
वॉटर मेट्रोचा विकास आराखडा तीन महिन्याच्या आत सादर करण्याच्याही दिल्या सूचना
मुंबई : मुंबईमध्ये पर्यायी वाहतूक व्यवस्था निर्माण करण्याच्या दृष्टीने वॉटर मेट्रो प्रकल्प महत्वाचा असून या प्रकल्पाचे काम लवकरात लवकर सुरू करावे, तसेच वॉटर मेट्रोचा विकास आराखडा तीन महिन्याच्या आत सादर करावा अशा सूचना मत्स व्यवसाय व बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांनी दिल्या.

महाराष्ट्र सागरी मंडळाच्या अधिकारी कर्मचाऱ्यांकडून मंत्री नितेश राणेंचा सत्कार मुंबई : महाराष्ट्र सागरी मंडळातील अधिकारी व कर्मचारी यांनी ...
मुंबईमध्ये वॉटर मेट्रो सुरू करण्यासाठी पहाणी करण्याचे काम कोची मेट्रो रेल लि. कंपनीस देण्यात आले होते. त्यांच्या अहवालाचे आज मंत्रालयात मंत्री राणे यांच्या दालनात सादरीकरण करण्यात आले. त्यावेळी मंत्री राणे बोलत होते. यावेळी महाराष्ट्र सागरी मंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी पी. प्रदीप, प्रशासकीय अधिकारी प्रदीप बढीये यांच्यासह कोची मेट्रो रेल कंपनीचे अधिकारी उपस्थित होते. वॉटर मेट्रोच्या कामासाठी मंत्री राणे यांनी विविध स्तरावर प्रयत्न केले आहेत. त्यांच्या या प्रयत्नांना यश येऊन आता लवकरच वॉटर मेट्रो मुंबईकरांच्या सेवेसाठी दाखल होणार आहे.
मुंबईमध्ये जल वाहतूकीसाठी मोठ्या संधी असल्याचे सांगून मंत्री राणे म्हणाले की, विशेषतः बांद्रा, वरळी, वर्सोवा, दक्षीण मुंबई आणि नवी मुंबईमध्ये जल वाहतूकीच्या क्षेत्रात मोठ्या संधी आहेत. वॉटर मेट्रोचे मार्ग निवडताना या संधींचा पूर्ण विचार करावा. जास्तीत जास्त प्रवासी असणारा आणि जास्तीत जास्त फायद्याच्या मार्गांची निवड करण्यात यावी. वॉटर मेट्रोच्या तिकीटांचे दर ठरवताना ते सर्वसामान्यांच्या आवाक्यात असतील असे पहावे. उत्तर मुंबईतून दक्षिण मुंबईमध्ये आणि नवी मुंबईतून दक्षिण मुंबईमध्ये येण्यासाठी वॉटर मेट्रो हा एक चांगला पर्याय ठरणार आहे. या सर्व गोष्टींचा विचार करुन विकास आराखडा तयार करावा. तसेच जेटी आणि मेट्रो टर्मिनलचा मेट्रोच्या धर्तीवर विकास करण्यात यावा. तसेच त्यांना वाहतूकीच्या इतर मार्गांनी जोडण्याची कार्यवाही करावी अशा सूचनाही मंत्री राणे यांनी दिल्या.
मुंबई वॉटर मेट्रोसाठी एकूण २९ टर्मिनल उभारण्याचे या अहवालात नमुद करण्यात आले आहे. तसेच १० मार्गांची निवड करण्यात आली आहे. त्यामध्ये वाढ करण्याच्या सूचनाही बैठकीत देण्यात आल्या. तसेच जेटी टर्मिनलवर प्रवाशांसाठी सुविधा उभारणे, बोट खरेदी, इतर सुविधा यांचा अंतर्भाव या प्रकल्पामध्ये असणार आहे. यासाठी एकूण अडीच हजार कोटी रुपये खर्च अपेक्षीत आहे. वॉटर मेट्रोमुळे मुंबईतील प्रवासाचा वेळ वाचण्यास मदत होणार आहे.