स्टॉप लॉस...

  24

गुरुनाथ तेंडुलकर


एक सत्यघटना सांगतो.
मी कॉलेजमध्ये असताना प्रमोद नावाचा एक हुशार विद्यार्थी माझा वर्गमित्र होता. माझ्यासारखाच सर्वसामान्य कनिष्ठ मध्यमवर्गीय किंवा गरीब घरातून वाढलेल्या मुलांचा कॉलेजमध्ये एक ग्रुप तयार झाला होता. त्या ग्रुपमध्ये, घरची परिस्थिती बेताची असलेले पण शिक्षणाची आवड असणारे आम्ही सर्वचजण स्कॉलरशिपवर शिकणारे होतो. आम्ही बीएस्सीच्या शेवटच्या वर्षाला होतो. अभ्यास करून, चांगले मार्क मिळवून पुढे एमएस्सी करायचं किंवा फार्मासी अथवा तत्सम शाखेत प्रवेश घेऊन पुढे करिअर करायची स्वप्नं आम्ही पाहत होतो. स्वप्नं पूर्ण करण्यासाठी वेळापत्रक ठरवून अभ्यास करत होतो. घरच्या गरीब परिस्थितीवर मात करण्याचा हाच एकमेव उपाय होता.


अशावेळी हा आमचा मित्र-प्रमोद, रिया नावाच्या एका श्रीमंत आणि सुंदर मुलीच्या प्रेमात पडला. रिया आमच्याच कॉलेजमध्ये, पण आर्ट्सला शिकणारी मुलगी होती. तिच्या वडिलांचा कसलासा व्यवसाय होता त्याशिवाय ते राजकारणातही सक्रिय होते. कॉलेजच्या गॅदरिंगच्या निमित्तानं अनेक मुला-मुलींची ओळख होते तशी प्रमोद आणि रियाची ओळख झाली. संभाषण झालं. एकत्र उठबस झाली.


रिया दिसायला खूपच सुंदर होती. गोरटेली, गोबऱ्या गालांची, कुरळ्या केसांची... प्रमोद मात्र दिसायला सर्वसामान्यच होता. चाळीत राहणारा, गिरणी कामगाराचा मुलगा. सामान्य रूप, सामान्य राहणीमान. श्रीमंतीत वाढलेली रिया स्टाईलमध्ये वावरायची. गालात जीभ घोळवत लाडेलाडे बोलायची. गालाला खळ्या पाडून डोळे मिचकावत हसायची. भारीतले कपडे, महागडे परफ्युम वापरायची.


रियाशी ओळख झाली आणि प्रमोद तिच्या प्रेमातच पडला. तीदेखील आपल्या प्रेमात पडली आहे असा गैरसमज करून बसला... आणि पुढे...
दररोज घरून डबा आणणारे, अन् कॉलेजच्या कॅण्टिनमध्ये कटिंग चहा पिणाऱ्या आमच्यापैकी असणारा प्रमोद त्या रियाला घेऊन चक्क बाहेर हॉटेलमध्ये जाऊ लागला. ती मुलगी असल्यामुळे तिनं बिल दिलं तर कसं चालेल असा विचार करून खिशाला न परवडणारं ज्यूसचं महागडं बील भरू लागला. स्वतः सायन्सला असूनही तासनतास तिच्यासाठी लायब्ररीत बसून आर्ट्सच्या नोट्स काढून तिला देऊ लागला. साहजिकच स्वतःच्या अभ्यासाकडे दुर्लक्ष झाल्यामुळे टर्म परीक्षेत दोन विषयांत तो चक्क नापास झाला. त्यामुळे स्कॉलरशिप बंद झाली.


रिया त्याला फसवत नव्हती पण तोच स्वतः तिच्या प्रेमात पडल्यामुळे फसत होता. स्वतःला फसवत होता. एकदा ती त्याला तिच्या घरी घेऊन गेली.‘माझा मित्र’ अशी घरच्यांशी ओळख करून दिली. तिच्या आई-वडिलांनी सहज करतात तशी प्रमोदची विचारपूस केली. त्याला काहीबाही खाऊ घातलं. प्रमोद अधिकच हुरळला.


