
शिंदेंचा ठाकरी दम: हिंदुत्व आणि स्वाभिमानाचा हुंकार
१९ जून २०२५. मुंबईतील वरळी डोम येथे शिवसेनेचा ५९वा वर्धापनदिन साजरा झाला. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांना उजाळा दिला. हिंदुत्व आणि मराठी स्वाभिमानाचा झेंडा उंचावला. 'कम ऑन, किल मी' म्हणणाऱ्या उद्धव ठाकरेंना शिंदेंनी ठाकरी भाषेतच उत्तर दिलं आणि शिवसैनिकांमध्ये आत्मविश्वास उंचावला. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला या लेखातून सांगणार आहोत, एकनाथ शिंदे यांच्या या प्रेरणादायी आणि परखड भाषणामागची तगमग आणि तळमळ.
शिवसेनेचा ५९वा वर्धापनदिन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या भाषणानं गाजला. त्यांनी बाळासाहेब ठाकरेंच्या हिंदुत्वाच्या आणि मराठी स्वाभिमानाच्या विचारांना केंद्रस्थानी ठेवलं आणि शिवसैनिकांमध्ये नवा जोश, आत्मविश्वास निर्माण केला. त्यांनी उद्धव ठाकरेंवर थेट हल्ला चढवत, शिवसेनेचा खरा वारस कोण, हे दाखवून दिलं. एकनाथ शिंदेंनी तर उद्धव ठाकरेंना त्यांच्याच ठाकरी भाषेत सुनावलं. 'कम ऑन, किल मी' म्हणतात. मात्र मेलेल्या माणसाला काय मारणार? महाराष्ट्राच्या जनतेनं निवडणुकीत तुमचा मुडदा पाडलाय. वाघाचं कातडं पांघरून लांडगा वाघ होत नाही. त्यासाठी वाघाचं काळीज आणि मनगटात ताकद लागते, तो दम, ती ताकद आमच्या शिवसैनिकांमध्ये आहे, असं म्हणत ठाकरेंवर निशाणा साधला आणि ठाकरेंच्या वक्तव्याची खिल्ली उडवली. इतकंच नव्हे तर आमचा मेळावा हा बाळासाहेबांच्या विचारांचा आहे, तर दुसरा मेळावा सत्तेच्या लाचारीचा आहे, असंही शिंदे यांनी ठणकावलं.
'बाळासाहेब ठाकरेंनी आयुष्यभर हिंदुत्व आणि मराठी माणसासाठी लढा दिला. बाळासाहेब ठाकरेंनी आयुष्यभर काँग्रेसला विरोध केला, मात्र उद्धव ठाकरेंनी याच काँग्रेसशी हातमिळवणी केली आणि सत्तेसाठी शिवसेना काँग्रेसच्या दावणीला बांधली', असा घणाघातही एकनाथ शिंदे यांनी केलाय. शिंदेंनी हिंदुत्वाचा भगवा आणि शिवधनुष्य आपल्याकडेच असल्याचा दावा केला. ८० टक्के समाजकारण आणि २० टक्के राजकारण, हेच शिवसेनेच्या यशाचं गमक असल्याचंही शिंदे यांनी पुन्हा सांगितलं.

Monsoon Restriction : सातारा जिल्ह्यातील विविध पर्यटन स्थळी पर्यटकांवर १९ ऑगस्टपर्यंत निर्बंध
सातारा : पावसाळ्यातील पर्यटनासाठी येणा-या नागरीकांच्या सुरक्षितेच्या दृष्टीने व कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये याकरीता दिनांक २० जून ...
एकनाथ शिंदेंनी बाळासाहेबांचं अयोध्येतील राम मंदिर आणि कलम ३७० हटवण्याचं स्वप्न पूर्ण करणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांचं कौतुक केलं. हनुमान चालिसा म्हणणाऱ्यांना तुरुंगात टाकणारं हिंदुत्व कोणतं? असा सवाल करत उद्धव ठाकरेंच्या हिंदुत्वावरच प्रश्नचिन्ह उपस्थित केलंय. शिंदेंनी ठाकरे गटाच्या मुंबईचा लढा या मोहिमेवरही जोरदार टीका केलीय. 'राक्षसाचा जीव जसा पोपटात असतो, तसा यांचा जीव बीएमसीच्या तिजोरीत आहे. सत्तेत असताना काय केलं? आता लढायचं म्हणता, मात्र घराबाहेर पडायला श्रीकांत शिंदेंची गरज पडते, असा सणसणीत टोलाही लगावला. हिंदुत्व हा आमचा श्वास आहे. मुंबई महाराष्ट्राची आहे आणि कुणाचा बाप जरी आला तरी ती महाराष्ट्रापासून तोडली जाणार नाही. आमच्या नादाला लागू नका, कारण आम्ही बाळासाहेबांचा आणि आनंद दिघेंचा सच्चा वारसदार आहोत, असंही शिंदे यांनी ठणकावून सांगितलं.
एकनाथ शिंदे यांच्या या परखड आणि प्रेरणादायी भाषणाने शिवसैनिकांमध्ये नवचैतन्य निर्माण झालंय. त्यांनी बाळासाहेबांच्या हिंदुत्व आणि मराठी स्वाभिमानाच्या विचारांना पुढे नेण्याचं वचन दिलंय. एकनाथ शिंदे यांचं हे भाषण म्हणजे ठाकरी परखडपणाचा आणि हिंदुत्वाच्या अभिमानाचा हुंकार होता. बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांना खऱ्या अर्थाने उजाळा देत शिंदे यांनी शिवसेनेचा खरा वारस कोण, हे दाखवून दिलंय.