Thursday, June 19, 2025

अरण्यातले वनऋषी

अरण्यातले वनऋषी

ज्येष्ठ साहित्यिक आणि अरण्यऋषी असे ज्यांना आदराने नाव दिलेले होते असे मारूती चितमपल्ली यांना वयाच्या ९३ व्या वर्षी देवाज्ञा झाली. ९३ वर्षे हे काही लहान-सहान आयुष्य नव्हे. पण त्या आयुष्यात हा माणूस पक्षी आणि प्राण्यांचा मित्र होता आणि त्यांचा अभ्यासक होता. त्यासाठी त्यांनी वनक्षेत्रपाल नोकरी करत असताना आपले आयुष्य या आपल्या मुक्या मित्रांसाठी वेचले आणि लोकांना प्राणी आणि पक्ष्यांची महती सांगितली. नुसती सांगितलीच नव्हे तर लोकांमध्ये आवड निर्माण व्हावी म्हणून काम केले. त्यांना अरण्यऋषी म्हटले गेले. पण ते खरोखरच अरण्यातील तपस्वी होते आणि त्यांनी या आपल्या मुक्या मित्रांसाठी आयुष्यभर खूप काही केले आणि त्यांचा अभ्यास केला. चितमपल्ली यांनी अनेक पुस्तके लिहिली आणि त्यांचे 'चकवाचांदण' असो किंवा 'नवेगाव बांधचे दिवस' असो, जंगलातील एक विलक्षण अनुभूती देते. चितमपल्ली यांनी लौकिकार्थाने वानिकी विद्या शिकून सरकारी नोकरी केली आणि अखेरपर्यंत ते वन्य जीवांसाठी जगले. सोलापूर येथे जन्मलेले चितमपल्ली यांनी आपले उर्वरित जीवन विदर्भात घालवले आणि विदर्भातील जंगलांत त्यांनी आयुष्यातली उमेदीची वर्षे घालवली. त्यांनी केवळ वन खात्यात नोकरी केली नाही, तर संस्कृत पाठशाळेत अध्ययनही केले आणि जर्मन आणि रशियन भाषांचा अभ्यासही केला. पण त्यांचे जीवन वनाधिकारी म्हणून कार्य करण्यासाठी वेचले आणि त्यात त्यांनी महाराष्ट्राला जंगल वाचायचे कसे हे शिकवले.


कर्नाळा पक्षी अभयारण्य, मेळघाट प्रकल्प आणि नवेगाव येथील प्रकल्पांच्या विकासात त्यांचे योगदान आहे. पण त्यांची ओळख आहे ती म्हणजे निसर्ग आणि पर्यावरणाशी नाळ जोडलेला माणूस म्हणून आणि हीच त्यांची ओळख शेवटपर्यंत कायम होती. चितमपल्ली यांच्या आईने त्यांना प्रथम जंगलावर प्रेम करायला शिकवले. १९६० मघ्ये महाराष्ट्रात त्यांची वनाधिकारी म्हणून नियुक्ती झाल्यावर त्यांनी महाराष्ट्रातील जंगलाचा अभ्यास केला आणि इतरांनाही शिकवला. त्यांचे पहिले वनाधिकारी म्हणून दशक कोकणात गेले, ज्यावेळी तेथे कोणतेही राष्ट्रीय उद्यान अथवा अभयारण्य नव्हते. पण त्यांचा अभ्यास आणि निसर्गाचे वाचन खरे सुरू झाले ते नवेगाव येथे नियुक्ती झाल्यावर आणि तेथील माधवराव पाटील यांना भेटल्यावर. त्यांनी साहित्यात ही सारी पात्रे अजरामर केली आहेत. माधवराव पाटील हे तर साधे शिकारी होते. पण त्यांना या अरण्यऋषीचा सहवास घडला आणि ते जंगलाचे अभ्यासक बनले. महाराष्ट्रातील रहिवाशांमध्ये जंगले लोकप्रिय करण्याचे श्रेय निःसंशय चितमपल्ली यांच्याकडेच जाते. कारण त्यांच्यामुळेच आज लोक जंगलाकडे वळले आहेत आणि लोकांत जंगले पाहण्याची आवड निर्माण झाली आहे. साहित्यिक म्हणून त्यांचे श्रेय प्रचंड आहे आणि त्याचे पहिले पुस्तक 'पक्षी जाय दिगंतरा.' हे आले तेव्हा ते बेस्ट सेलर ठरले. तेव्हा हा कोण नवीन लेखक आला आहे असा प्रश्न मान्यवर साहित्यिकांना पडला होता. नंतर चितमपल्ली हे सर्वपरिचित झाले आणि ते महाराष्ट्रात लोकप्रिय लेखक बनले. त्यांच्या पुस्तकांनी नवीन शैली सुरू केली आणि नवीन लेखकांना प्रोत्साहन दिले असे तज्ज्ञांचे मत आहे. हा माणूस कायम जंगलात वास्तव्याला असायचा आणि त्यामुळे त्यांचे जीवन जंगलातील हवेने, तेथील ताज्या घटनांनी समृद्ध झालेले होते आणि त्यांच्या नियमित परिघाला समृद्ध करणारा अनुभव देणारा लेखक जन्माला आला होता.


