Friday, June 20, 2025

Ashadhi Wari 2025 : वारीत ३५ हजार भाविकांसाठी वॉटरप्रूफ दर्शन मंडप!

Ashadhi Wari 2025 : वारीत ३५ हजार भाविकांसाठी वॉटरप्रूफ दर्शन मंडप!

पंढरपूर : महाराष्ट्रातील लाखो भाविकांचं दैवत असलेल्या विठूरायाच्या दर्शनासाठी पंढरपूरमध्ये येत असतात. येत्या ६ जुलै रोजी आषाढी एकादशीचा मुख्य सोहळा साजरा होणार आहे. या सोहळ्यासाठी लाखो भाविक पंढरीत येणार आहेत. मंदिर समितीने वारकरी भाविकांच्या स्वागताची जय्यत तयारी सुरू केली आहे. यावर्षी श्री विठ्ठल- रुक्मिणी पदस्पर्श दर्शनासाठी मंदिर समितीने विशेष सोय केली आहे. मंदिर समितीकडून सुमारे ३५ हजार भाविक दर्शनरांगेत उभारतील व बसतील, असा भव्यदिव्य वॉटरप्रूफ दर्शन मंडप उभारण्यात आला आहे. शिवाय दर्शन रांगेतील भाविकांना पिण्याचे शुद्ध पाणी, चहा आणि जेवणाची सोयसुद्धा केली आहे, अशी माहिती मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी दिली.




४५० फूट लांब व १०० फूट रुंद मंडप


आषाढी वारीसाठी सुमारे १५ ते १६ लाख भाविक येतील असा प्रशासनाचा अंदाज आहे. त्यानुसार मंदिर समितीने दर्शनरांगेचे नियोजन केले आहे. वारी काळात पाऊस येण्याची शक्यता गृहीत धरून भाविकांची कोणतीही गैरसोय होऊ नये यासाठी यंदा प्रथमच वॉटरप्रूफ दर्शन मंडप उभारण्यात आला आहे. येथील पत्राशेड जवळच्या मोकळ्या जागेत ४५० फूट लांब व १०० फूट रुंद असा भव्य मंडप टाकला आहे.



भाविकांनी रांगेतूनच घ्यावे देवाचे दर्शन


विठ्ठल- रुक्मिणीचे २४ तास दर्शन येत्या २६ जूनपासून सुरू होणार आहे. ते प्रक्षाळ पूजेपर्यंत सुरू राहील. या काळात जास्तीत जास्त भाविकांचे सुलभ व जलद गतीने दर्शन व्हावे यासाठी दर्शनरांगेचे योग्य व्यवस्थापन करण्यात आले आहे. दर्शनरांगेत २४ तास सुरक्षा कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. याशिवाय ठिकठिकाणी भाविकांसाठी स्वच्छतागृहांची देखील सोय केली आहे. सध्या व्हीआयपी व ऑनलाइन दर्शन बंद ठेवण्यात आले आहे. भाविकांनी दर्शन रांगेतून देवाचे दर्शन घ्यावे, असे आवाहनही गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी केले आहे.

Comments
Add Comment