मुंबई : आनंदाची बातमी, मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांपैकी पवई तलाव आज म्हणजेच बुधवार १८ जून २०२५ रोजी सकाळी सहाच्या सुमारास भरुन वाहू लागला. पवईच्या तलावाची जलधारण क्षमता ५४५ कोटी लीटर एवढी आहे. या तलावाचे पाणी हे पिण्यायोग्य नसल्याने प्रामुख्याने औद्योगिक वापरासाठी तसेच आरे दुग्ध वसाहतीतील पिण्याव्यतिरिक्तच्या इतर कारणांसाठी वापरले जाते. मागील दोन दिवसात या तलावाच्या पाणलोट क्षेत्रात झालेल्या पावसामुळे हा तलाव भरून वाहू लागला आहे, अशी माहिती मुंबई महानगरपालिकेच्या जल अभियंता विभागाने दिली.
पवई तलाव मुंबई महानगरपालिकेच्या मुख्यालयापासून २७ किमी. अंतरावर आहे. या कृत्रिम तलावाचे बांधकाम १८९० मध्ये पूर्ण झाले. या तलावाचे पाणलोट क्षेत्र हे सुमारे ६.६१ किलोमीटर आहे. हा तलाव पूर्ण भरलेला असल्यास पाण्याचे क्षेत्रफळ हे सुमारे २.२३ चौरस किलोमीटर एवढे असते. तलाव पूर्ण भरलेला असताना तलावामध्ये ५४५.५ कोटी लीटर अर्थात ५४५५ दशलक्ष लीटर पाणी असते. तलाव पूर्ण भरून वाहू लागल्यानंतर त्याचे पाणी मिठी नदीला जाऊन मिळते. मागच्या वर्षी हा तलाव दिनांक ८ जुलै २०२४ रोजी भरून वाहू लागला होता.