
तेहरान : इस्रायल आणि इराण यांच्यातील लढाई तीव्र होत चालली आहे. यामुळे सुरक्षिततेसाठी इराणमध्ये राहणाऱ्या भारतीयांनी शक्य तितक्या लवकर तेहरानमधून बाहेर पडावे. इराण सोडू इच्छिणाऱ्या नागरिकांनी इराण - आर्मेनिया सीमेवरुन आर्मेनियात प्रवेश करावा आणि इराणमधून बाहेर पडावे. इराणमध्ये असलेल्या तसेच इराण सोडत असलेल्या भारतीयांनी भारताच्या दूतावासाच्या संपर्कात राहावे; असे आवाहन भारत सरकारने केले आहे. भारताच्या इराणमधील दूतावासाने भारतीयांच्या सोयीसाठी हेल्पलाईन नंबर जाहीर केले आहेत. +98 9010144557, +98 9015993320, +91 8086871709 या नंबरवर संपर्क साधा, असे आवाहन भारताच्या दूतावासाने इराणमधील भारतीयांना केले आहे. तसेच इस्रायलमध्ये असलेल्या भारतीयांना +91-11-23012113, +91-11-23014104, +91-11-23017905, +91-9968291988 या नंबरवर संपर्कात राहावे असे आवाहन करण्यात आले आहे. इस्रायल आणि इराण दोन्ही ठिकाणी 24*7 नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आला आहे.
इराण नवनव्या अण्वस्त्रांची निर्मिती करत आहे. यामुळे आमच्या सुरक्षेला धोका आहे, असे सांगत इस्रायलने इराण विरोधात हवाई हल्ले सुरू केले. हल्ले करताना इस्रायलने इराणचे अण्वस्त्र निर्मिती प्रकल्प, क्षेपणास्त्र निर्मिती प्रकल्प, अण्वस्त्र साठा, क्षेपणास्त्र साठा, सैन्य तळ, विमानतळ आणि लढाऊ विमानं, महत्त्वाचे सैन्याधिकारी आणि गुप्तचर अधिकारी यांना लक्ष्य केले. याउलट इराणने प्रत्युत्तर देताना अनेक क्षेपणास्त्र इस्रायलमधील नागरी वस्तीला लक्ष्य करुन डागली.
इस्रायलच्या हल्ल्यात इराणच्या सैन्य शक्तीचे आणि गुप्तचर यंत्रणेचे नुकसान झाले. याउलट इराणच्या हल्ल्यात इस्रायलमध्ये जीवितहानी झाली. सैन्य शक्तीचे इराणच्या तुलनेत कमी नुकसान झाले.