त्या दिवसापासून प्रमोदने रियाच्या घरातली कामं देखील करायला सुरुवात केली. तिच्या घरच्या कुत्र्याला दवाखान्यात घेऊन जाताना कुणाची सोबत हवीय... प्रमोद हजर. तिच्या घरी कसलंसं फंक्शन आहे. आदल्या दिवसापासून प्रमोद हजर... तिच्या आईला कोणत्या तरी नाटकाची तिकिटं हवी आहेत. हा सकाळी ७ वाजता थिएटरवर रांगेत उभा... आम्ही मित्रांनी परोपरीनं समजावून सांगितलं. ‘प्रमोद, अरे ती मुलगी तुला फक्त वापरतेय रे... हे प्रेम वगैरे काही नाहीये.’ प्रमोदची थोरली बहीण समंजस होती. आम्ही सर्व मित्रदेखील तिला ‘ताई’ म्हणायचो. ताईनं देखील प्रमोदची कानउघाडणी केली. ‘तुला जर खरोखरच रियाला मिळवायची असेल, तर त्यासाठी तुला चांगलं शिक्षण घेऊन, स्वतःची सध्याची आर्थिक परिस्थिती सुधारून नंतरच तिला मागणी घाल.’


पण हा पठ्या कुणाचंच ऐकायला तयार नव्हता. अशातच त्या मुलीचे आजोबा आजारी पडले. त्यांना हॉस्पिटलमध्ये रात्रीच्या वेळी सोबत म्हणून कुणीतरी हवं विश्वासू आणि हक्काचं माणूस हवं होतं. कुणीही न सांगता प्रमोदनं ही जबाबदारी स्वतःच्या डोक्यावर घेतली. ज्यावेळी आम्ही इतर सर्व मित्र रात्रीचा दिवस करून अभ्यासात मग्न होतो, त्यावेळी हा प्रेमदिवाना प्रमोद त्याच्या मजनूच्या आजोबांच्या सोबतीला त्यांची सेवा करत बसला होता.


परिणामी... प्रमोद बी.एस्सीला चक्क नापास झाला. त्याचं कॉलेज बंद झालं. एवढं करूनही त्याचे डोळे उघडले नाहीत. प्रमोदचे डोळे उघडले ते ज्यावेळी रियाचा आईनं प्रमोदला रियाचं लग्न ठरल्याचं सांगितलं त्यानंतरच... रियाचं लग्न तिच्याच तोलामोलाच्या एका मुलाबरोबर ठरलं होतं. रियाचा होणारा नवरा तिचा आत्तेभाऊच होता. लहानपणापासून दोघं एकमेकांना ओळखत होते. तो चांगला शिकला सवरलेला होता. चार्टर्ड अकाउंटंटची परीक्षा पास करून पुढे लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्सचा पदवीधर होता. लंडनच्याच एका बँकेत उच्चपदावर अधिकारी म्हणून कार्यरत होता. लग्नानंतर रियादेखील लंडनलाच स्थायिक होणार होती...
‘आमच्या रियाच्या लग्नाच्या तयारीसाठी तुझी खूप मदत लागणार रे.’ असंही रियाच्या आईनं प्रमोदला हसत हसत सांगितलं.
प्रमोदनं ही बातमी आम्हा मित्रांना सांगितली आणि ढसाढसा रडला. आम्हाला या बातमीचं काहीच वाटलं नाही. कारण प्रमोद कोणत्याही कोनातून रियासाठी योग्य नव्हताच. त्याचं प्रेम एकतर्फीच होतं. पण तो मात्र रियादेखील आपल्यावर प्रेम करतेय या भ्रमात वावरत होता.


