Wednesday, June 18, 2025

‘गणरचनेचा बिगुल’: जि. प. निवडणुकांच्या रणशिंगाला सुरुवात

‘गणरचनेचा बिगुल’: जि. प.  निवडणुकांच्या रणशिंगाला सुरुवात

प्रभागांची आखणी सुरू : राजकीय पक्ष मैदानात उतरले !


अ.नगर : ग्रामविकास विभागाच्या निर्देशानुसार जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर प्रभाग रचना प्रक्रियेला प्रशासनिक गती मिळाली आहे. जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी यासंदर्भात आदेश काढत जिल्हा आणि तालुकास्तरावर समित्या स्थापन केल्या आहेत.



या समित्यांच्या अध्यक्षपदावर जिल्हाधिकारी राहणार असून जिल्हास्तरीय समितीत उपजिल्हाधिकारी महसूल, तहसीलदार (सामान्य प्रशासन), आणि संगणक तज्ज्ञ यांचा समावेश करण्यात आला आहे. तर तालुकास्तरावर उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, नायक तहसीलदार आणि संगणक तज्ज्ञ सदस्य म्हणून काम पाहणार आहेत. ग्रामविकास खात्याच्या निर्देशानुसार, अहिल्यानगर जिल्ह्यात जिल्हा परिषदेचे ७५ गट तर पंचायत समितीचे १५० गण निश्चित करण्यात आले आहेत. यानुसार, १४ जुलै रोजी प्रारूप प्रभाग रचनेची अधिसूचना प्रसिद्ध केली जाणार आहे, तर १८ ऑगस्ट २०२५ रोजी अंतिम प्रभाग रचना राज्य निवडणूक आयोगाकडे सादर केली जाणार आहे.या प्रक्रियेसोबतच जिल्हास्तरावर प्रशासकीय हालचालींना वेग आला असून प्रभाग रचनेची जबाबदारी संबंधित समित्यांवर सोपवण्यात आली आहे. प्रारूप तयार करताना अधिनियम, नियम आणि शासन निर्णयांचे काटेकोर पालन करण्यात येणार आहे. योग्य नकाशे तयार करणे, त्यांची पडताळणी करणे, आणि आवश्यक असल्यास सुधारणा करणे हे काम समितीमार्फत केले जाईल.दरम्यान, या प्रक्रियेसह राजकीय पक्षांनी देखील निवडणुकीच्या हालचाली सुरू केल्या आहेत. गावागावात बूथ पातळीवर कार्यकर्त्यांची नियुक्ती, बैठका, गणित मांडणी यासारखी तयारी वेग घेत आहे.प्रभाग रचना अंतिम झाल्यानंतर निवडणुकीच्या घोषणेला चटपटीत सुरुवात होणार, अशी चर्चा आता जिल्हाभर सुरु झाली आहे.




  • जिल्हा परिषद – ७५ गट, पंचायत समिती – १५० गट

  • १४ जुलै – प्रारूप प्रभाग अधिसूचना जाहीर

  • १८ ऑगस्ट – अंतिम मंजुरीसाठी निवडणूक आयोगाकडे अहवाल

  • प्रशासनासोबत राजकीय पक्षही निवडणुकीसाठी सज्ज

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा