
जीवन आणि मृत्यूचा लढा: डीएनए प्रोफाइलिंगची कहाणी
अहमदाबाद : अहमदाबाद - लंडन एअर इंडिया विमान अपघातानं संपूर्ण देश हादरला. या भीषण अपघातात २७४ हून अधिक जणांनी प्राण गमावले. मृतदेहांचे कोळसे झाले. मृतांची ओळख पटवणं हे मोठं आव्हान निर्माण झालं. मात्र या संकटात एक आशेचा किरण ठरले ते भारताचे फॉरेन्सिक तज्ज्ञ. भारतात आतापर्यंतची सर्वात मोठी DNA जुळवणी मोहीम यशस्वीपणे राबवली गेली. चला तर जाणून घेऊया या लेखातून अशक्यप्राय मिशनची कहाणी, जिथे विज्ञान, मेहनत आणि माणुसकी एकत्र आली.
अहमदाबाद विमान दुर्घटना भारताच्या इतिहासातील आणखी एक काळा दिवस. अहमदाबाद ते लंडन जाणाऱ्या एअर इंडिया फ्लाईट AI १७१ चं विमान उड्डाणानंतर काही सेकंदातच पडलं आणि आगीच्या ज्वाळांमध्ये लपटलं. एक हजार डिग्री सेल्सियसपेक्षा जास्त तापमानामुळे प्रवाशांच्या मृतदेहांची ओळख पटवणं जवळपास अशक्य झालं. मात्र या संकटात भारताच्या फॉरेन्सिक तज्ज्ञांनी एक चमत्कार घडवला. गांधीनगरच्या फॉरेन्सिक सायन्स डायरेक्टरेट आणि नॅशनल फॉरेन्सिक सायन्स युनिव्हर्सिटीच्या टीमने तातडीने कामाला सुरुवात केली. अपघातस्थळ सील करून ३०० हून अधिक नमुने गोळा केले. राजकोट, सुरत आणि वडोदऱ्याच्या फॉरेन्सिक लॅबमधून डीएनए मॅचिंग किट्स आणि उपकरणं आणली गेली. ४० हून अधिक तज्ज्ञ डॉक्टर्स आणि २०० कर्मचारी रात्रंदिवस हे मिशन यशस्वी करण्यासाठी धडपडत होते.

PMRDA : शिवाजीनगर ते हिंजवडी मेट्रो -३ला आणखी विलंब!
गारेगार प्रवाससाठी वर्षभर थांबाच! आयटी अभियंत्यांना थंडगार व आरामदायी प्रवासासाठी आणखी वर्षभर प्रतिक्षाच करावी लागणार आहे. कारण हिंजवडी ते ...
मृतांच्या नातेवाईकांचे २५० हून अधिक रक्ताचे नमुने गोळा करण्यात आले. जळालेल्या हाडांमधून आणि ऊतींमधून डीएनए काढण्याचं आव्हानात्मक काम सुरू झालं. आरटी-पीसीआर आणि सिक्वेन्सिंगद्वारे तपशीलवार डीएनए प्रोफाइल्स तयार केली गेली. आंतरराष्ट्रीय मानकांनुसार अनुवांशिक घटकांची ओळख पटवली गेली. अपघातात मृतदेहांचे चेहरे, बोटांचे ठसे, दात नष्ट झालेले होते. डीएनए प्रोफाइलिंग हाच एकमेव विश्वसनीय पर्याय होता. ही प्रक्रिया अत्यंत क्लिष्ट होती, मात्र फॉरेन्सिक टीमने अवघ्या ३६ तासांत पहिल्या मृतदेहाची ओळख पटवली. अपघातानंतर अवघ्या सात दिवसांत २१० मृतदेहांची ओळख पटवण्यात यश आलं. २०४ मृतदेह त्यांच्या कुटुंबीयांना सुपूर्द करण्यात आले. ज्यात ३० ब्रिटिश आणि ४ पोर्तुगीज नागरिकांचा समावेश होता. या मिशनमुळे भारताची फॉरेन्सिक क्षमता जगाने पाहिली आणि जागतिक पातळीवर चर्चा झाली.
डीएनए जुळवणं हे मिशन केवळ तांत्रिक यश नव्हतं, तर माणुसकीचा विजय होता. कमी वेळेत मृतदेहांची ओळख पटवणं हे मोठं आव्हान होतं. भावनिक आव्हानांना सामोरे जावं लागत होतं. या सर्व अडचणींवर मात करत फॉरेन्सिक टीमने अशक्य ते शक्य करून दाखवलं. संकट काळात भारताच्या सामर्थ्याची, विज्ञानाची आणि माणुसकीची 'एकी' दिसली. या डीएनए जुळवणी मोहिमेने भारत एकजुटीने आणि ताकदीने पुढे जातो, हे भारताने जगाला दाखवून दिलं.