कुंडमळाचा ३५ वर्ष जुना पूल इंद्रायणीत कोसळला
पुणे जिल्ह्यामध्ये तळेगाव दाभाडे शहराजवळील प्रसिद्ध पर्यटनस्थळ कुंडमळा. इथं पर्यटकांना अतिउत्साह जिवावर बेतलाय. शंभर ते दीडशे पर्यटकांचा भार ३५ वर्षांपूर्वीचा जीर्ण पुलाला पेलला नाही. त्यामुळं लोखंडी साकव पूल रविवारी दुपारी इंद्रायणी नदीत कोसळला. धबधब्याचा आनंद लुटणाऱ्या पर्यटकांचा उत्साह काही क्षणात दु:ख व आक्रोशात बदलला. नदीत वाहून जाणाऱ्या ५२ जणांना वाचवण्यात यश आले. आतापर्यंत चार मृत्यूमुखी पडले असून अनेकजण वाहून गेल्याने मृत्यूचा आकडा वाढण्याची भीती वर्तवली जात आहे. १८ पर्यटक जखमी झाले असून दुर्घटनेनंतर तत्काळ बचावकार्य सुरू करण्यात आल्याची माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली आहे. बेफिकीर प्रशासन आणि हुल्लडबाज पर्यटकांमुळेही दुर्घटना घडल्याचं प्रथमदर्शनी निदर्शनास येतयं. जाणून घेऊया या विषयी माहिती...
मावळ तालुक्यातील कुंडमळा हा परिसर प्रसिद्ध पर्यटनस्थळ आहे. पुण्यापासून सुमारे ३० किलोमीटर अंतरावर आहे. मुंबईकडं जाताना एक्स्प्रेसवेवर प्रवेश करण्यापूर्वी मावळातील तळेगाव दाभाडे आणि देहू गावच्या मध्ये हे ठिकाण लागंत. इथला कुंडमळा धबधबा प्रसिद्ध आहे. पावसाळ्यात वीकएंडला इथं नेहमी पर्यटकांची गर्दी होत असते. गेल्या काही दिवसांपासून संततधार पावसामुळे इंद्रायणी नदी दुथडी भरून वाहत होती. शासकीय तसेच खासगी कार्यालये तसेच शाळांना सुट्टी होती. त्यात आजदेखील रविवार असल्यानं कुंडमाळा परिसर गजबजलेला होता. इंद्रायणी नदीवरील दुर्घटनाग्रस्त पूल जीर्ण झाला होता. अरुंद असलेल्या या पुलावर क्षमतेपेक्षा जास्त गर्दी झाली. अनेकजण या पुलावरून दुचाकी नेत होते. सुमारे दीडशे पर्यटक पुलावर उभे होते. यातील काहीजण सेल्फी आणि फोटो काढण्यात दंग होते.
रविवारी दुपारी साडेतीन वाजता अचानक शेलारवाडी आणि कुंडमळा या गावांना जोडणारा पुलाचा भाग कोसळला. सुमारे ३०० मीटर लांबीच्या पुलाचा नेमका मधला १०० मीटरचा भाग तुटला. तो वाहत्या नदीपात्रात कोसळला. पावसाळी पर्यटनाचा आनंद काही क्षणातच भीषण दु:खात बदलला. काहीजण पुलाच्या ढाच्याखाली अडकले आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला. जोरदार प्रवाहामुळे अनेक मृतदेह वाहून गेले आहेत. घटनेची माहिती मिळताच पिंपरी-चिंचवड पोलिस, एनडीआरएफ, शिवदुर्ग मित्र, वन्य जीव रक्षक मावळ व आपदामित्र पथकांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. आत्तापर्यंत चार मृतदेह बाहेर काढण्यात आले असून सुमारे ५२ पर्यटक या घटनेत जखमी झाले आहेत. त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
गलवान खोऱ्यातील पाच वर्षे : भारत-चीन सीमा संघर्ष ते शांतता १५ जून २०२०... जी तारीख भारत-चीनदरम्यान झालेल्या भीषण संघर्षाची आठवण करून देते. पूर्व ...
कोण आहेत ४ पर्यटक जाणून घेऊया पुढील प्रमाणे...
१. चंद्रकांत गुनाजी साठले (४५ वर्ष हडपसर, पुणे)
२. रोहित सुधीर माने (३१, वर्ष नक्षत्रम सोसायटी, प्रेमलोक पार्क, चिंचवड, पुणे
३. विहान रोहित माने (५ वर्षे, नक्षत्रम सोसायटी, प्रेमलोक पार्क, चिंचवड, पुणे
४. चेतन आण्णाप्पा चावरे (२३ वर्ष इंद्रायणी कॉलनी, तळेगाव दाभाडे, जि. बेळगाव)
अपघात झालेल्या जीर्ण पूल दोन महिन्यापूर्वी बंद करण्यात आला होता. पुण्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दहा दिवसांपूर्वी पर्यटकांनी धोकादायक ठिकाणी जाऊ नये, असे आदेश काढल्याचं सांगितलयं. प्रशासानेने पुलावर जाऊ नका असे सांगूनही काही हुल्लडबाज पर्यटक पुलावर गेले. दुसरीकडे बेफिकीर प्रशासनामुळं ही दुर्घटना घडल्याचं प्रथमदर्शनी दिसतयं. कारण बंदीचे आदेश होते, मग पर्यटकांना जीर्ण पुलावर जाऊ कसं दिलं गेलं, हा प्रश्न उरतो. याचं उत्तर प्रशासनानं द्यायला हवं.