Wednesday, June 18, 2025

रानभाज्यांची मेजवानी...!

रानभाज्यांची मेजवानी...!

माझे कोकण : संतोष वायंगणकर


महाराष्ट्रात किती आणि कुठेही पाऊस पडला तरीही कोकणात पडणारा पाऊस त्याची संततधार आणि आकाश कोसळल्यासारखे पडणं आणखी कुठे असेल असे वाटत नाही. कोकणात तीन-चार महिने पाऊस पडतो. या चार महिन्यातील पावसाळ्यात मनाला आनंद देणाऱ्या विविधांगी निसर्गाने दिलेले चैतन्य असते. गेल्या काही वर्षामध्ये ऋतुचक्र बदलेल असलं तरीही कोकणातला पाऊस, त्यांच बरसणं हे निश्चितचं फार वेगळ आहे. म्हणूनच कोकणातील साहित्यिक आपल्या कोकणातील निसर्ग, त्याचं सौंदर्य आणि त्याच्या वेगळेपणाविषयी भरभरून लिहितात. ज्येष्ठ साहित्यिक कवी, गीतकार मंगेश पाडगावकर यांनाही कोकणातील या पावसाने फारच अस्वस्थ केलं. म्हणूनच कवीवर्य मंगेश पाडगावकर यांनी ‘वेंगुर्ल्याचो पाऊस’ नावाची कविता केली. पाडगावकरांच्या वेंगुर्ल्याच्या पावसाला सर्वत्रच भरभरून दाद दिली गेली. यावरून कोकणातील पावसाळा, पडणारा पाऊस अधोरेखित होतो. कोकणातील पावसाळ्यात कोकणवासीय बहुतांश शेतकरी भातशेतीत रमायचे. कोकणातील शेतकरी पारंपरिक पद्धतीची शेती करायचे. त्यामुळे कोकणातील भातशेती शेतकऱ्याला फार किफायतशीर त्याकाळी अजिबातच नव्हती. परंतु घरात भरलेलं भात, भुईमूग, नाचणी, बरक या शेतीतून जे पिकायच शेतकऱ्याच्या हाताला लागायच त्यातही तो समाधानी असायचा. खिशात रोख पैशांची निश्चितच वानवा होती; परंतु तरीही घरात भरलेलं भात, गावठी तांदुळ आणि मनाची श्रीमंती यामुळे या अशा गरीबीतही तो आनंदी होता.


गेल्या पंचवीस-तीस वर्षांत कोकण फारच बदललं आहे. गावात रहाणाऱ्यांची संख्या कमी झाली. यामुळे शेतात राबणारे हात कमी झाले. शेतीत घरची माणसं राबत नाहीत. काम करत नाहीत. त्यांची शेती उरली नाही. मजुरीवर भातशेती करता येणार नाही. आणि शेतात काम करणारे मजूरही मिळत नाहीत. अशीच काहीशी स्थिती आहे. त्यामुळे पारंपरिक शेती, त्याची बी-बियाणी जाऊन जास्त भातपीक देणारी भातबियाणी विकसित कोकण कृषी विद्यापिठाने विकसित केलेली आहेत. प्रयोगशील आणि प्रगतशील नव तरुण शेतकरी भातशेतीचे प्रयोग करतात असा तरुण कमी खर्चात जास्त भात उत्पादन घेण्याचा प्रयत्न करताना दिसतो. केवळ भात, आंबा, काजू यावर अवलंबून न राहता कलिंगड, केळी, अननस अशा फळपिकांचे, भाजीचे उत्पादन घेण्याचा प्रयत्नही शेतकरी करीत आहेत.


