Tuesday, June 17, 2025

महामुंबई होणार जागतिक ज्ञान नगरी!

महामुंबई होणार जागतिक ज्ञान नगरी!

वर्षा फडके -आंधळे , वरिष्ठ सहायक संचालक (नव माध्यम)


परदेशात शिक्षण घेणे हे प्रत्येक उच्च शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांचे सर्वात सामान्य स्वप्नांपैकी एक असते. परदेशात जाऊन उच्च शिक्षण घेण्याची संधी ही त्या विद्यार्थ्याला संपूर्ण जगाचा अनुभव घेण्यास मदत करते. परदेशात शिक्षणासाठी प्रवास करण्याची, नवीन संस्कृती शिकण्याची, नवीन लोकांना भेटण्याची संधी परदेशी शिक्षणातून मिळते आणि यातून त्या विद्यार्थ्याचा जागतिक दृष्टिकोन बदलतो. गेल्या काही वर्षांमध्ये भारतातून आणि महाराष्ट्रातून परदेशात जाणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या वाढत आहे. परदेशी विद्यापीठातील सध्याचा शैक्षणिक खर्च, राहण्याचा खर्च, विमा खर्च, अभ्यास साहित्याचा खर्च यांसह अनेक खर्च असतात. या खर्चामुळे पालकांवर आर्थिक ताण येतो, पण पालक मुलांचे उज्ज्वल भविष्य निश्चित करण्यासाठी हा आर्थिक ताण पेलण्यास तयार असतात. आता ही परिस्थिती हळूहळू बदलणार आहे.


शासनाच्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार परदेशातील विद्यापीठ भारतात येणार आहेत आणि यामध्ये महाराष्ट्राने पुढाकार घेतला आहे. नवी मुंबईत पाच परदेशी विद्यापीठ सुरू होत आहेत. विशेष म्हणजे महाराष्ट्रात एकाच वेळी पाच परदेशी विद्यापीठे नवी मुंबईच्या एकाच ठिकाणी येणे ही पहिलीच वेळ आहे. आंतरराष्ट्रीय विद्यापीठांचे भारतातील पहिले शैक्षणिक हब एज्युसिटी मुंबई / नवी मुंबईत आकाराला येत आहे. नवी मुंबईत सिडको साकारत असलेल्या शैक्षणिक हबमध्ये ५ आंतरराष्ट्रीय विद्यापीठे असणार आहेत. भारताच्या उच्च शिक्षण क्षेत्रात ऐतिहासिक आणि मानाचा क्षण निर्माण झाला आहे. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण (NEP), २०२० अंतर्गत भारतात उच्च शिक्षण क्षेत्रात आंतरराष्ट्रीय सहकार्य वाढविण्याच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल पडले आहे. पाच आंतरराष्ट्रीय विद्यापीठांना मुंबईत संकुल स्थापन करण्यासाठी LOI (आशयपत्र) प्रदान करण्याची पहिलीच ऐतिहासिक घटना असून यामुळे मुंबईचा जागतिक शैक्षणिक नकाशावर ठसा उमटणार आहे.


“नवी मुंबईच्या आंतरराष्ट्रीय विमानतळाजवळ एज्युसिटी निर्माण होत असून यामध्ये पाच परदेशी विद्यापीठे एकत्र येत आहेत. यामुळे भारतीय विद्यार्थ्यांना परदेशात शिकविले जाणारे अभ्यासक्रम भारतातच शिकायला मिळणार आहेत. यासाठी विद्यार्थ्यांना देश सोडण्याची आणि कमी आर्थिक खर्चात परदेशी विद्यापीठात शिक्षण घेण्याची संधी मिळणार आहे. भारतीय विद्यार्थ्यांना परदेशातील विद्यापीठांमध्ये उच्च शिक्षणासाठी जाण्याची गरज राहणार नाही कारण आज राज्य शासनाने राष्ट्रीय शिक्षण धोरणांतर्गत पाच परदेशी विद्यापीठांसोबत आशयपत्र नुकतेच प्रदान केले आहे.
परदेशी विद्यापीठाचे वैशिष्ट्यपूर्ण योगदान


१. University of Aberdeen (स्कॉटलंड)
भारतामध्ये कॅम्पस स्थापन करणारे पहिले स्कॉटिश विद्यापीठ. जागतिक समस्यांवर उपाय शोधणाऱ्या अभ्यासक्रमांवर विशेष भर.
२. University of Western Australia (Go8)
STEM, व्यवसाय आणि संशोधन क्षेत्रातील अभ्यासक्रम. भारतीय विद्यार्थ्यांना जागतिक कार्यबलासाठी सक्षम करणे हे मुख्य उद्दिष्ट.
३. University of York (UK - Russell Group)
एआय, सायबर सुरक्षा, बिझनेस आणि क्रिएटिव्ह इंडस्ट्रीजसाठी विशेष अभ्यासक्रम. जागतिक उद्योगांच्या गरजेनुसार अभ्यासक्रम डिझाइन.
४. Illinois Institute of Technology (USA)
इंजिनीअरिंग, संगणक विज्ञान आणि बिझनेस क्षेत्रात अग्रगण्य. Elevate प्रोग्रामच्या माध्यमातून संशोधन, इंटर्नशिप आणि रिअल-वर्ल्ड अनुभव.
५. Istituto Europeo di Design (IED - इटली)
फॅशन, प्रॉडक्ट डिझाईन आणि व्हिज्युअल कम्युनिकेशन क्षेत्रात कौशल्याधारित, क्रिएटिव्ह शिक्षण देणारी प्रतिष्ठित संस्था.
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ परिसरात ५ विद्यापीठ उभी राहणार आहेत. याच परिसरात येत्या काही वर्षांत मेडिसिटी, स्पोर्टस सिटी आणि इनोव्हेशन सिटी उभारण्यात येणार आहे. आगामी कालावधीत दहा विद्यापीठे एकत्र येतील अशी संकल्पना राबविण्यात येणार आहे. सध्या या पाच विद्यापीठांमुळे हा परिसर पूर्ण शिक्षण आणि संशोधनासाठी ओळखला जाईल. मुंबईची सध्या वित्तीय, औद्योगिक आणि मनोरंजन उद्योगाचे शहर म्हणून ओळख आहे, आता शैक्षणिक शहर अशीही ओळख होईल. ‘विकसित भारत २०४७’ मध्ये ही बाब महत्त्वाची भूमिका बजावेल.


