
महाराष्ट्रनामा
मुंबई देशाची आर्थिक राजधानी असल्यामुळे नोकरी व्यवसायाच्या निमित्ताने मुंबईमध्ये आसपासच्या उपनगरांमधून मोठ्या प्रमाणावर मनुष्यबळ हे दररोज सेंट्रल आणि वेस्टर्न लोकल सेवेच्या माध्यमातून मुंबईत ये-जा करते. मुंबई लगत असलेला ठाणे जिल्हा, पालघर जिल्हा, नाशिक जिल्हा तसेच रायगड आणि पुणे जिल्ह्यातूनही दररोज मुंबईत येणाऱ्यांची संख्या लक्षणीय आहे. साहजिकच या साऱ्या प्रवाशांना मुंबईत आणण्याची आणि मुंबईतून पुन्हा त्यांच्या गावी सोडण्याची जबाबदारी ही मुंबईतील या दोन्ही उपनगरीय रेल्वे सेवांवर आहे. साहजिकच याचा प्रचंड ताण हा या दोन्ही उपनगरीय रेल्वे सेवांवर वाढतो आहे.
देशभरात मुंबईबाबत असलेल्या आकर्षणामुळे नशीब उजळण्यासाठी मुंबईत येणाऱ्यांचे प्रमाण लक्षणीय आहे. मनसे प्रमुख राज ठाकरे म्हणतात त्याप्रमाणे दररोज मुंबई महाराष्ट्रावर लोंढेच्या लोंढे हे आदळतच असतात, तर प्रत्यक्षात मुंबईत राहणे हे सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर असल्यामुळे मग ठाण्यापासून ते अगदी डोंबिवली, कल्याण, अंबरनाथ, बदलापूर, टिटवाळा, कर्जत, कसारा आणि पश्चिम उपनगरांमध्ये मीरा-भाईंदर पासून ते अगदी वसई, विरार, डहाणूपर्यंत आणि त्याही पुढे मोठ्या प्रमाणावर गावांचे झपाट्याने शहरीकरण झाले आहे. या साऱ्या बकाली शहरीकरणाचा सर्वात मोठा स्फोट हा मुंबईच्या लोकल वाहतुकीवर दिसून येतो. अगदी १९९० ते ९५ पर्यंत मध्य रेल्वेच्या ठाणे पुढील रेल्वे गाड्यांमध्ये फारशी गर्दी नसायची.
१९९५ नंतर नागरिकरणाची जी काही एक मोठी लाट महामुंबईतील उपनगरांमध्ये उसळली. या लाटेने कळवा, मुंब्रा, दिवा, ठाकुर्ली ही अन्य रेल्वे स्थानकांच्या मानाने लहान असलेली स्थानकेही गर्दीने तुडुंब भरून टाकली. हळूहळू कल्याणपर्यंत वाढलेले हे लोंढे २००५ पर्यंत अंबरनाथ, बदलापूर, उल्हासनगर, कर्जत, टिटवाळा, आसनगाव, कसारा इथपर्यंत जाऊन पोहोचले आणि त्यानंतर मात्र मध्य रेल्वेची मुंबई लोकल सेवा ही खऱ्या अर्थाने प्रवासी गर्दीचा स्पोट ठरू लागली. यामुळेच कोणी एकेकाळी निवांत प्रवासासाठी ओळखली जाणारी मुंबई लोकल ही गेल्या २५ वर्षांत तब्बल ५० हजारांहून अधिक लोकल प्रवाशांचा बळी घेणारी जीवघेणी लोकल सेवा ठरली आहे. कोण आहे याला जबाबदार? भारतीय रेल्वे? राज्य सरकार? एमएमआरडीए? स्थानिक महापालिका? नगर परिषदा की ग्रामपंचायती? तसे बघायला गेल्यास हे सगळेच याला खरे तर जबाबदार आहेत.
रेल्वे गाड्यांची संख्या वाढवणे, नऊ डब्यांच्या लोकल १२ डब्यांच्या करणे. मग नंतर त्या पंधरा डब्यांच्या करणे, सर्वसाधारण लोकल बरोबरच बंदिस्त दरवाजांच्या एसी लोकल सुरू करणे आणि आता तर मुंब्रा येथील दुर्घटनेनंतर रेल्वे बोर्ड सर्वसाधारण नॉन एसी लोकल गाड्यादेखील बंदिस्त दरवाजांच्या करण्याचे ठरवत आहे. या उपाययोजना ऐकल्या की रेल्वे बोर्डात निर्णय प्रक्रियेत असलेल्या उच्चपदस्थ बांबूची अक्षरश: कीव येते. हे म्हणजे जखम मांडीला, मलम शेंडीला... अशातला प्रकार आहे.
लोकल प्रवाशांच्या समस्येचे मूळ गेल्या दोन दशकांत बेसुमार पद्धतीने वाढलेल्या प्रवासी लोंढ्यांमध्ये आहे हे जोपर्यंत रेल्वे प्रशासन आणि राज्यकर्ते लक्षात घेत नाहीत तोपर्यंत मुंबई लोकलमधील प्रवाशांचे लोकल गाड्यांमधून पडून होणारे मृत्यू हे थांबणारे नाहीत हे अत्यंत भीषण आणि कटू सत्य आहे. गर्दीचे लोंढे थांबवणे हा यावरील उपाय असला तरी देखील तो अमलात येणे कठीण आहे. मात्र याचा अर्थ यावर उपाययोजना नाहीत असा बिलकूल नाही. यावर निश्चित अशा उपायोजना आहेत मात्र ती करण्याची इच्छाशक्ती आणि निर्णय क्षमता ही रेल्वे प्रशासनामध्ये त्याचप्रमाणे येथील राजकीय नेतृत्वामध्ये नाही हे ठाणे, पालघर, रायगड या जिल्ह्यांचे दुर्दैव आहे.
