
भारतात गेल्या ११ वर्षांत राजकीयच नव्हे तर अनेक क्षेत्रांत मोठे परिवर्तन झाले आहे, त्याचे सर्व श्रेय पंतप्रधान नरेंद्र मोदी व त्यांच्या नेतृत्वाखालील एनडीए सरकारला आहे. या काळात संसदेत व संसदेबाहेर विरोधी पक्षांनी मोदी सरकारवर अनेक मुद्द्यांवर प्रहार केले पण पाकिस्तानचा दहशतवादी चेहरा जगासमोर मांडण्यासाठी सर्वपक्षीय शिष्टमंडळात विरोधकही सहभागी झाले. गेल्या ११ वर्षांत देशाची प्रगती व विकास विलक्षण झाला आणि देशातील गोरगरीब, सामान्य व उपेक्षितांपर्यंत पोहोचला. पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली देशाने जागतिक पातळीवर लक्षणीय झेप घेतली. ११ वर्षांत देशातील सर्वाधिक लोकप्रियता व विश्वास नरेंद्र मोदी यांनी संपादन केला आणि सर्वाधिक सदस्य नोंदणी झालेला भारतीय जनता पक्ष हा जगात नंबर १ राजकीय पक्ष झाला, यामागे नरेंद्र मोदी आणि अमितभाई शहा यांचे परिश्रम व संघटन कौशल्य आहे.
मोदी सरकारच्या परराष्ट्रनीती व कूटनीतीमुळे जगात भारताची वेगळी ओळख बनली आहे. जगात भारताने अर्थव्यवस्थेमध्ये जपानला मागे सारून तिसऱ्या क्रमांकावर झेप घेतली आहे. काश्मीर खोऱ्यात रेल्वे धावू लागली आहे. काश्मीरपासून ते कन्याकुमारीपर्यंत रेल्वेने प्रवास करण्याचे स्वप्न साकार झाले आहे. भारताला जगातील महासत्ता बनविण्याचे मिशन मोदी सरकारने हाती घेतले आहे.
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकारने जगात भारत हा एक शक्तिशाली देश आहे, अशी प्रतिमा निर्माण केली. देशाच्या सरहद्दीवर कठोर व मजबूत उपाय योजले म्हणूनच भारताच्या सीमारेषांना धक्का लावण्याची कोणाचीही हिम्मत होणार नाही, अशी व्यवस्था केली. ज्या वेळी शेजारी शत्रूंनी कुरापती काढण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्यांना वेळीच भारताने धडा शिकवला. चिनी सैन्याने घुसखोरीचा प्रयत्न केला तेव्हा डोकलाम किंवा गलवान खोऱ्यात त्यांना सडेतोड जबाब देऊन पिटाळून लावले. पुलवामा, पठाणकोट असो किंवा पहलगाम, पाकिस्तानप्रेरित झालेल्या दहशतवादी हल्ल्यांना भारताने जबरदस्त उत्तर दिले. सर्जिकल स्ट्राईक, एअर स्ट्राईक, तर कधी ड्रोन आणि क्षेपणास्त्रांचा मारा करून दहशतवादी तळांबरोबरच पाकिस्तानचे हवाई तळांचे मोठे नुकसान केले. काश्मीरमधील दहशतवाद आणि छत्तीसगडमधील नक्षलवाद मोडून काढताना मोदी सरकारने कणखरपणा दाखवला. पहलगाममध्ये २६ हिंदू पर्यटकांची निर्घृण हत्या झाल्यानंतर भारताने पाकिस्तावर सैन्य कारवाई केलीच, पण पाकबरोबर झालेले सर्व द्विपक्षीय समझोते रद्द केले आणि सतलज नदीचे पाकिस्तानात जाणारे पाणीही रोखले.
