
भालचंद्र ठोंबरे
श्रीमद्भागवतानुसार ऋषभ देवाचा पुत्र भरत अतिशय भगवदभक्त होता. तसेच तो बहुश्रुतही होता. अनेक वर्षे त्याने राज्य केल्यानंतर आपले प्रारब्ध क्षीण झाले असे समजून त्यांनी राज्यकारभार पुत्राकडे सोपवून ते हरिहर क्षेत्रातील गंडकी नदीच्या काठी गेेले व परमेश्वरी साधना करू लागले. जप साधनेत लिन असताना एक हरिणी पाणी पिण्यासाठी नदीवर आली. ती गर्भार होती. पाणी पीत असताना जवळच जंगलात सिंहगर्जना झाली. जीव वाचविण्याच्या आकांताने तिने नदीत उडी मारून पलीकडे जाण्याचा प्रयत्न केला. या प्रयत्नात भीतीने तिचा गर्भपात झाला व गर्भ नदीत पडला. हरिणी नदीत वाहून गेली. नदीत पडलेले ते नवजात पाडस पाहून भरताच्या मनात वात्सल्य जागृत झाले. ते पाडसाला आपल्या आश्रमात घेऊन आले. त्या पाडसाचा लळा लागल्याने व सततच्या त्याच्याच विचाराने भरताचे धर्म, नम -नियम, भागवत, पूजा आदी सर्व कर्म बंद झाले. अशावेळी जळी- स्थळी-पाषाणी सुद्धा त्यांना त्या पाडसाचेच विचार येत असत. असे करता करता त्यांचा अंत काळ आला. त्या वेळेलाही त्यांचे मन पाडसातच गुंतलेले होते.
अखेर अंतकाळाच्या भावनेप्रमाणे त्यांचा पुढील जन्म हरणाचा झाला. मात्र पूर्वजन्मीच्या पुण्याईने त्यांच्या पूर्व जन्मीच्या स्मृती जागृत होत्या. याही योनीत वैराग्याचा पगडा त्यांच्यावर असल्याने ते आपल्या मातेपासून दूर होऊन पूलह ऋषींच्या आश्रमात जाऊन
राहू लागले.
कालांतराने मृत झाल्यावर त्यांचा पुढचा जन्म एका विद्यासंपन्न ब्राह्मणाच्या घरी झाला. याही जन्मात त्यांच्या पूर्व जन्माच्या स्मृती जागृत होत्या. त्यामुळे नातेसंबंधात अडकून आपण ध्यान धारणेपासून वंचित राहू, दूर जाऊ असे वाटल्याने त्यांनी वेड्याचे रूप धारण करून प्रभू चरणाची आराधना करू लागले. त्यांना खाण्यापिण्याची शुद्ध नसे, कोणी जे काही दिले त्यावर ते गुजराण करीत. ते कोणतेही काम करत नसल्यामुळे लोक त्यांना “जडभरत’’ म्हणू लागले. जडभरत एके दिवशी शेतात बसला असताना कालिकामातेला नर बळी देण्यासाठी काही लोकांनी त्याला पकडून नेले; परंतु नरबळी देण्याच्या वेळी प्रत्यक्ष देवी प्रकट होऊन तिने बळी देणाऱ्यांनाच ठार करून भरताची सुटका केली.
एकदा सिंधी सौबिर देशाचा राजा रहूगण पालखीतून कपिलमुनीकडे आत्मज्ञानाचा उपदेश घेण्यासाठी जात असताना त्याला पालखी वाहण्यासाठी एका भोयाची आवश्यकता पडली. तेव्हा सैनिक भोयाच्या शोधात निघाले, असता धष्टपुष्ट शरीराचा हा भरत त्यांच्या दृष्टीला पडला. त्यांनी त्याला पकडून पालखी वाहण्यास जुंपले. तेव्हा जडभरत आपल्या पायाखाली कोणतेही किडा मुंगी मरू नये म्हणून डग देत व उड्या घेत चालू लागला. त्यामुळे पालखीचे संतुलन बिघडू लागले. याबद्दल राजाने दटावताच अन्य भोयांनी जडभारताकडे बोट दाखविले. तेव्हा राजा जडभरताला म्हणाला “अरे तुझा देह तर मला दांडगा आहे. तुला पालखीचा भार उचलणे जड जाते का?’’; परंतु अजूनही पालखी व्यवस्थित नेली जात नाही असे पाहून रहूगण क्रोधाने लाल होऊन भरताला म्हणाला
“तू निर्लज्ज आहेस मी आता तुला शिक्षा करतो म्हणजे तू वठणीवर येशील!” जडभरत म्हणाला “राजा भार नावाची ही वस्तू जर असेल तर ती हा वाहून नेणाऱ्यांसाठी आहे. परमार्थिक दृष्टीने पाहिले तर कोण राजा आणि कोण सेवक. हे सर्व शरीर पंचमहाभुतांनी बनलेले आहे याला चालविणारा वेगळाच कुणीतरी आहे. मी वेडा, उन्मत, मूर्खाप्रमाणे आपल्या स्थितीत असतो. मला शिक्षा करून आपल्याला काय मिळणार. मला शिक्षा करणे म्हणजे दळलेले पीठ पुन्हा दळण्यासारखेच नाही का? त्यामुळे ज्ञानीजन अशा प्रकारच्या गोष्टी करीत नाहीत. असे उत्तर दिले.
राजा सुद्धा धर्म वत्सल असल्याने तत्त्वज्ञानाचा पूर्ण अधिकारी होता. जड भरताचे हे बोलणे ऐकून तो पालखीतून उतरला व जडभरताचे पाय धरून क्षमा मागून म्हणाला “आपण जानवेधारी आहात म्हणजे ब्राह्मण दिसता. आपण गुप्तपणे वावरणारे कोणी महात्मे आहात का? मला अन्य कोणत्याही देव अथवा दंडाची भीती नाही मात्र मी ब्राह्मणाच्या कुळाच्या अपमानाला फार भितो. आपल्या योगयुक्त वाक्यांचा बुद्धीने विचार करून सुद्धा माझा संदेश दूर होत नाही. हे दीनबंधू राजेपणाच्या अभिमानाने उन्मत्त होऊन मी आपल्यासारख्या श्रेष्ठ साधूची अवज्ञा केली आहे. आपण आता माझ्यावर कृपादृष्टी करावी की, जेणेकरून मी या अपराधातून मुक्त होईल.
तेव्हा जड भरताने राजाला मनाला काबूत करण्याचा व मायेच्या संसार चक्रातून मुक्त होण्यासंबंधी उपदेश दिला. या जड भरताचे चरित्र जो कोणी ऐकतो, इतरांना ऐकवतो, त्याच्या सर्व इच्छा पूर्ण होतात, असे भागवतात म्हटले आहे.