साहित्यिक या दृष्टीने चितमपल्ली यांचे जीवन, लेखन आणि अनुभव हे इंग्रजी लेखकाच्या जवळ जातात. कित्येक नामवंत लेखक असे आहेत की, त्यांनी आपल्या लेखनासाठी चाकोरीतील आयुष्य सोडले आहे आणि नवीन आयुष्य सुरू केले. चितमपल्ली त्यातच गणले जातात. त्यांनी आयुष्यभर जंगलातील माणूस म्हणून जगण्यात समाधान मानले आणि तरीही त्यांनी कधीही कमीपणा मानला नाही. चितमपल्ली यांनी महाराष्ट्राला जंगल वाचायला शिकवले असे जे म्हटले ते या अर्थाने. ते कित्येक वेळा पक्ष्यांच्या जीवनक्रमाचा अभ्यास करत असत आणि त्यांच्या नोट्स घेत असत. त्यातून त्यांची अनेक पुस्तके जन्माला आली. चितमपल्ली हे सरकारी नोकरी करत राहून व्रतस्थ होते आणि त्यांनी पक्षी कोश लिहिला तेव्हा त्यात ४०० हून अधिक पक्ष्यांचा त्याच्या स्थलांतराचा अभ्यास त्यात आहे. त्यांची एक खंत होती ती म्हणजे आजचे वनपाल पुरेसे निरीक्षण करत नाहीत आणि नोंदी घेत नाहीत. कित्येक वनपाल तर केवळ टाकणे याच एका हिशोबात काम करत असतात. अर्थात चितमपल्ली यांना जे पाहिजे होते ते आज कुणीही करणे शक्य नाही. कारण आज जो तो पगार आणि आपण इतकेच पाहत असतो. त्यामुळे चितमपल्ली खंत घेऊन गेले हे त्यांचे प्रारब्धच होते. महाराष्ट्रातील जंगलात ३६ वर्षे वास्तव्य करून अत्यंत समृद्ध अनुभव गाठीशी बांधून चितमपल्ली आज आपल्यात नाहीत. चितमपल्ली यानी केवळ जंगलावर पुस्तके लिहिली आहेत आणि त्यात 'रानवाटा' जसे आहे तसेच 'रातवा' आणि कितीतरी आहेत.


सोलापूरमध्ये झालेल्या साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते. तरुणालाही लाजवेल अशा पद्धतीने आणि तडफेने काम करण्याची त्यांची प्रवृत्ती होती. त्यांनी 'पक्षी कोश' लिहिला तसेच 'वृक्ष कोश' लिहिण्याचे त्यांचे काम अर्धवट राहिले. अरण्य वाचन आणि सतत कार्यरत राहणारा ऊर्जावान असा हा लेखक होता. पण आज त्यांचा जीवनप्रवास काळाने संपवला आहे. त्यासाठी लागणारी माहिती मिळवण्यासाठी वाट्टेल ते कष्ट करण्याची तयारी त्यांची होती. त्यामुळे 'पक्षी कोश' त्यांच्याकडून लिहून झाला. त्यांच्या पुस्तकात प्राणी जीवनाबद्दल मनोरंजक माहिती आहे. चितमपल्ली यांच्या मते अनेक वृक्ष पावसाचे संकेत देतात. बिब्याच्या झाडाला फुले लागली, तर त्या भागात दुष्काळ पडतो असे त्यांचे निरीक्षण होते. असे अनेक मनोरंजक, निरीक्षण आणि ज्ञान त्यांच्या लेखनात होते. चितमपल्ली यांना भावपूर्ण श्रद्धांजली. चितमपल्ली यांच्यासारखे लोक आता होणार नाहीत. हा ठेवा आहे. तो काळाने न मागता आपल्याला दिला होता आणि न सांगता नेलाही.

Comments
Add Comment