
मुंबई : बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या शाळांतील प्रत्येक विद्यार्थ्याला दर्जेदार शिक्षण आणि सोयीसुविधा देण्यासाठी महानगरपालिका सतत प्रयत्नशील असते. शिक्षणासह विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा, यासाठी प्रत्येक विद्यार्थ्याला आवश्यक शैक्षणिक साहित्य मोफत दिले जाते. यामुळे पालकांवरील आर्थिक भार कमी होतो, सोबतच विद्यार्थ्यांचा शैक्षणिक दर्जा उंचावण्यासाठीही मदत होते, असे प्रतिपादन महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांनी केले.
शैक्षणिक वर्ष २०२५-२६ अंतर्गत बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या बोरिवली (पश्चिम) येथील पोयसर महानगरपालिका शाळेत ‘शाळा प्रवेशोत्सव’ आणि शालेय साहित्य वितरण सोहळा गगराणी यांच्या प्रमुख उपस्थितीत आज (दिनांक १६ जून २०२५) पार पडला, यावेळी ते बोलत होते.
कार्यक्रमात पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना गगराणी यांच्या हस्ते २७ प्रकारच्या शालेय साहित्याचे प्रातिनिधिक स्वरुपात वितरण करण्यात आले. इयत्ता पहिली ते आठवीतील विद्यार्थ्यांना प्रातिनिधीक स्वरुपात शालेय साहित्य वाटप करण्यात आले. शालेय साहित्य वाटपासोबत आयुक्त गगराणी यांनी विद्यार्थ्यांच्या पालकांशीही संवाद साधला. शाळेच्या पहिल्या दिवशी स्वतः महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक गगराणी यांनी गुलाब पुष्प, चॉकलेट देऊन चिमुकल्या विद्यार्थ्यांचे स्वागत केल्याने सर्व विद्यार्थ्यांचा आनंद ओसंडून वाहत होता.
याप्रसंगी संबोधित करताना गगराणी म्हणाले, मी जेव्हा-जेव्हा शाळेत विद्यार्थ्यांशी संवाद साधतो तेव्हा मला माझे शालेय जीवन, शिक्षक, मुख्याध्यापक आठवतात. त्यांच्याबद्दल आदर वाटतो. शालेय जीवनात आपल्यावर होणारे संस्कार कायमस्वरुपी असतात. म्हणूनच चांगल्या शिक्षणासाठी आवश्यक असणारी वातावरणनिर्मिती बृहन्मुंबई महानगरपालिकेकडून केली जाते. त्यासाठी शिक्षकांनीही शिकविण्याची हातोटी जोपासावी, विद्यार्थ्यांशी संवाद साधण्याची कला अवगत करावी, शैक्षणिक क्षेत्रातील नवनवीन संकल्पना शाळेत राबवाव्यात. यामुळे विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होण्यास मदत होईल, असा विश्वास गगराणी यांनी व्यक्त केला.
उप आयुक्त (शिक्षण) डॉ. प्राची जांभेकर यांनी प्रास्ताविकात शाळा प्रवेशोत्सवाची तयारी, शालेय साहित्य वाटपांबाबतची माहिती दिली.
रिमझिम पावसाच्या वातावरणात बृहन्मुंबई महानगरपालिका सर्व शाळांच्या प्रवेशद्वारावर रांगोळी, शाळा आणि वर्गखोल्यांमध्ये सजावट, ढोलताशांचा गजर, लेझीम नृत्य अशा उत्साही वातावरणात विद्यार्थ्यांचा प्रवेश सोहळा पार पडला. शाळेच्या पहिल्याच दिवशी दप्तर, पुस्तके आणि शालेय वस्तू मिळाल्याने सर्व विद्यार्थ्यांच्या चेहऱयावर आनंद ओसंडून वाहत होता.
बृहन्मुंबई महानगरपालिका शाळांमध्ये शिक्षण घेणाऱया बालवाडीपासून ते दहावीपर्यंतच्या साडेतीन लाख विद्यार्थ्यांना आज शाळेच्या पहिल्याच दिवशी म्हणजेच दिनांक १६ जून २०२५ रोजी सर्व प्रकारचे शालोपयोगी शैक्षणिक साहित्य मोफत वितरित करण्यात येत आहे. या साहित्यामध्ये गणवेश, वह्या, कंपासपेटी, चित्रकलेसाठी आवश्यक साहित्य, पेन्सिल, पाण्याची बाटली, डबा, दप्तर, बूट, सॅण्डल, मोजे आदी वस्तूंचा समावेश आहे.