
दुरशेत फाट्यावर रास्ता रोको आंदोलन
पेण : खरोशी ग्राम पंचायत हद्दीत असणाऱ्या दुरशेत गावातील ग्रामस्थांनी एकच धून सतारा जून हे घोषवाक्य घेऊन आज आपल्या हक्काच्या रस्त्यासाठी आपल्या गावाच्या इतिहासातील पहिले आंदोलन केले. गावातून पुढे आदिवासी वाडीवर असणाऱ्या गौण खनिज कॉरीवर जाणारा रस्ता हा दुरशेत गावातून जात असल्याने या रस्त्यावरून भरधाव वेगाने जाणाऱ्या ओव्हरलोड गाड्यांमुळे रस्ता अतिशय खराब होऊन जीवितहानी होण्याची भीती असल्याने हा मार्ग कॉरीवर जाणाऱ्या अवजड वाहतुकीसाठी बंद करण्याची मागणी घेऊन आज दुरशेत गावातील ग्रामस्थांनी मुंबई - गोवा हायवेच्या दुरशेत फाट्यावर रास्तारोको आंदोलन केले.
पेण तालुक्यातील खारोशी ग्राम पंचायत हद्दीत असणाऱ्या दोन आदिवासी वाड्यांच्या परिसरात गौण खनिज कॉरी सुरू आहे. ही कॉरी सुरू करताना दिलेल्या आश्वासनाप्रमाणे पर्यायी रस्ता तयार करून वाहतूक केली जाईल असे आश्वासन देण्यात आले होते. ते आश्वासन पूर्ण न झाल्याने त्यांच्याशी कोणत्याही प्रकारची चर्चा न करता आता प्रशासनासोबतच कायदेशीर लढाई करण्याचा निर्णय घेऊन हे आंदोलन दुरशेत गावातील महिला वर्ग, ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थी आणि तरुणाई असे शेकडो गग्रामस्थांनी आज रस्ता रोको आंदोलन केले. यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे रायगड जिल्हा संपर्क प्रमुख प्रसाद भोईर, तालुका प्रमुख समीर म्हात्रे, शेकापचे खजिनदार अतुल म्हात्रे यांनी देखील आंदोलनाला भेट देऊन आपला पाठिंबा दर्शवला. तर या आंदोलनकर्त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते संतोष ठाकूर आणि काँग्रेसच्या नंदा म्हात्रे यांनी देखील मार्गदर्शन केले.
दिवसभर चाललेल्या या आंदोलनाबाबत प्रशासनाच्या वतीने तहसीलदार तानाजी शेजाळ आणि पोलिस उप अधीक्षक रवींद्र दौंडकर तसेच पोलीस निरीक्षक संदीप बागुल यांनी आंदोलकांशी चर्चा केल्यानंतर सदर आंदोलन तुर्तास स्थगित करण्यात आले आहे. यावेळी नायब तहसीलदार प्रसाद कालेकर, तुषार कामत हे देखील उपस्थित होते.
सदर खाणीवर जाणारा रस्ता पूर्ण करण्यासाठी पंधरा दिवसांचा अल्टिमेटम दिला गेला असून पर्यायी रस्ता करताना ग्रामस्थांच्या मूळ रस्त्यावरून सुरुवातीचे चार दिवस खाणीवरील वाहतूक बंद ठेवण्याची मागणी पूर्ण करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे वाहतूक सुरू असताना तीन शिफ्टमध्ये दोनप्रमाणे सहा सुरक्षा रक्षकदेखील तैनात ठेवण्यात येणार असून ग्रामस्थांच्या मागणीप्रमाणे खराब झालेला रस्ता तातडीने डागडुजी करण्याची मागणी देखील मागणी मान्य करण्यात आली असल्याने आजचा ग्रामस्थांचा आंदोलन यशस्वी झाला असून पंधरा दिवसांत मागण्या पूर्ण न झाल्यास थेट मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर रस्ता रोको केला जाईल असे ग्रामस्थ उदय गावंड यांनी सांगितले.