रियाचं लग्न ठरलं हा प्रमोदसाठी मोठाच धक्का होता. त्यातून तो स्वतःला सावरू शकला नाही आणि... आणि त्याने बॉम्बे सेंट्रल आणि महालक्ष्मी स्टेशनच्या मध्ये रुळावरून चालत चालत त्याने फास्ट लोकल रेल्वेखाली स्वतःला झोकून दिलं... आयुष्य संपवलं... दोष कुणाचा? रियाचा? की तिच्या आईवडिलांचा? की त्याला नीट समजावून सांगायला कमी पडलेल्या आम्हा मित्रांचा? दोष कुणाचाही नव्हता. दोष होता फक्त आणि फक्त प्रमोदचाच. त्याच्या गैरसमजूतीचा. त्याच्या अहंकाराचा. त्याच्या मोहाचा... त्याच्या लोभाचा...
आपल्याला रिया आवडली पण आपण रियाला आवडलोय का? आपण ज्या दृष्टीनं तिच्याकडे बघतोय त्याच दृष्टीनं ती देखील आपल्याकडे बघतेय का? याचा त्याने कधीच विचार केला नव्हता. आपली सध्याची योग्यता, आपली कुवत, आपली लायकी न ओळखता ज्याने रियासारख्या न झेपणाऱ्या मुलीवर एकतर्फी प्रेम केलं त्या प्रमोदला काय म्हणायचं...?


संस्कृत भाषेत एक सुभाषित आहे.
उद्यमं साहसं धैर्यं बुद्धि शक्ती पराक्रमः ।
षडेश् यत्र वर्तंन्ते तत्र देव सहाय्यकृत ।।
भावार्थ ः उद्योग, साहस, धैर्य, बुद्धी, शक्ती आणि पराक्रम हे सहा गुण जिथे एकत्र नांदतात त्याठिकाणी देव सहाय्य करतो.
‘धैर्यानं आणि जिद्दीनं काम करणाऱ्याला परमेश्वर सहाय्य करतो.’ हे वचन आपण अनेकदा ऐकलं वाचलं आहे. तशा प्रकारचे दाखले देणारी अनेक उदाहरणं सांगितली जातात. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीवर मात करून यश संपादन केलेल्या माणसांचे अनेक प्रेरक प्रसंग आपण वाचलेले असतात... पण...


त्यांना ते यश का मिळालं याची जर नेमकी कारणमीमांसा केली तर त्यात वर उल्लेख केलेल्या श्लोकातले सगळेच्या सगळे म्हणजे सहाही घटक त्यांच्या कार्यात एकत्रित सामाविष्ट असतात असं आढळेल. परंतु खोट्या जिद्दीपायी आणि आततायी अट्टाहासापायी ज्यावेळी सत्यानाश होतो त्यावेळी वरील सहापैकी एक घटक मात्र उपस्थित नसतो. तो घटक म्हणजे बुद्धी...
माणसं बुद्धीने विचार न करता केवळ आणि केवळ भावनेनं विचार करतात. आपण हातात घेतलंलं काम पूर्णत्वाला नेण्यासाठी वाटेत काय काय अडथळे येऊ शकतात आणि ते सगळे अडथळे पार करण्याची आपली कुवत आहे का? याचाही विचार करायला हवाच की, मुळातच आपण घेतलेला निर्णय योग्य आहे का? हे तपासून बघायला हवं.
‘मला वाटलं हे असं होईल.’ म्हणजे `ते तस्संच होणार.’ या खोट्या आशेवर राहून वेळ पैसा आणि परिश्रम वाया घालवू नयेत असं मला वाटतं. शेअर बाजारात गुंतवणूक करणाऱ्यांसाठी एक महत्वाचा घटक असतो ‘स्टॉप लॉस.’ एखाद्या शेअरमध्ये जेव्हा आपण पैसे गुंतवतो त्यावेळी जर तो शेअरचा दर एका विशिष्ट किंमतीच्या खाली गेल्यास त्यातून ताबडतोब बाहेर पडायचं असतं. जेवढे पैसे गुंतवले त्यापैकी जो काही ‘लॉस.` झाला तो स्वीकारून उरलेली गुंतवणूक वाचवायची असते. पुढे होणारा अधिकचा तोटा थांबवायचा असतो. त्यालाच ‘स्टॉप लॉस’ असं म्हणतात.


