Monday, June 16, 2025

पूल दुर्घटनेची पुनरावृत्ती नको...

पूल दुर्घटनेची पुनरावृत्ती नको...

अहमदाबाद येथील भीषण विमान अपघाताच्या स्मृती द्याप ताज्या असतानाच महाराष्ट्र आणि उत्तराखंड या राज्यांत दोन अपघात घडले. दोन्हींचे एकच कारण आहे ते म्हणजे, पर्यटकांचा अति उत्साह आणि प्रशासनाच्या सूचनांचे पालन न करता आपले वाहन संकटात टाकणे अन् मृत्यूला कवटाळणे. मावळमघील अपघात हा अशा प्रकारच्या पहिलाच अपघात नव्हे, तर त्या अगोदरही अशा प्रकारचे अपघात घडले आहेत. मावळमधील इंद्रायणी नदीच्या पुलावर कुंडमळा येथे अपघात घडला तो पूल खूप अरुंद आहे. तेथे वाहने घेऊन जाऊ नका, म्हणून वारंवार प्रशासनाकडून सूचना देण्यात येतात. पण पर्यटक ऐकत नाहीत आणि रविवारी दुपारी अपघात घडला तेव्हा त्या अरुंद पुलावर अनेक पर्यटक होते हे समजले आहे. हे पर्यटक पाणी पाहण्यासाठी जातात आणि वाहत्या पाण्यात कित्येक पर्यटक जीव गमावून बसले. कित्येक जण वाहून गेले, तर कित्येक बेपत्ता आहेत. आता त्यांची चौकशी होईल आणि नेमकी किती प्राणहानी झाली आहे तो आकडा समोर येईल. पण प्राथमिक आकडेवारीनुसार दहा ते पंधरा पर्यटक वाहून गेले असल्याची माहिती आहे.

राज्य सरकारने सर्व पुलांचे ऑडिट करण्याचे आदेश दिले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तातडीने सर्व पुलांची दुरुस्ती करण्याचे आदेश दिले आहेत. आता वारी पुढे आहे आणि लाखो वारकरी येणार आहेत. त्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने उपाययोजना केल्या पाहिजेत. पण त्या अगोदरच या दुर्घटनेने प्रशासनाच्या डोळ्यांत चांगले अंजन घातले आहे. मावळ तालुक्यातील पर्यटकांचे आकर्षण म्हणून ओळख असलेला तळेगाव-दाभाडे येथील कुंडमळा हे ठिकाण प्रसिद्ध पर्यटन स्थळ आहे. पण काल दुपारी निसर्ग शोभेची मौज पाहण्यासाठी आलेल्या पर्यटकांना आपला जीव गमवावा लागला आहे. पूल पडल्यामुळे पर्यटक नदीच्या पाण्यात वाहून गेले आहेत. सुमारे सहा मृतदेह हाती लागले आहेत. म्हणजे घटना किती गंभीर आहे हे लक्षात येईल. हा पूल जीर्ण झाला असून मागील वर्षभरापूर्वी या पुलाच्या दुरुस्तीसाठी सहा कोटींचा निधी मंजूर करण्यात आला होता. पण त्याचे काम सुरू झाले नाही. या दिरंगाईला जबाबदार असणारेच या अपघाताला कारण आहेत हा निष्कर्ष काढता येतो. अपघात घडला तेव्हा १०० जण पुलावर उभे होते असेही समजले आहे. पण त्यांना कोणीही अटकाव केला नाही.

रविवारी या अपघाताच्या जीवघेण्या कळा उठायच्या आधीच उत्तराखंडमध्ये आणखी एक भीषण अपघात घडला होता आणि त्यात सातही प्रवासी मृत्युमुखी पडले. आर्यन अव्हिएशनचे हेलिकॉप्टर ५.१७ वा. अवकाशात उड्डाण करण्यासाठी झेपावले आणि हवामानाच्या खराब अवस्थेमुळे आणि कमी दृष्यमानता असल्यामुळे कोसळले. सदरचा अपघात हा गुप्तकाशी येथे झाला आणि हेलिकॉप्टर केदारनाथ येथे चालले होते. हेलिकॉप्टर अवकाशात उडाले तेव्हा हवामान अजिबात चांगले नव्हते आणि तरीही वैमानिकाने तसेच हेलिकॉप्टर पुढे नेले. कमी दृष्यमानता आणि खराब हवामान ही कारणे देण्यात आली आहेत. कमी दृष्यमानतेमुळे अपघातांचा धोका वाढतो आणि त्यामुळे भारतीय हवाई दलाचे एमआय १७ चॉपर वारा आणि वजनामुळे आपले तोल गमावून बसले आणि कोसळले अशी प्राथमिक कारणे सांगतात.


