
मुंबई : मुंबई मेट्रो-३ प्रकल्पातील बीकेसी आणि वरळी स्थानकांमध्ये गळतीचे संकट दिवसेंदिवस वाढत चालले आहे. आचार्य अत्रे चौक मेट्रो स्थानकात पाणी साचल्याच्या घटनेनंतर आता वांद्रे कुर्ला संकुल (बीकेसी) मेट्रो स्थानकात भिंतींना ओलावा, छतातून पाणी गळती असे दृश्य दिसून येत आहेत. याआधी गळती रोखण्यासाठी एमएमआरसीने पाण्याच्या बादल्या ठेवल्या होत्या, ज्यामुळे त्यांच्यावर टीका झाली होती.
आता गळतीच्या ठिकाणी कर्मचारी सातत्याने पाणी पुसताना दिसत आहेत. प्रवाशांनीही यासंदर्भात सोशल मीडियावर फोटो शेअर करत टीका केली आहे.
सर्वसामान्य नागरिक, प्रवाशांनी समाजमाध्यमांवर मेट्रो स्थानकातील गळतीची छायाचित्रे, चित्रफिती पोस्ट करून 'मेट्रो-३'च्या कामावर प्रश्न उपस्थित केला आहे. वरळी आणि बीकेसी मेट्रो स्थानकांत होत असलेल्या गळतीविषयी विचारणा केली असता एमएमआरसीने बांधकाम निकृष्ट असल्याचा आरोप फेटाळून लावला. काही ठिकाणी गळतीच्या किरकोळ समस्या उद्भवत असून त्याची कंत्राटदारांकडून तातडीने दुरुस्ती करुन घेण्यात येत आहेत.
मेट्रो ३ वाहतूक सेवेत दाखल झाल्यापासूनचा हा पहिलाच पावसाळा आहे. त्यामुळे आवश्यक ती दुरुस्ती करून घेतली जात आहे.