गेल्या ११ वर्षांत देशातील २६ कोटी लोक गरिबीतून बाहेर आले ही मोदी सरकारची मोठी जमेची बाजू आहे. जागतिक बँकेच्या अहवालातच ही बाब नमूद करण्यात आली आहे. पंतप्रधान आवास योजना, पंतप्रधान उज्ज्वला गॅस योजना, जनधन योजना, आयुष्यमान भारत योजना, अशा योजनांनी सर्वसामान्य जनतेच्या जीवनात फरक पडला आहे. देशातील ८० कोटी गरीब जनतेला दरमहा पाच किलो धान्य दिले जाते, त्यामुळे या देशात कोणी उपाशी राहू नये याची काळजी सरकारने घेतली आहे. बँकिंग व आरोग्य सेवा, प्रत्यक्ष लाभ हस्तांतरण, डिजिटल व्यवहार, मजबूत व पारदर्शी पायाभूत सुविधा, सर्व लाभ थेट लाभार्थींना वेळेत पोहोचविण्याची कार्यपद्धती यामुळे पंचवीस कोटी लोक गरिबीतून बाहेर येण्यास मदत झाली. पूर्वीच्या काळात ग्रामीण भागात घरात एक कंदील असायचा. तेव्हा वीज गावागावात नव्हती आणि केरोसीनही परवडत नव्हते. वीज वारंवार खंडित होत असे. २०१४च्या लोकसभा निवडणुकीतच मोदींनी २४ तास घरोघरी सर्वांना वीज देण्याचे आश्वासन दिले होते. ११ वर्षांच्या कारकिर्दीत सर्व गावागावांत वीज पोहोचली आहे. दीनदयाळ उपाध्याय ग्राम ज्योती योजना सर्वत्र राबवली जाते आहे.
घरात शौचालय नाही म्हणून बाहेर उघड्यावर विधी करायला जाणाऱ्या जनतेची संख्या देशात कोट्यवधी होती. विशेषत: ग्रामीण भागात ही समस्या मोठी होती. मोदींनी स्वच्छ भारत योजना सुरू केली. उघड्यावर विधी केल्याने अस्वच्छता पसरते व त्यातून आजार व रोगराई निर्माण होते असा प्रचार केला गेला. जागतिक आरोग्य संघटनेने भारताचे या उपक्रमाचे कौतुक केले. आज देशात १२ कोटी शौचालये उभारण्यात आली असून ६० कोटी लोक त्याचा वापर करीत आहेत. दि. १ मे २०१६ रोजी पंतप्रधान उज्ज्वला गॅस योजना सुरू झाली. गरीब महिलांना मोफत एलजीपी गॅस कनेक्शन मिळू लागले. स्वयंपाकाच्या चुलीच्या धुरापासून महिलांना मुक्तता मिळाली. उज्ज्वला योजनेतून १० कोटी महिलांना गॅस कनेक्शन मिळाले आहे. देशातील कोट्यवधींचे श्रद्धास्थान असलेल्या अयोध्येत मोदी सरकारने भव्य राम मंदिर उभारून दाखवले. पण देशातील मंदिरे व तीर्थस्थळांचाही पुनर्विकास केला. काशी विश्वनाथ कॉरिडोर, महाकाल लोक उज्जैन, माँ कामाख्या मंदिर, केदारनाथ धाम, जुने सोमनाथ मंदिर यांच्या जीर्णोद्धारातून अध्यात्मिक क्षेत्राला नवीन ऊर्जा मिळाली. तीर्थस्थळांवर पर्यंटन व अर्थव्यवस्थेलाही चालना मिळाली. चारधाम राजमार्ग परिवहन योजना, हेमकुंडसाहिब रोप-वे योजना राबवताना भारत - पाकिस्तान सरहद्दीनजीक असलेल्या कर्तारपूर कॉरिडॉरमुळे भारतीय शिखांना तेथे जाण्याचा मार्ग सुलभ झाला. गेल्या वर्षभरात भारतात ९.६६ दशलक्ष विदेशी पर्यटक आले. त्यातून २ लक्ष ७८ हजार कोटी भारताला विदेशी चलन मिळाले. दरवर्षी विदेशी पर्यंटकांची भारतात येण्याची संख्या वाढत आहे. प्रधानमंत्री संग्रहालय, राष्ट्रीय पोलीस स्मारक, जालियनवाला बाग स्मारक, राष्ट्रीय युद्ध स्मारक, आदिवासी स्वतंत्रता सेनानी संग्रहालय, भारत मंडपम, नवीन संसद भवन, या देशाला प्रेरणा, ऊर्जा देणाऱ्या व अभिमान वाटणाऱ्या वास्तू गेल्या ११ वर्षांतच उभ्या राहिल्या आहेत. एक भारत-श्रेष्ठ भारत, काशी तमिल संगम अशा उपक्रमांमुळे भारतातील विविध भाषा व संस्कृती यांच्यात सेतू निर्माण करण्याचे काम केले आहे. प्रयागराज येथे महाकुंभला ६६ कोटी भाविकांनी पवित्र स्नान केले. मोदींनी योग दिनाला जागतिक स्तरावर मान्यता मिळवून दिली. सन २०२४ मध्ये उत्तर प्रदेशात २६ लाख लोकांनी योगाची ऑनलाइन घेतलेल्या शपथ उपक्रमाची विश्वविक्रम म्हणून नोंद झाली.
