Wednesday, June 18, 2025

स्वामी विवेकानंद : एक थोर युगपुरुष

स्वामी विवेकानंद : एक थोर युगपुरुष

आत्मज्ञान : प्राची परचुरे वैद्य


ज्यांच्या विचारांनी सतत नवी ऊर्जा मिळते असे युवकांचे प्रेरणास्थान व आपल्या भारतीय तत्वज्ञानाचा ठसा उमटवणारे एक तेजस्वी व्यक्तिमत्त्व म्हणजे स्वामी विवेकानंद!


अंधश्रद्धाळूंचा देश, गुलामांचा देश म्हणून भारताला हिणवले जात असे. स्वामी विवेकानंद हे सांगतात, ‘‘भारतीय बंधूनां परस्पराचे गुणग्रहण करावयास शिकविणारी, परस्परांना साहाय करावयास शिकविणारी संघटना फार आवश्यक आहे. माझ्या अमेरीकेतील कार्याविषयी आनंद व्यक्त करण्यासाठी कलकत्त्यात योजलेल्या सभेत पाच हजार लोक आले होते. अन्य गावी शेकडोची उपस्थिती होती. हे ठिकच आहे. पण आपल्या माणसांपैकी प्रत्येकाला ‘‘तु एक आणा दे’’ असे म्हटले असते तर कितींनी तो दिला असता? आमच्या सर्व देशाला दुसऱ्यावर अवलंबून राहायची सवय आहे. घास त्यांच्या तोंडापर्यत आणूल दिला तर ते आनंदाने खातील. पण काही जण असेही म्हणतील की,‘आम्हाला भरवा हो’! तुम्ही आत्मनिर्भर होऊ शकत नसलात तर तुम्ही ह्या जगात जगण्यास नालायक आहात.’’ स्वामीजी भारतीयांच्या डोळयात झणझणीत अंजन घालीत आहे. देशाला स्वामी विवेकानंदांच्या मनुष्य निर्माण विचारांची आजच्या परिस्थितीत भारताला आत्मनिर्भर करण्यासाठी आवश्यक आहे.


आपल्या भारतवर्षावर जेव्हा परकीयांची एकामागोमाग अनेक आक्रमणे झालीत आणि तेव्हा भारतीयांचा पराक्रम लोप पावला, आपआपसात वैमनस्य वाढले. चांगल्या वाईटांचा विवेकही नाहिसा झाला आणि सगळ्या गुणांची माती झाली. आम्ही गुलाम आहोत, आम्ही दुर्बल आहोत, आम्ही फक्त सेवेचे अधिकारी, राज्य करावे तर परकीयांनीचं! असा भाव सगळीकडे उत्पन्न झाला. याचा परिणाम असा झाला की, परकीयांनी आपल्या देशात शेकडो वर्षे राज्य केले. भारताच्या उन्नतीचा मार्ग हरवून बसलो. भारताच्या स्वातंत्र्यानंतर ही पाश्चात्य विचारांच्या गुलामीचे मानसिकतेचे भूत मात्र तसेच बसून राहिले. परकीय इंग्रज भारताच्या समोरच्या दरवाज्यातून गेले आणि मागच्या दरवाज्यातून विदेशी कंपन्यांची भरमार देशात होवू लागली त्याला कारणीभूत होती ती आपली इंग्रजाळलेली परकीय गुलामीची मानसिकता. ही गुलामीची मानसिकता भारतीयांनी झुगारून टाकावी यासाठी महान तत्ववेत्ता स्वामी विवेकानंद यांनी संपूर्ण आयुष्य खर्ची घातले होते.


भारतीयांना जागृत करताना स्वामीजी म्हणतात, ‘‘भारतीयांनो, मोहमायेतून जागे व्हा! ते कसे व्हायचे याचा मार्ग आपल्या अध्यात्मिक ग्रंथामध्ये आहे. आपल्या मूळ स्वरूपाचे ज्ञान करून घ्या. आपल्यातल्या सुप्त शक्तीला आवाहन करा. ही सुप्त आत्मशक्ती जागृत कार्यशक्तीच्या रूपाने प्रकट झाली म्हणजे प्राप्त होणार नाही असे काय आहे? सामर्थ्य येईल, वैभव येईल, सदगुण येईल, शुचिता येईल! जे उदात्त, उत्तम, उन्नत आहे.’’ स्वामी विवेकानंदांनी आत्मनिर्भर भारत निर्माण होण्यावर खूप भर दिला.


सन १८५७ च्या स्वातंत्र समरानंतर सर्वांत महत्त्वाची घटना घडली असेल तर ती म्हणजे ११ सप्टेंबर १८९३ रोजी शिकागो येथे धर्मसभेला केलेले उद्बोधन. समस्त भारतीय जीवन दर्शन, संस्कृती आणि सभ्यता हे त्यांनी आपल्या ओजस्वी वाणीने मांडले. त्यामुळे भारताकडे पाहण्याचा जगाचा दृष्टिकोन बदलला.


स्वामीजी म्हणत असत की, धर्म हेच आपल्या जीवनाचे तत्व आहे. हिंदुस्थानाचा प्राण आहे. गुलामीच्या काळातही आम्ही आपला धर्म आणि संस्कृती यांची कास धरली. संत, सत्पुरुषांनी भारतीय विचारांना तेजोमय ठेवण्याचे महान कार्य केले आहे. राष्ट्रावरील नितांत प्रेम यांमुळेच स्वामीजींनी या सर्व गोष्टी सांगितल्या आहेत. म्हणूनच आपण त्यांच्यावर पूर्ण विश्वास ठेवला पाहिजे. स्वामींचा स्पष्ट इशारा आहे की, आपण धर्माची उपेक्षा करू, तर तीन पिढ्यांतच नष्ट होवून जाऊ. म्हणूनच राष्ट्र जीवनात कार्य करताना अध्यात्मिक अधिष्ठानावरच राष्ट्राचे पुनरूज्जीवन करावे लागेल. आपल्या दैनंदिन व्यावहारिक जीवनात आपण स्वामीजींच्या उपदेशानुसार समाज जीवनात आचरणात आणू या. आपल्याला वैभवशाली जागृत भारत निर्माण करायचा आहे. प्रत्येक भारतीयांच्या मनात माझा भारत ही भावनेचे जागरण करण्याची आवश्यकता आहे. या विधायक कार्यासाठी समस्त युवकांनी झोकून दिले पाहिजे. ठरवलेले उद्दिष्ट साध्य होईपर्यंत न थांबता सतत काम करत राहणे हा त्यांचा विचार कायम आत्मसात करायला हवा.

Comments
Add Comment