अभ्यासक्रमांची वैशिष्ट्ये
- जागतिक दर्जत्च्या पदवीपूर्व व पदव्युत्तर अभ्यासक्रमांचा समावेश
- परदेशातील शिकवणी आणि अभ्यासक्रम भारतातच उपलब्ध होणार
- भविष्यात आणखी पाच विद्यापीठांचा समावेश होणार


विद्यार्थ्यांसाठी फायदे
- जागतिक पातळीवरील शिक्षणाचा अनुभव
- विद्यार्थ्यांना विविध देशांतील विद्यार्थ्यांसोबत शिकण्याची संधी उपलब्ध होणार
- कमी खर्चात आंतरराष्ट्रीय विद्यापीठांचे शिक्षण उपलब्ध होणार
नवी मुंबई येथे आंतरराष्ट्रीय विमानतळ विकसित होत आहे. अटल सेतू कार्यरत आहे. पायाभूत सुविधांच्या व्यवस्था आणि आंतरराष्ट्रीय कनेक्टिव्हिटी यामुळे एज्युकेशनल हब निगडित सर्वांना उपयुक्त ठरेल. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामुळे परदेशातील अनेक विद्यापीठांना भारतात येण्यासाठी उत्सुकता दाखवली आहे. ज्या भारतीय तरुणांना परदेशी जाऊन शिक्षण घेणं शक्य नाही त्यांचे स्वप्न आता अपुरे राहणार नाही. हा प्रकल्प नवी मुंबई व मुंबईला जागतिक शैक्षणिक केंद्र म्हणून ओळख मिळवून देईल आणि महाराष्ट्र राज्याचे एक ट्रिलियन अर्थव्यवस्थेचे उद्दिष्ट व भारताचे पाच ट्रिलियन अर्थव्यवस्थेचे आर्थिक लक्ष्य २०२९ पर्यंत साध्य करण्यासाठी एक महत्त्वाचा घटक ठरेल.
भारतीय विद्यार्थ्यांसाठी जागतिक दर्जाचे शिक्षण, देशातच विद्यार्थ्यांना आता जागतिक दर्जाचे अभ्यासक्रम, संशोधन संधी आणि अनुभव हे परदेशी न जाता देशातच उपलब्ध होतील. हे शिक्षण केवळ परदेशी अभ्यासक्रमांची प्रतिकृती न राहता, भारतातील स्थानिक गरजांशी सुसंगत व रोजगारक्षम असेल. हे अभ्यासक्रम स्थानिक औद्योगिक गरजांनुसार अनुकूल केले जातील. संशोधन, स्टार्टअप्स आणि उद्योग सहकार्याला चालना मिळेल. विद्यार्थ्यांना एक्स्चेंज प्रोग्राम्स, सेमिस्टर ट्रान्सफर, ग्लोबल इंटर्नशिप्स यांसारख्या संधी उपलब्ध होतील. प्राध्यापक व संशोधक यांचाही आंतरराष्ट्रीय स्तरावर सहभाग वाढेल.


पाच आंतरराष्ट्रीय विद्यापीठांना नवी मुंबईत शैक्षणिक संकुल स्थापन करण्यासाठी आशयपत्र (LOI) प्रदान करण्यासाठी विद्यापीठ अनुदान योजना (UGC) अधिकृत मान्यता मिळाली आहे. यामुळे नवी मुंबई हे जागतिक दर्जाचे शिक्षण व नवोन्मेषाचे केंद्र बनणार आहे. आंतरराष्ट्रीय सहकार्याला चालना, भारताच्या उच्चशिक्षणात एतिहासिक बदल, गुणवत्ताधारित शिक्षण व संशोधनाला प्रत्सोहन, मुंबई / नवी मुंबईचा जागतिक शैक्षणिक नकाशावर ठसा आणि राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२० (NEP) अंतर्गत परदेशी विद्यापीठांचे भारतात आगमन यामुळे साध्य होणार आहे. परदेशी विद्यापीठ भारतात सुरू होणे म्हणजे ‘वसुधैव कुटुंबकम्’चा शैक्षणिक अाविष्कार आहे आणि म्हणूनच महाराष्ट्राची ही वाटचाल केवळ महाराष्ट्रापुरती मर्यादित नसून, ती नव्या भारताच्या ज्ञानाधिष्ठित विकासाची दिशा दर्शवणारी आहे. येत्या काही वर्षांत मुंबई / नवी मुंबई ज्ञाननगरी म्हणून जागतिक नकाशावर नवी ओळख होईल हे नक्की !

Comments
Add Comment