
मुंबई (प्रतिनिधी) : स्थूलपणा हे अनेक आजारांचे प्रमुख कारण आहे. हृदयाचे आजार, मधुमेह आणि काही प्रकारचे कॅन्सर स्थूलपणामुळे होतात. अनेक गंभीर गुंतागुंतीच्या समस्या शरीरात निर्माण होतात. त्यामुळे स्थूलपणावर उपाय करणे हे वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी नव्हे तर प्राणघातक आजारांना आळा घालण्यासाठी महत्त्वाचे आहे.
मुलांमध्ये स्थूलपणा वाढत आहे, ही अजूनच चिंताजनक बाब आहे. भारतामध्ये ५ ते १९ वर्षे वयाची जवळपास १२.५ मिलियन मुले २०२२ मध्ये स्थूलपणाने ग्रस्तस्त होती. ही आकडेवारी जगात सर्वात जास्त आहे आणि १९९० पासून यामध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. स्थूलपणा भारतातील शहरी आणि निम-शहरी भागांमध्ये वाढत असलेली एक साथ आहे.
प्रक्रिया केलेले खाद्यपदार्थ, साखर मिसळलेली कोल्ड्रिंक्स यांचा वाढता खप, मोबाइल टीव्ही स्क्रीनवर खूप जास्त वेळ घालवणे आणि शारीरिक हालचाली खूपच कमी करणे ही या समस्येची प्रमुख कारणे आहेत. जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालानुसार, स्थूलपणा हे अनेक आजारांचे प्रमुख कारण आहे. हृदयाचे आजार, टाईप २ मधुमेह आणि काही कॅन्सर स्थूलपणामुळे होतात.