
मुंबई : पश्चिम महाराष्ट्रात गेल्या दोन दिवसांपासून रात्रभर पावसाची बॅटिंग सुरु आहे. मात्र, रविवारी सायंकाळपासून पावसाने मुंबई, ठाणे, कल्याण, वसई भागात जोर धरला आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी जनजीवन विस्कळीत झाले आहे. मुंबईतील हिंदमाता, सायन, दादर यांसारख्या सखल भागांत रस्त्यांवर पाणी साचले आहे. त्यामुळे नागरिकांना साचलेल्या पाण्यातून वाट काढावी लागत आहे. तर दुसरीकडे मुंबईची लाईफलाईन असलेली मुंबई लोकल उशिराने सुरु आहे. दरम्यान, सोमवारी दिवसभर पावसाचा जोर वाढण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली होती. हवामान विभागाचा अंदाज अचूक ठरला असून आज (१६ जून) सकाळपासूनच मुंबईसह ठाणे, रायगड व पालघर जिल्ह्यांमध्ये जोरदार पाऊस सुरु आहे. मुंबईतील पश्चिम, मध्य आणि हार्बर रेल्वेची वाहतूक १० ते १५ मिनिटे उशिराने सुरु आहे. त्यासोबतच ईस्टर्न हायवे, वेस्टर्न हायवेसह सर्व वाहतूक संथ गतीने सुरू आहेत.
16 Jun, 7.30 am,A dense cloud mass off the coast of Konkan & ghat areas.North Konkan parts including Mumbai already recd 130+mm rains since yesterday morning,out of which 100+ came during night. Waiting for Raigad RF data
Rains likly to cont,gradual decrease.
Watch imd updates pl pic.twitter.com/VLTVvgKciR
— K S Hosalikar (@Hosalikar_KS) June 16, 2025
सध्या दक्षिण मुंबईत पावसाचा जोर अधिक पाहायला मिळत आहे. नरिमन पॉईंटवर ४० ते ५० किलोमीटर प्रतितास वेगाने वारे वाहत आहेत. पावसाची संततधार आणि वाऱ्यामुळे दृश्यमानता मोठ्या प्रमाणात खालावली आहे. तसेच रस्त्यांवर पाणी साचल्याने अनेक वाहने पाण्यातून मार्ग काढताना बंद पडत आहे. ज्यामुळे वाहनचालकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. परिणामी वाहतूक व्यवस्था व जनजीवन विस्कळीत झालं आहे.

दिवे घाट डोंगरावर चढण्यास बंदी पावसाळा सुरू झाला की महाराष्ट्रातील वारकऱ्यांना ओढ लागते पंढरपूरच्या वारीची. हाच आषाढी वारीचा प्रस्थान सोहळा अवघ्या ...
मुंबईत किती पाऊस?
मुंबईतील फोर्ट परिसरात सर्वाधिक ७४ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. त्यानंतर बांद्रा ६२ मि.मी, मलबार हिल ६० मि.मी, लोअर परळ ५८ मि.मी आणि हाजी अली परिसरात ५७ मि.मी पवासाची नोंद करण्यात आली आहे. त्यासोबतच ग्रँट रोड ४७ मि.मी, सांताक्रुझ ४७ मि.मी, दादर ४१ मि.मी, चर्चगेट ३८ मि.मी, अंधेरी ३३ मि.मी आणि मुंबई सेंट्रल परिसरात ३० मि.मी पवासाची नोंद झाली आहे. तसेच मुंबई उपनगरातही पावसाचा जोर कायम आहे. मुंबईतील बोरिवली परिसरात २८ मि.मी, वरळी २६ मि.मी, वांद्रे कुर्ला संकुल २५ मि.मी, वर्सोवा २३ मि.मी आणि दिंडोशीत २२ मि.मी असा मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला आहे.
कोकण व उत्तर महाराष्ट्राला मुसळधार पावसाचा इशारा
मुंबईला यलो अर्ट दिला असून कोकण किनारपट्टीतील जिल्ह्यांना मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. रत्नागिरीला रेड अलर्ट, पालघर, ठाणे, रायगड व सिंधुदुर्ग या चार जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट दिला आहे. किनारपट्टीच्या भागात अतिवृष्टी देखील होऊ शकते असं हवामान विभागने म्हटलं आहे. उत्तर महाराष्ट्रात नाशिक, आहिल्यानगर व जळगाव या तीन जिल्ह्यांना यलो अलर्ट जाहीर झाला आहे. तर धुळे व नंदूरबारमध्ये वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस बरसेल असं हवामान विभागाने म्हटलं आहे. या दोन जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जाहीर करण्यात आला आहे.
हवामान विभागाचा अंदाज
रायगडमध्ये मुसळधार ते अति मुसळधार पावसाची शक्यता आहे. त्यामुळे रायगड जिल्ह्यासाठी ‘रेड अलर्ट’ जारी करण्यात आला आहे. रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांसाठी ‘ऑरेंज अलर्ट’ देण्यात आला आहे. या ठिकाणी मुसळधार पाऊस कोसळण्याचा अंदाज आहे. मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रात सुरु असलेल्या पावसामुळे कमाल तापमानात घट झाली आहे. मुंबई आणि ठाणे जिल्ह्यांमध्ये सोमवारी ‘यलो अलर्ट’ जाहीर करण्यात आला आहे. त्यामुळे काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे. त्यानंतर मंगळवार आणि बुधवारी मुंबई आणि ठाण्यात पावसाचा जोर कमी होऊन मध्यम स्वरूपाचा पाऊस होईल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. तसेच पुणे आणि कोल्हापूरच्या घाट परिसरात, सातारा जिल्हा परिसरात आज ‘ऑरेंज अलर्ट’ देण्यात आला आहे.