मुंबई लोकल सेवेला पर्यायी रस्ते प्रवासी वाहतूक ही मुंबई ते कल्याणपर्यंत आणि पश्चिम रेल्वेवर वसई-विरारपर्यंत उपलब्ध आहे. मात्र ती सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर आहे. ठाणे, पालघर जिल्ह्यामध्ये जलवाहतुकीला मोठी संधी आहे, तथापि जलवाहतुकीचे क्षेत्र हे अद्याप मुंबई, ठाणे, पालघर आणि रायगडपर्यंत विकसित झाले नाही.
मात्र जर मुंबईतील लोकल सेवेचे नियोजन डोके ठिकाणावर ठेवून केले, तर निश्चितच मुंबईतील उपनगरीय लोकल सेवांवर पडणारा ताण आणि त्याचबरोबर प्रवाशांना करावा लागणारा जीवघेणा प्रवास यातून निश्चितच काही प्रमाणात दिलासा मिळू शकेल. यासाठी सर्वात आधी गर्दीचे विभाजन करणे हे अत्यंत आवश्यक आहे. लोकल गाड्यांमधील गर्दी ही कमी करता येऊ शकत नाही मात्र ती विभागता नक्कीच येऊ शकते. यासाठी रेल्वेला फार काही मोठे निर्णय घेण्याची अथवा मोठा खर्च करण्याची देखील आवश्यकता नाही.
मध्य रेल्वेच्या बाबतीत जर विचार करायचा झाला, तर मुंबई ते ठाणे हा एक प्रमुख झोन आहे. ठाणे ते कल्याण हा दुसरा आहे, तर कल्याण ते कर्जत कसारा असा तिसरा झोन आहे. ज्याप्रमाणे मुंबई आणि ठाणे दरम्यान मोठ्या प्रमाणावर ठाणे लोकल चालवल्या जातात त्याच धर्तीवर जर का ठाणे-कल्याण, ठाणे-कर्जत, ठाणे-कसारा अशा लोकल फेऱ्या जर का अधिक प्रमाणात सुरू करता आल्या, तर ठाण्यापासून कल्याण, कर्जत, कसाराच्या दिशेने जे प्रवासी प्रवास करतात त्यांना मुंबईतून तुडुंब भरून आलेल्या लोकलमधून जीवघेणा प्रवास करायची गरज भासणार नाही. त्याचबरोबर कर्जत, कसारा मार्गावरून आणि अगदी कल्याणहून देखील वाशी आणि पनवेल या मार्गावर लोकल सेवा सुरू करणे सहज शक्य आहे. कारण या मार्गावरून अनेक लांब पल्ल्यांच्या गाड्या पनवेलकडे जातात.
जर का पनवेल आणि वाशीच्या लोकल गाड्या कल्याण, कर्जत, कसारावरून थेट सुरू केल्या, तर ठाण्याला होणारी प्रचंड गर्दी ही निश्चितच कमी होऊ शकते. त्याचप्रमाणे कोकण रेल्वेच्या गाड्या पकडण्यासाठी कर्जत कसारा ते अगदी भिवंडी या मार्गावरील प्रवाशांना ठाण्याला यावे लागते. त्याऐवजी जर का कल्याण वरून कोकण रेल्वे मार्गावरील मडगावपर्यंत रेल्वे गाडी सुरू केली, तर त्याचा खूप मोठा फायदा हा या मार्गावरील लाखो कोकणवासीयांना होऊ शकणार आहे.
याबरोबरच कल्याणचे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी दिवा लोकल सुरू करण्याची मागणी केली आहे ती देखील रास्त आहे. रेल्वेच्या या उपाययोजनांबरोबरच रेल्वेला पर्याय ठरू शकेल असा सक्षम सार्वजनिक वाहतुकीचा पर्यायी मार्ग हा नजीकच्या काळात उपलब्ध करून द्यावा लागणार आहे. त्याकरिता ज्याप्रमाणे बेस्टने मुंबईतून ठाण्यापर्यंत वातानुकूलित बस सेवा सुरू केल्या होत्या त्याच धर्तीवर जर का ठाण्याहून कल्याण, डोंबिवली, भिवंडी, उल्हासनगर, बदलापूर, अंबरनाथ, टिटवाळा या मार्गावर एसी बस सेवा सुरू झाल्या, तर निश्चितच लोकल गाड्यांमधील जीवघेण्या प्रवासापेक्षा या रस्ते वाहतुकीला अधिक प्राधान्य मिळेल. ओला, उबेरसारखी खासगी कंपनी महामुंबईसारख्या उपनगरांमध्ये उत्तम सेवा देत असेल, तर राज्य सरकारला हे का बरं करता येणे शक्य नाही, याचाही विचार होणे गरजेचे आहे.
- सुनील जावडेकर