Wednesday, June 18, 2025

ब्रह्मर्षी भृगू

ब्रह्मर्षी भृगू

भारतीय ऋषी : डॉ. अनुराधा कुलकर्णी


महर्षींणा भृगुरहं
गिरामस्येकमक्षरम्।
गीता अ.१०,२५


भगवद्गीतेच्या दहाव्या अध्यायात भगवंतांनी आपल्या विभूती सांगितल्या आहेत. भगवंत ज्यांच्यात प्रकर्षाने प्रकट होतात, त्या आपल्या विभूती होत, असे त्यांनी म्हटले आहे. “महर्षीणां भृगुरहं” (गी. अ. १०,२५) सर्व महर्षींमध्ये भृगुमहर्षींमध्ये मी आहे, असे जे भगवंत म्हणतात, त्यातूनच महर्षी भृगूंचे महात्म्य सिद्ध होते. भगवान विष्णूंचे जे चतुर्भुज स्वरूप आहे, त्यात त्यांच्या वक्षस्थळावर ‘श्रीवत्स’ म्हणून खूण आहे. ती खूण भगवान विष्णूंनी मोठ्या प्रेमाने, अभिमानाने धारण केली आहे, ब्रह्मा, विष्णू, महेश यांत श्रेष्ठ म्हणजे गुणातीत कोण आहे, हे पाहण्यासाठी भृगू महर्षींनी या तिघांची प्रचिती पाहिली. ब्रह्मा व महेश या दोघांना भृगूंच्या प्रचितीसाठी धारण केलेल्या उद्धटपणाचा खूप राग आला, पण विष्णुला भृगूंनी छातीवर लाथ मारूनही विष्णू न रागावता उलट भृगूंच्या पायाला लागले असेल म्हणून तो पाय चुरीत राहिले. अर्थातच विष्णू त्रिदेवांमध्ये त्रिगुणातीत, श्रेष्ठ ठरले. ते अजूनही आपल्या छातीवरची भृगूंच्या लाथेची खूण मिरवत असतात.


अखिल मानवजातीचे जीवन कल्याणमय, तेजोमय करण्यासाठी अंगिरा, भृगु व अत्री हे ऋषीवर यज्ञाग्नीतूनच अवतरले. अंगिरांना अग्निपुत्र, भृगूंना वरुणपुत्र, तर अत्रींना ब्रह्मपुत्र म्हटले जाते. महर्षी भृगूंनी अरणींच्या घर्षणातून अग्नी निर्माण करण्याचा शोध सर्वप्रथम लावला. अग्नीच्या ज्वाला किंवा अग्नीचा आवाज या अर्थाच्या “भृग्’’ या धातूपासून भृगू नाम बनले आहे. महर्षी भृगू हेचाक्षुष मन्वतरातील सप्तर्षींपैकी एक, ब्रह्माच्या मानस पुत्रांपैकी एक. भृगूंचे पालनपोषण वरुण व वरुणपत्नी चर्षणी यांनी केले म्हणून भृगूंना वरुणपुत्र वा चर्षणीपुत्र असेही म्हणतात. महर्षी भृगू आणि महर्षी अंगिरा यांनी अनेक संशोधनपर सत्कार्ये जोडीने केलेली दिसतात. त्यांनी असंख्य वनस्पतींच्या गुणधर्मांचे संशोधन करून कोणत्या औषधी वनस्पती कोणत्या रोगावर उपयुक्त आहेत, हे शोधून काढले. ते त्यांनी अथर्ववेदात नमूद केले आहे. म्हणून अथर्ववेदाला “भृग्वंगिरसवेद’’असेही म्हणतात. ऋग्वेदाच्या नवव्या मंडलातील ६५ वे सूक्त भृगू व जमदग्नी यांचे, तर दहाव्या मंडलातील १९ वे सूक्त भृगू, मथित व च्यवन यांचे आहे.


यः उत् आनट् वि-अयनं
यः उत् आनट् परा-अयनं ।
आवर्तन निवर्तन
अपि गोपाः नि वर्ततां
।।ऋ.मं.१०.५


जो गोपालक सगळ्या गाईंना शोधून परत आणतो, गाईंच्या बरोबर रोज सगळीकडे फिरून गोपालनाचा अनुभव मिळवितो. जो गाईंना परत गोशाळेत आणतो व दुसऱ्या दिवशी सकाळी चरावयास नेतो, तो गोपालक रोज सुखरूप परत येवो, असा वरील वेदमंत्राचा सरलार्थ वाटत असला तरी त्यातला या भृगुच्यवनादी मंत्रद्रष्ट्यांना अभिप्रेत असलेला भावार्थ फार सुंदर आहे. ‘गो’ या शब्दाचा अर्थ जसा गायी तसाच त्याचा दुसरा अर्थ इंद्रिये हाही होय. जो योगी विषयभोगांमध्ये रममाण झालेल्या आपल्या सर्व इंद्रियांना भोगांपासून परावृत्त करून अंतर्मुख होतो, आत्मचिंतन करतो, परत आपली प्राप्त कर्तव्ये करण्यासाठी त्या इंद्रियांना कामाला लावतो, कर्मयोगाने कर्म करूनही निरहंकारी, निर्मम होतो आणि परत सर्व इंद्रिये बाह्य विषयांकडून परतवून आत्मध्यानात मग्न होतो, अशा गोपालकाचे कार्य सुरळीत चालो. अशारीतीने या सूक्तात कर्मयोग व ध्यानयोग यांचा सुरेख समन्वय साधला आहे.भृगू हे अंगिरसाप्रमाणे आथर्वण धर्माचे प्रणेते आहेत. वेदांच्या रचनेला भृगुकुलातील पुरुषांनी बराच हातभार लावला आहे. भृगूंच्या नावावर भृगुस्मृती, भृगुगीता, भृगुसंहिता, भृगुसूत्र आहे. त्यांनी वास्तुशास्त्रावरही ग्रंथ लिहिला आहे.(पूर्वार्ध)

Comments
Add Comment