
मुंबई डॉट कॉम
उपनगरी गाडीतून प्रवासी पडून मरण पावल्याचे व कायमचे जायबंदी झाल्याची घटना प्रथमच घडलेली नाही. कल्याण-डोंबिवली, दिवा, कळवा, मुंब्रा, ठाणे या पट्ट्यात आजवर हजार प्रवासी गाड्यांतून पडून मृत्युमुखी व जायबंदी झाले आहेत. मात्र एकाच दिवशी एकाच वेळी इतके प्रवासी पडल्याची घटना निराळीच होती. त्यावरून तर्कवितर्क सुरू होऊन सर्वच जणांनी रेल्वे प्रशासनाला लाखोली वाहिली. इतकेच काय या घटनेला संपूर्ण रेल्वेच जबाबदार आहे असे मानून रेल्वेचा उद्धार केला.
मुळात रेल्वेचे प्रश्न हे आजचे नाही. रेल्वे सुरू झाली तेव्हा मानवी लोकसंख्या तेव्हाची लोकसंख्या व आताची लोकसंख्या यात खूप फरक पडला आहे. रेल्वेने पुरेपूर बदलण्याचा प्रयत्नही केला. मात्र वाढत्या लोकसंख्या व मोठ्या प्रमाणात शहरीकरणांपुढे त्या तोकड्या पडल्या.
मुंबई शहराचा व महानगर प्रदेशाचा एकात्मिक विकास करण्याकडे आजवर सर्वांनीच दुर्लक्ष केले. एककेंद्री विकास झाल्याने दुसऱ्या ठिकाणावरून व जिल्ह्यातून हजारोंच्या संख्येने लोक शहराकडे एकाचवेळी लोंढ्यासारखे जाऊ लागले आणि रेल्वेशिवाय दुसरा कोणताच पर्याय नसल्याने रेल्वेवर पूर्णपणे भार आला. वास्तविक पाहता या रेल्वे अपघाताबद्दल इतर सर्व गोष्टींचा पर्याय आठवडाभर सुरूच होता. मात्र मूळ गोष्टीकडे अजून दुर्लक्षच होत आहे. हो, आपण हे मान्य केले पाहिजे की रेल्वेची आता क्षमता संपली आहे. मात्र आपण अजूनही रेल्वेला मुबलक पर्याय देऊ शकलो नाही हेही खरेच आहे.
अपघात झाल्यानंतर सर्व दृष्टीने त्यावर भविष्यात काय करता येईल यावरदेखील विचार झाला. मात्र आजवर मूळ समस्या राहिलेली म्हणजे ठाणे व कल्याण या रेल्वे मार्गाला नसलेला समांतर रस्ते मार्ग. हाच एक इलाज ठरू शकतो.
उपनगरी रेल्वे बंद पडली किंवा त्यावर परिणाम झाला, तर किमान रस्ता मार्ग हा पर्याय मार्ग ठरू शकतो. आज उपनगरी मार्गाला मुंबईहून ठाण्यापर्यंत पूर्व-पश्चिम बाजूस समांतर रस्ते आहेत. तीच गोष्ट पश्चिम रेल्वेवर पूर्व व पश्चिम बाजूस निदान चर्चगेट ते बोरिवलीपर्यंत तरी समान रस्ते आहेत. मात्र ठाणे व बोरिवलीच्या पुढे समांतर रस्ता नाही. ठाण्याच्या पुढे जर कल्याण दिशेने जायचे असल्यास मुंबई नाशिक महामार्ग कल्याण, भिवंडी मार्गाने कल्याण, डोंबिवलीकडे जावे लागते तर व दिव्याकडे जाण्यासाठी अजूनही तशी व्यवस्था नाही. तर कल्याण व डोंबिवलीकडे जाण्यासाठी दुसरा मार्ग म्हणजे ठाणे व शिळफाटा मार्ग.
मात्र या रस्त्यावरून जाणे म्हणजे मोठे दिव्यच असते. मोठमोठ्या अवजड वाहतुकीमुळे अगोदरच ठाणे जिल्ह्याला ग्रासले आहे. त्यात शीळ फाट्यावरून जाणे म्हणजे एक मोठे दिव्यच असते. त्यावरून रोज प्रवास करणे हे हल्लीच्या काही उदाहरणांवरून तापदायक नसून जीव घेणेही ठरले आहे. तीच गत पुढे कल्याणहून टिटवाळा मार्गे कसाऱ्याला समांतर मार्ग हा कसाऱ्यापर्यंत तरी आहे. मात्र हि दूरवरची मार्गिका आहे, तर कल्याण-कर्जतला जाण्यासाठी तसा थेट व सोयीचा मार्ग नाही म्हणून एकदा रेल्वे बंद पडली की चाकरमान्यांना जागच्या जागी थांबण्याशिवाय अथवा घरी परतण्याशिवाय कोणताही पर्याय राहत नाही.
