
राज्यातील जवळपास सर्वच भागात मोसमी पाऊस सक्रिय झाला आहे. यंदा आतापर्यंत ११.७० लाख हेक्टरवर पेरण्या झाल्या आहेत. गेल्या वर्षी १४५.८२ लाख हेक्टरवर अंतिम पेरण्या झाल्या होत्या. त्या तुलनेत यंदा सरासरी आठ टक्के पेरण्या झाल्या आहेत. खरीप हंगामातील पूर्वमशागतीची कामे सुरू आहेत. राज्यातील काही भागात सतत पाऊस सुरू असल्याने पेरण्या खोळंबल्या आहेत.
अहिल्यानगर, पुणे, छत्रपती संभाजीनगर, सोलापूर, सांगली आणि धाराशिव जिल्ह्यात शंभर टक्क्यांहून अधिक पाऊस झाला आहे. रत्नागिरी, सिंधुदुर्ग, धुळे, जळगाव, सातारा, कोल्हापूर, जालना आणि लातूर जिल्ह्यात ७५ ते १०० टक्के पाऊस झाला आहे. ठाणे, रायगड, नाशिक, नांदेड, परभणी, हिंगोली आणि बीड या जिल्ह्यात ५० ते ७५ टक्के पाऊस झाला आहे. पालघर बुलढाणा, अकोला, वाशिम, अमरावती, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली जिल्ह्यात २५ ते ५० टक्के पाऊस झाला आहे. नंदुरबार, वर्धा, नागपूर, गोंदिया, भंडारा जिल्ह्यात २५ टक्के पेक्षा कमी पाऊस झाला आहे. मराठवाडा आणि विदर्भातील काही भागात येत्या दोन ते चार दिवसांत चांगला पाऊस पडण्याची शक्यता आहे. राज्यातील सर्व धरणाच्या जलाशयाच्या पाणीसाठ्यात चांगली वाढ होत आहे. कर्नाटकातील अलमट्टी धरण प्रकल्पाचे मुख्य अभियंता यांच्याशी संपर्क साधला असून त्यांनी धरणात ५१५ मीटरपर्यंत पाणीसाठा करण्यात येईल, असे सांगितले आहे.