मावळमधील दुर्घटना असो किंवा हेलिकॉप्टर अपघात, प्रथम समोर येते ती प्रवासाची आवड... परिणामी कसलाही सारासार विचार न करता लोक प्रवासाला निघतात. ते हवामान कसे आहे आणि पाऊस असल्यामुळे हेलिकॉप्टर किंवा विमानाची दृष्यमानता आहे की नाही, हेही तपासण्याचे कष्ट घेत नाहीत. उत्तराखंड तर लांब आहे. पण इंद्रायणी नदीवरील पूल हा आपल्या महाराष्ट्रातील आहे आणि तेथे लोक आता पावसाळ्यात भरपूर प्रवास करतील आणि अशा अनेक अपघातांना सामोरे जातील. भुशी डॅम असो, लोणावळा किंवा अलिबागचा समुद्रकिनारा असो किंवा रत्नागिरीतील प्रसिद्ध पर्यटन स्थळे असोत, येथे अद्याप तितक्या सुविधा तयार झाल्या नाहीत. त्यामुळे प्रशासनाच्या हलक्या चुकीमुळेही प्रवाशांचा जीव जाऊ शकतो. तेच उत्तराखंडबद्दल सांगता येईल. तेथे खराब हवामान हा नेहमीचा इश्यू आहे. पण अशा हवामानात जाऊ नका असे सांगणारी कोणतीही यंत्रणा नाही. आता तेथे वैष्णोदेवीची यात्रा भरेल, तेव्हाही कित्येक लोकांचा जीव संकटात असेल. कारण तेथे तर रस्ते इतके अरुंद आहेत की फक्त खेचर चालत जाऊ शकते. लोकांच्या भक्तिभावाशी यात्रा जोडल्या गेल्याने त्यांना पुरेशा सुरक्षा पुरवणे आणि अपघात होऊ नयेत ही प्रशासनाची जबाबदारी आहे. केदारनाथवरून कित्येक हेलिकॉप्टर्सना अपघात घडले आहेत.


भारतात अशा अपघातात किती लोक बळी गेले याची आकडेवारी पाहिली तर ती दहशतवाद्यांच्या हल्ल्यापेक्षा जास्त बळी गेले आहेत असे दिसते. त्यामुळे रस्ते अपघात किंवा पूल दुर्घटना किंवा हेलिकॉप्टर अपघात यामुळे झालेली प्राणहानी कोणत्याही कारणापेक्षा भीषण आहे. केवळ तात्पुरती नुकसानभरपाई देऊन हा प्रश्न सुटणार नाही. त्याची कारणे शोधून काढून चौकशी व्हावी आणि ज्या काही बॉटलनेक्स असतील त्या तातडीने काढून टाकल्या तरच असे अपघात घडणार नाहीत. मावळ असो किंवा उत्तराखंड असो, अपघात असो, जातात ते मानवी जीव जे प्रचंड किमती आहेत. त्यासाठी प्रशासनाने भविष्यात असे अपघात होऊ नयेत म्हणून तातडीने उपाययोजना हाती घेतली पाहिजे कारण हे जीव परत येणार नाहीत. यामुळे भारताचे नुकसान होते कारण कुणी कितीही लहान असला तरीही त्याच्या विकासासाठी देशाने आपली किमत मोजलेली असते. असे जीव जाणे म्हणजे देशाचे प्रचंड नुकसान आहे. हे होऊ नये यासाठी भविष्यात प्रत्येकानेच दक्ष राहिले पाहिजे.

Comments
Add Comment