आजपर्यंत रेल्वे मार्गाला समांतर असा ठाणे, मुंब्रा, दिवा, डोंबिवली, कल्याण असा समांतर मार्ग होण्याची बऱ्याचवेळा घोषणा झाली. मात्र प्रत्यक्षात उतरू शकली नाही. या ठिकाणी बराचसा भाग हा कांदळवन व खाडीचा भाग येतो. त्यासाठी वेगवेगळ्या परवानग्या लागतात. मात्र जिथे मुंबईत समुद्रात मार्ग झाले, मुंबईहून नवी मुंबईला जाणारा अटल सेतू झाला, छत्रपती संभाजी महाराज किनारा मार्ग झाला, मुक्त मार्ग झाला तिथे हा रस्ता होण्यास अशी कोणती अडचण होती? याच खाडीपट्ट्यात व ठाणे जिल्ह्यात हजारो संख्येने अनधिकृत बांधकामे झाली हेही नुकताच न्यायालयाने दिलेल्या आदेशात स्पष्ट झाले आहे मात्र तिथे रस्ता बांधण्यास कोणती अडचण येत होती? आजपर्यंत कोणाला हा रस्ता महत्त्वाचा वाटू नये याचे आश्चर्य वाटते. बरं यातील दुसरी बाजू अशी की रस्ते वाहतूक तरी सुरक्षित आहे का? आज मुंबई नाशिक महामार्गाची अवस्था आपण सारे बघतोच आहोत, तोच ठाण्याहून अंजुर फाटा, कल्याण, भिवंडी फाटा इथपर्यंत पोहोचण्यासाठीच बरेच तास लागतात. तोच वाशीहून शिळफाटा मार्गे जायचे असल्यास प्रचंड वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो.
मुंबई नाशिक महामार्गाचे कामे अजूनही संपता संपत नाही. कसारा घाटही आता वाहतुकीसाठी धोकादायक बनला आहे.
भिवंडी परिसरातील गोदामातील मोठमोठ्या कंटेनरची वाहतूक रोज हजारोंच्या संख्येने वाशी तुर्भेहून जेएनपीटीकडे जात असते. त्यांना याच रस्त्यांचा वापर करावा लागतो. त्यामुळे स्थानिक शहरांच्या वाहतुकीला मर्यादा येतात. आज ठाणे, भिवंडी, रबाळे, तळोजा, वाशी, बेलापूर आर्थिक केंद्र झाल्यामुळे सतत वाहतूक कोंडीचा फटका येथील स्थानिक जनतेस रोज बसत असतो. एरवी कुठल्या अपघाताचे कारण असते, तर पावसाळ्यात मोठ्या खड्ड्यांचे कारण त्यामुळे वाहतूक कोंडी बरोबरच अपघातांचे प्रमाणही प्रचंड प्रमाणात या पट्ट्यात वाढले आहे. राहता राहिला प्रश्न येथील बस सेवांचा मुंबई शहरात रेल्वे लोकल बरोबरच बेस्ट बस सेवेचा एक पर्याय सक्षम पर्याय आहे. मात्र एकदा ठाण्याच्या बाहेर पडलो की तशी कोणती सोय नाही. त्या-त्या पालिकेच्या परिवहन सेवा आहेत.
मात्र त्यावर प्रवाशांचा इतका भरोसा नाही. असल्यास, तर थोड्याफार खर्चिकही आहेत. त्यामुळे रोज प्रवास करणाऱ्यांना तो परवडणारा नाही. त्यासाठी सरकारने त्यांना योग्य ती आर्थिक मदत करावी तरच त्या चांगल्या उत्तम व किफायतशीर सेवा देऊ शकतील. आज मुंबईतील बेस्ट बस सेवेचे उदाहरण असून बेस्टचा पर्याय चांगला स्वस्तात होता, त्यामुळे प्रवाशांकडे ओढा होता. मात्र नुकत्याच महिन्याभरापूर्वी केलेल्या भाडेवाढीमुळे प्रवाशांच्या संख्येवर परिणाम झाला व त्यांनी इतर मार्गांचा पर्याय निवडला.
म्हणजेच ते रेल्वेकडे वळले. अथवा आपल्या खासगी गाड्या घेऊन निघाले. ती जर सरकारने बेस्टला आणखी थोडी मदत केली असती तर तो प्रवासी टिकून राहिला असता व रेल्वेवरील ताण कमी झाला असता. तसेच इतर वाहतुकीची समस्याही कमी झाली असती. हाच पर्याय इतर ठिकाणीही लागू पडला असता. आजही मुंबईतील मेट्रोला हवे तेवढे प्रवासी मिळत नाही. मात्र बेस्टकडे लाखो प्रवाशांचा ओढा आहे.
मात्र मेट्रो एके मेट्रो करणारे व मेट्रोमुळेच काही सर्व समस्या संपणार आहेत म्हणून मेट्रोला हजारो कोटी रुपये देण्यापेक्षा रस्ते वाहतुकीवर तेवढाच जोर दिला व स्थानिक परिवहन संस्थेला आर्थिक मदत केली तर रेल्वेवरील भार मोठ्या प्रमाणात कमी होऊन मुंब्रासारखी लटकून, पडून मरण्याच्या घटना तरी भविष्यात घडणार नाही हे तितकेच खरे आहे.
- अल्पेश म्हात्रे