यस बँकेचा शेअर चारशे रुपयांना घेतल्यानंतर ज्यांनी स्टॉपलॉस ठेवून तो तीनशे ऐंशी रुपयांना विकला त्यांना वीस रुपये तोटा झाला. पण निदान तीनशे ऐंशी रुपये तरी मिळाले. आजच्या घटकेला वीस-बावीस रुपयांच्या आसपास रेंगाळतोय. काही कंपन्या तर स्टॉक एक्सचेंजवरून देखील उडाल्या. म्हणजे त्यांच्या शेअरचा भाव शून्य झाला. सगळंच संपलं कारण शेअर घेतल्यानंतर तो वाढणारच अशी आशा ठेवून तो घेतलेला असतो आणि जर त्याचा भाव खाली आला तर तो पुन्हा कधी ना कधी तरी वरती येईल अशी खोटी आशा ठेवून आपण वावरत असतो. शेअर बाजारात काम करताना स्टॉप लॉस ठेवूनच काम करावं लागतं.


आयुष्यात वावरताना देखील आपल्याला असे ‘स्टॉप लॉस’ ठेवावेच लागतात. एका विशिष्ट मर्यादेनंतर ते कार्य किंवा त्या व्यक्तीच्या मागे लागणं थांबवणं हाच शहाणपणा ठरतो. काही गोष्टी अनेक प्रकारचे प्रयत्न करून देखील साध्य होत नाहीत, त्या गोष्टी सोडून देणं जमायला हवं. ‘या जगात अशक्य असं काहीच नाही.’ हे वाक्य कितीही खरं असलं तरी प्रत्येकाला प्रत्येक गोष्ट शक्य नसते. भावना आणि कल्पना याहून वास्तव जग हे फार वेगळं असतं. थंड डोक्यानं आणि निश्चल बुद्धीनं विचारपूर्वक आपल्याला नेमकं काय अशक्य आहे हे एकदा ध्यानात आलं की तिथून माघार घेऊन आपला वेळ, पैसा आणि परिश्रम इतरत्र वळवता येतात. त्यातून दुसऱ्या क्षेत्रात किंवा दुसऱ्या व्यक्तीबरोबर छान यशस्वी होता येतं. त्यासाठीच वर उल्लेख केलेला ‘स्टॉप लॉस’ महत्वाचा.

Comments
Add Comment

कधी न कळलेला ‘बाबा’

आयुष्यातल्या छोट्या-मोठ्या क्षणांचा आनंद साजरा करण्यासाठी आपण अनेक नवनवीन डेज साजरे करतो, मग तो मर्दस डे असो. वा

ग्लॅमरस नायिका हंसा वाडकर

सतीश पाटणकर चित्रपटसृष्टीतील पहिली ग्लॅमरस नायिका हंसा वाडकर. २४ जानेवारी १९२३ साली जन्मलेल्या हंसा वाडकर

शाळा नव्याने सुरू होताना...

डाॅ. स्वाती गानू लवकरच शाळा सुरू होतील. मुलांना नवे वर्ग, नव्या मित्रमैत्रिणी, नवीन शिक्षक यांच्याबरोबर नवीन

‘रहने दे अभी थोडासा भरम...’

श्रीनिवास बेलसरे सुंदरलाल नहाटा यांनी १९६७ साली जितेंद्र आणि बबिताला घेऊन ‘फर्ज’ काढला. तो सिनेमा मुळात

जडभरताची कथा

भालचंद्र ठोंबरे श्रीमद्भागवतानुसार ऋषभ देवाचा पुत्र भरत अतिशय भगवदभक्त होता. तसेच तो बहुश्रुतही होता. अनेक

रिल्स स्वैराचाराला आमंत्रण देतायत का...?

मंदार चोरगे सोशल मीडियावर गल्लोगल्ली नितीमूल्यांची झाली पायमल्ली मांडला अब्रूचा हा बाजार सारा प्रसिद्धीच्या