वंदे भारत ट्रेन ही मोदी सरकारने दिलेली देणगी आहे. देशात सर्वाधिक लोकप्रिय ही ट्रेन ठरली असून तिची मागणी वाढते आहे. कटरा ते श्रीनगर मार्गावर सर्वात उंचीवर असलेल्या चिनाब पुलावरून वंदे भारत धावू लागली आहे. प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेतून १२ कोटी शेतकऱ्यांना दरवर्षी सहा हजार रुपये दिले जात आहेत. आयुष्यमान भारत योजनेतून ५० कोटी लोकांना पाच लाखांपर्यंत आरोग्य सेवा मोफत मिळू शकेल. अंतराळ क्षेत्रातही गेल्या ११ वर्षांत भारताने भरीव कामगिरी केली आहे. सन २०१७ मध्ये इस्त्रोने १०४ उपग्रहांचे प्रक्षेपण करून विश्वविक्रम निर्माण केला.
मोदी सरकारने ११ वर्षांत देशाचा चेहरा-मोहरा बदलला. जगात भारताला नवीन ओळख मिळवून दिली. पण विरोधी पक्ष म्हणणार, गेल्या ११ वर्षांत पंतप्रधानांनी एकही पत्रकार परिषद घेतली नाही.
पुलवामा किंवा पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादी कुठे पळाले, ते का नाही सापडले? मुळात ते भारतात घुसलेच कसे? पाकिस्तानबरोबर झालेल्या ऑपरेशन सिंदूरमध्ये भारताची किती विमाने पाकने पाडली व कितींचे नुकसान झाले? भारताने जगभर पाकविरोधात सर्वपक्षीय शिष्टमंडळे पाठवली पण श्रीलंका, म्यानमार, बांगलादेश, नेपाळ, अफगाणिस्तान, मालदिव, माॅरिशस या शेजारी देशात कोणी का गेले नाही? भारताच्या शेजारी देशांनी भारताच्या बाजूने एकही का शब्द उच्चारला नाही? पंतप्रधानांनी ११ वर्षांत सत्तरहून अधिक देशांना दीडशे वेळा तरी भेटी दिल्या असतील, मग एकही देश पाकिस्तान दहशतवादाला प्रोत्साहन देतो असे का म्हणाला नाही? पाकिस्तानने ऑपरेशन सिंदूर काळात भारताच्या विरोधात अमेरिका, रशिया, फ्रान्सने दिलेली शस्त्रे वापरली, मग आपले मित्र कोण? भारत-पाकिस्तान युद्धबंदी आपण घडवली, असे प्रेसिडेंट डोनाल्ड ट्रम्प यांनी एक डझन वेळा म्हटले, मग भारत त्याला प्रतिवाद का करीत नाही? महाकुंभमध्ये ४० ठार, दिल्ली स्टेशनवर चेंगराचेंगरीत १८ ठार, बंगळूरुला स्टेडियमबाहेर ११ ठार, पुलवामाला ४० सुरक्षा दलाच्या जवानांचा बळी, पहलगामला २६ पर्यटकांची हत्या, मुंब्र्याला लोकलमधून पडून ४ प्रवाशांचा मृत्यू, अहमदाबादला ड्रिमलायनर विमान कोसळून २७५ ठार, अशा घटनांना जबाबदार कोण, कोणाला शिक्षा झाली याचे उत्तर कधी मिळत नाही… तरीही देश बदल रहा है, हे मान्य करायलाच हवे.
[email protected]
[email protected]