Saturday, June 21, 2025

काळी जादू...

काळी जादू...

मनभावन : आसावरी जोशी


जादू... या दोन अक्षरांचे आपल्यासारख्या सामान्यांना प्रचंड आकर्षण.. अशक्यप्राय गोष्ट घडणे म्हणजे जादू. आपल्या दृष्टीने एक सरधोपट व्याख्या. लहानपणापासून ऐकलेल्या देवादिकांच्या गोष्टींतील चमत्कार. पुढे अरेबिअन नाईट्समधील अनेक जादूच्या गोष्टी. मग नाट्यगृहात होणारे जादूचे प्रयोग ते गेली अनेक वर्षे छान, टवटवीत, सकारात्मकता देणारे हॅरी पॉटरचे जादूचे विश्व...


मानवी मनाला नेहमीच अतर्क्य, अशक्य गोष्टींचा ध्यास असतो. आकर्षण असते. त्यामुळे जादुई विद्येची भुरळ त्याला पडली नसती तरच नवल. सध्या जादू... तंत्र मंत्र... अशाच चित्रपटांची चलती मराठी चित्रपटसृष्टीत सुरू आहे. ऋषिकेश गुप्ते लिखित आणि दिग्दर्शित जारण चित्रपटाचे तर सर्वत्र कौतुक होत आहे. रत्नाकर मतकरींनंतर ऋषिकेश गुप्तेंचेच नाव गूढकथाकार म्हणून घ्यावे लागेल. जारण पाहायच्या प्रयत्नात आहे पण अजून काही योग आलेला नाही. पण ऋषिकेश गुप्तेंच्या गूढकथा मात्र वाचल्या आहेत. मनातली भीतीची आदिम भावना, माणसाच्या लैंगिक प्रेरणा, त्याच्या भावभावनांची उलाघाल ही त्यांच्या लेखनाची मुख्य आशयसूत्रं. गूढ-अद्भुतता, चित्रमय, प्रासादिक व ओघवती भाषा या लेखनवैशिष्ट्यांमुळे त्यांचं लेखन खिळवून ठेवतं. जारण चित्रपटही प्रेक्षकांना खिळवून ठेवण्यात यशस्वी झाला आहे.
अर्थात गुढतेचे हे आकर्षण केवळ जारणपुरते मर्यादित राहत नाही. याआधी आलेली वेबसेरीज अंधारमाया देखील साऱ्यांचेच लक्ष वेधून घेण्यात यशस्वी ठरली. अमानवी शक्ती, काळ्या जादूचा वापर, त्या अनुषंगाने त्यात येणारी भुतेखेते साऱ्यांचेच आकर्षण आणि थरार प्रेक्षकांना वाटतो. आणि यातूनच या कलाकृती यशस्वी होतात.


गुढकथा... भूतकथा... भयकथा या साहित्यप्रकाराने नेहमीच वाचकांना, प्रेक्षकांना भुरळ घातली आहे. मी काही वर्षांपूर्वी नाट्यगुरू प्रा. वामन केंद्रेसरांची मुलाखत घेतली होती. तेव्हा त्यांनी मला विचारले तुला देव भेटला आहे का? मी म्हटले नाही. त्यांनी दुसरा प्रश्न विचारला, तू भुताला पहिले आहेस का? अर्थात उत्तर नाहीच होते. त्यावर त्यांनी मला जे सांगितले ते मी कायम लक्षात ठेवले आहे. ते मला म्हणाले, या दोन गोष्टी आजतागायत माणसाला सापडलेल्या नाहीत म्हणूनच त्याच्यात सर्जनशीलता टिकून आहे. विविध कलाकृतींची निर्मिती त्याच्या हातून होते आहे. या दोन गोष्टींचा शोध ज्यादिवशी थांबेल त्यादिवशी सर्जनशीलता संपेल. कलेचा शोध थांबेल. किती खरे आहे हे..


या कुतूहलातूनच मीही जादू, तंत्रविद्या या गोष्टीचे वाचन करण्यास सुरुवात केली. शोध घेण्याचा प्रयत्न केला. मंत्र तंत्र, जादू ही १४ विद्यांपैकी एक विद्या आहे याबद्दल मला शंका नव्हतीच आणि कोणतीही विद्या ही सरस्वती आईच्या हातूनच आलेली आहे यावर माझा ठाम विश्वास आहे. फक्त त्या विद्येचा वापर चांगल्या गोष्टींसाठी करायचा की स्वार्थापोटी दुसऱ्यांचे वाईट करण्यासाठी हे सर्वस्वी आपल्या सद्सदविवेकबुद्धीवर अवलंबून असते..


काळी जादू... या दोन शब्दांभोवती प्रचंड गुढतेचे वलय आहे. अर्थातच ते असणार, कारण तंत्र विद्या शिकणारे या काळ्या जादूचाच वापर करतात. आपल्या देशात काळ्या जादूवर पूर्णत: बंदी आहे. तरीही बरेचजण आपल्या स्वार्थासाठी, पैसे मिळवण्यासाठी या जादूचा वापर करतात. यासाठी बिनदिक्कत आपल्या देवदेवतांचा आधार घेतात. आपल्या वाईट इच्छा -आकांक्षा पूर्ण करण्यासाठी त्यांच्या नावाचा आधार घेतात. पण कालीमाता काय किंवा आसामची कामाख्या देवी काय, आदिशक्तीची ही विविध रूपे आपल्या लेकरांचे कधी वाईट करूच शकणार नाहीत याची मनास इतकी खात्री असते की, या पवित्र नावांच्या आड दडून वाईट कृत्य करणाऱ्यांसाठी मात्र मनोमन संताप होतो.


मला तरी असे वाटते की, जे खरोखर ही उपासना करून तंत्र विद्या अवगत करतात ते अशा भौतिक प्रलोभनांपासून लांब राहतात. कारण परमेश्वराचे, निसर्गाचे तंत्र त्यांना पुरते ठाऊक असते. जे तुम्ही कराल ते फिरून तुमच्याकडेच येते. निसर्गाचे, परमेश्वराचे सर्वात मोठे प्रतीक समुद्र आपल्या कृतीतून वारंवार हे दाखवून देतो आणि तेच मनाला पटते. यातूनच निखळ मानाने एखाद्या गूढ कलाकृतीचा आस्वाद घेतला जातो आणि तो विषय तिथेच संपतो.

Comments
Add Comment