ऑपरेशन सिंधू' अंतर्गत इराणमध्ये अडकलेल्या भारतीय नागरिकांच्या सुरक्षित परतीच्या कामाला सुरुवात
इराण आणि इस्रायलमधील वाढत्या तणावादरम्यान, भारताने इराणमधील आपल्या नागरिकांना सुरक्षित मायदेशी घेऊन येण्याचे काम सुरू केले आहे. त्यानुसार मशहादहून निघालेले पहिले चार्टर्ड विमान शुक्रवारी रात्री ११:४० वाजता दिल्लीला पोहोचले. दुसरे विमान आज सकाळी १० वाजता येणार आहे. या मोहिमेदरम्यान इराणमधील एकूण १,००० भारतीय परतण्याचे नियोजन करण्यात आले आहे. शनिवारी आणखी दोन विमानांद्वारे भारतीयांना सुखरूप आणले जाईल.
भारताने 'ऑपरेशन सिंधू' सुरू करून आपल्या नागरिकांना सुरक्षित परत आणण्याचे काम सुरू केले आहे. या मोहिमेअंतर्गत, इराणमधील मशहादहून पहिले चार्टर्ड विमान शुक्रवारी रात्री ११:४० वाजता नवी दिल्लीतील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर सुरक्षितपणे उतरले. या विमानाने इराणमध्ये अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांना आणि नागरिकांना सुरक्षितपणे भारतात आणले आहे.
इराणच्या एयर चार्टड विमानांचा वापर
भारत सरकार टप्प्याटप्प्याने मशहादहून एकूण १,००० भारतीयांना परत आणत आहे. या बचाव कार्यासाठी इराणच्या महन एअर चार्टर्ड विमानांचा वापर केला जात आहे.
आम्ही भारतीयांना आमच्या स्वतःच्या लोकांसारखे मानतो
इराणमधील भारतीय दूतावासाचे उपप्रमुख मोहम्मद जवाद हुसैनी यांनी माध्यमांना माहिती देताना सांगितले की, "आम्ही भारतीयांना आमच्या स्वतःच्या लोकांसारखे वागवतो. इराणचे हवाई क्षेत्र बंद आहे परंतु आम्ही भारतीय नागरिकांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यासाठी ते तात्पुरते उघडण्याची व्यवस्था करत आहोत." इराणी अधिकाऱ्याने सांगितले की, "पहिले विमान शुक्रवारी रात्री दिल्लीला पोहोचेल आणि शनिवारी आणखी दोन विमाने भारतासाठी रवाना होतील." दुसरे विमान शनिवारी सकाळी अश्गाबातहून निघून सकाळी १० वाजता दिल्लीला पोहोचेल, तर तिसरे विमान शनिवारी संध्याकाळी भारतात पोहोचेल.
इराण आणि इस्रायलमधील परिस्थिती सतत बिघडत असून, या देशात युद्धसदृश परिस्थिती निर्माण झाली असल्यामुळे हे मदतीचे पाऊल उचलण्यात आले आहे. अशा परिस्थितीत, भारत सरकारने तत्परता दाखवत ऑपरेशन सिंधू सुरू केले, जेणेकरून केवळ विद्यार्थ्यांनाच नव्हे तर इतर अडकलेल्या भारतीय नागरिकांनाही सुरक्षितपणे बाहेर काढता येईल. परराष्ट्र मंत्रालयाने जारी केलेल्या निवेदनात असे म्हटले आहे की सरकार आपल्या सर्व नागरिकांच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य देते आणि या संकटाच्या वेळी आवश्यक ती सर्व मदत पुरवली जात आहे.