पूर्वी कोकणात पावसाळी हंगाम सुरू झाला की कोकणातील प्रत्येक घरात रानभाज्यांचा पौष्टिक आणि सात्विक आहार होता. कोकणातल्या घरच्या गरीबीत कुटुंबांना कोकणातील शेताच्या बांधावर, डोंगरावर, पावसाळ्यात उगवणाऱ्या रानभाज्यांचा मोठा आधार असायचा. भाकरी सोबत कुरडू, भारंगी, कुड्याच्या शेंगा, एकपान भाजी, फोडशी, पेवगा, टाकळा, पाथरी, कर्टली(फागला), रानघोळ, चिवार कोंब-बांबू, कनकीचे कोंब, घोटीचे वेल भाजी, रान अळू, चिबूड भाजी, गोमेटाची भाजी अशा तीस-चाळीस प्रकारच्या रानभाज्या कोकणातील प्रत्येक शेतकऱ्याच्या घरात व्हायच्या. घरात शेंगतेलाचा किंवा खोबरेल तेलाचा साठाही जेमतेम. त्यामुळे तेव्हा चमचमीतपणाची चव शेतकऱ्याच्या जिभेला नव्हती. जे पानात असेल ते खाण्याशिवाय त्या पिढीतील लोकांसमोर कोणताही पर्याय नव्हता. कोकणात चायनिज सेंटरचा पसारही झाला नव्हता. त्यामुळे पावसाळ्यात रानभाज्याच खायच्या त्याला कोणतेही पर्याय नव्हते. घरातील लहानांपासून मोठ्यापर्यंत सर्वांनाच रात्रीची पेज आणि भाकरी-भाजी असाच सर्वसाधारणपणे जेवणाचा ‘मेन्यू’ होता. याच रानभाज्यांनी कोकणातील अनेक कुटुंब जगवली, वाढवली आणि धष्टपुष्टही बनवली. कोकणातील प्रत्येक रानभाजीमध्ये शरीराला आवश्यक असणार जीवनसत्त्व आहे. बर दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे कोकणातील या रानभाज्या पूर्णपणे नैसर्गिक वातावरणात रासायनिक कोणताही काहीही वापरता तयार झालेल्या असतात.


मधल्या काही वर्षांत काहीशी बाहेरच्या जगाची हवा कोकणालाही लागली. यामुळेच अनेक तरुणांना रानभाज्या हा प्रकार काय आहे, त्याविषयी काहीच माहिती नाही; परंतु तरुण पिढीतील काहीजणांना रानभाज्यांचे महत्त्वही माहीत आहे. यामुळेच रानभाज्या आपल्या ताटात असाव्यात यासाठी त्यांचा आग्रह असतो. अलीकडे जेव्हा समाजात सर्वत्रच कॅन्सरच प्रमाण वाढू लागल्याने साहजिकच या रानभाज्यांची आवश्यकता अधिक वाटू लागली. अलीकडे तर रानभाज्या प्रत्येकाच्या आहारात असायला हव्यात यासाठी त्याला मागणीही वाढू लागली आहे. पूर्वी फार कमी प्रमाणात असणाऱ्या रानभाज्या दिसू लागल्या आहेत. आणि चढ्या दराने लोकही या रानभाज्या खरेदी करतात. या रानभाज्या स्वादिष्ट वाटल्या नाहीत तरीही त्यातली जीवनसत्व आणि पौष्टिकतेने त्याला आता मागणी वाढू लागली आहे.
काही रानभाज्या या रोगप्रतिबंधक आहेत. काहीमध्ये प्रोटीनचं प्रमाण अधिक आहे. यामुळेच ज्यांना याच महत्त्व समजतयं ते जेवणात रानभाज्यांच प्रमाण वाढवताना दिसतात. मात्र, जंगल परिसरात उगवणाऱ्या रानभाज्या आणण्याची हिमंत आता होत नाही. वन्यप्राण्यांचा लोकवस्तीत वाढलेल्या मुक्त संचारामुळे डोंगरात जाणार कोण? असा प्रश्नही निर्माण होतो. अलिकडे शालेय, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना या रानभाज्या, तृणधान्य याची ओळख व्हावी यासाठी रानभाज्यांच खास प्रदर्शनही होत आहेत. यामुळे साहजिकच शाळा महाविद्यालयांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना रानभाज्यांची ओळख होऊ लागली आहे. ग्रामीण भागात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या कानावर किमान काही ठराविक भाज्यांची किमान नाव तरी कानावर पडलेली असतात. परंतु शहरी भागातील विद्यार्थ्यांना या रानभाज्यांविषयी काहीच माहिती नसते. केवळ माहिती व्हावी म्हणून नव्हे तर या कोकणातील पौष्टिक असणाऱ्या रानभाज्याही तरुणांच्या जेवणात यायला हव्यात ते सात्विक आहे. निसर्गनिर्मित आहे त्याचा आस्वाद घेता येत असेल तर ते निश्चितच फार मोठ सुख आहे आणि ते निश्चितच कोकणात आहे.

Comments
Add Comment