
डी. प्रभाकर
शिवसेना उबाठाचे पक्षप्रमुख उद्धव आणि मनसेचे अध्यक्ष राज हे ठाकरे बंधू एकत्र येणार याबाबत प्रसारमाध्यमांमध्ये जोरदार चर्चा सुरू आहे. त्यातच उद्धव ठाकरे यांनी जे महाराष्ट्रातील जनतेच्या मनात आहे तेच होईल अशा प्रकारचे विधान केले. माध्यमांकडून ठाकरे बंधू एकत्र येण्याबाबत होणाऱ्या बातम्या प्रसिद्ध केल्या जात असतानाच उबाठा शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या वृत्तपत्रात पहिल्याच पानावर राज आणि उद्धव एकत्र असलेले फोटोसह बातमी झळकल्याने या एकत्र येण्याच्या शिळ्या कढीला ऊत आणण्याचा प्रयत्न जोरात झाला आहे; परंतु कोणत्याही परिस्थितीत राज आणि उद्धव हे एकत्र येणे अशक्यच असून दोन्ही नेत्यांचे विरुद्ध स्वभाव हेच याला कारणीभूत ठरणार आहेत. मुळातच उद्धव ठाकरे यांच्याकडून आजवर झालेल्या दगाफटक्यामुळे राज यांचाच भावावर विश्वास नाही. आज पडत्या वेळेत उद्धव ठाकरे यांना मनसेची आणि राज ठाकरे यांची आठवण होत असली तरी त्यात स्वार्थ भावना आहे, याची पुरती कल्पना मनसे आणि त्यांचे पक्षप्रमुख राज ठाकरे यांना असल्याने भलेही उबाठा शिवसेनावाले युतीसाठी मनसेशी जवळीक साधण्याचा प्रयत्न करत असले तरी ते टाळी देण्याची चूक करणार नाहीत.
मनसे आणि उबाठा शिवसेनेची युती व्हावी अशा प्रकारच्या बातम्या मागील काही दिवसांपासून माध्यमांमध्ये झळकत असल्या तरी प्रत्यक्षात मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना मात्र कोणतेही स्वारस्य नसल्याचे दिसून येत आहे. उद्धव ठाकरे यांच्यामुळे राज ठाकरे यांनी पक्ष सोडला, त्यानंतर पक्ष वाढल्यानंतर आपले नगरसेवक चोरून नेत पक्ष संपवण्याचा प्रयत्न केला. एवढंच नाही तर त्यानंतर उबाठाचे युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी मनसेचा उल्लेख संपलेला पक्ष असा केला. त्यापूर्वी मागील निवडणुकीत मनसेला टाळी देण्यासाठी हात पुढे करून शेवटच्या दिवसापर्यंत उबाठाने ताटकळत ठेवले होते. त्यामुळे मनसेला स्वबळावर निवडणूक लढवावी लागली. त्यामुळे पक्ष सोडून नवीन पक्ष काढल्यानंतर उद्धव ठाकरेंकडून दगाफटकाच झाल्याने कोणत्याही परिस्थितीत उबाठावर राज ठाकरे हे विश्वास ठेवण्याच्या मनस्थितीत नाहीत. त्यामुळे माध्यमांनी किती बातम्या प्रसिद्ध केल्या, दाखवल्या तरीही प्रत्यक्षात मनसे अध्यक्ष राज ठाकरे जोवर काही बोलत नाहीत, भूमिका मांडत नाहीत, तोवर कितीही बातम्या आल्या तरी विश्वास ठेवू नये अशा प्रकारे मनसेचे नेते हे इतर पदाधिकारी व मनसैनिकांना सांगताना दिसत आहेत.
मनसेच्या एका वरिष्ठ नेत्याच्या म्हणण्यानुसार, मुंबईत मनसे आणि उबाठाची युती व्हावी अशी इच्छा आहे, मग लोकसभा आणि विधानसभेत आघाडीत उबाठाने निवडणूक लढवली त्याचे काय? ते महापालिका निवडणूक जर आघाडीत लढणार असतील तर मनसे त्यांच्यासोबत जाण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. त्यांना आधी आघाडीतून बाहेर पडावे लागेल आणि आघाडीतून बाहेर पडल्याची उबाठाने जाहीर घोषणा केल्यानंतरच मनसेसोबतच्या युतीची चर्चा होऊ शकते, पण तोपर्यंत ही सर्व चर्चा निरर्थक आहे.
जर उद्धव ठाकरे मनसेला भाजपाशी असलेले नाते आधी तोडा असे सांगत असतील, तर त्यांना आधी आघाडीसोबतच्या पक्षासोबतचे नाते तोडावे लागेल, तेव्हाच युतीचा विचार होऊ शकतो. विशेष म्हणजे भाजपा आणि शिवसेना युतीची मुंबईमध्ये चांगल्या प्रकारे ताकद आहे. मनसेची जी काही ताकद आहे त्याचा वापर करण्याचा प्रयत्न उबाठाचा आहे. पण उबाठाच्या ताकदीचा मनसेला काय फायदा होईल हा प्रश्न आहे. उबाठा मनसेसोबत युती करेल आणि मनसेची ताकद वापरून मनसेच्याच उमेदवारांना पाडण्याचा प्रयत्न करेल, याची शक्यताही तेवढीच आहे, त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत उद्धव ठाकरेंवर राजसाहेबांचाच काय तर मनसेच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचाच विश्वास नाही असेही बोलले जात आहे. जर हे मनसेच्या पदाधिकाऱ्यांच्या मनात असेल तर उबाठा सोबत युती झाल्यास मनसेतील अनेक पदाधिकारी हे शिवसेना आणि भाजपात प्रवेश करतील. जेव्हा उबाठाच्या कार्यपद्धतीला कंटाळून मनसेत प्रवेश केला आणि पुन्हा त्यांच्यासोबत जाऊन काम करायचे हेच मुळी मनसेच्या पदाधिकाऱ्यांना मान्य नाही. उबाठासोबतची युती ही कोणत्याही दृष्टिकोनातून फायदेशीर नसून भविष्यात ही निवडणूक झाल्यावर मनसेला बाजूला करायला उबाठा कमी करणार नाही, याची कल्पना असल्याने युती ही अमान्य ठरणारीच आहे.
उबाठा शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्याच्या म्हणण्यानुसार, मनसेसोबत युती असणे आणि राज ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या विचारांची शिवसेना वाढवण्यासाठी पक्षाचे विलीनीकरण करणे दोन वेगळ्या बाबी आहेत. राज ठाकरे हे कधीही मनसे पक्ष शिवसेनेसोबत विलीनीकरण करणार नाहीत आणि युतीचे म्हणाल, तर आमच्यापेक्षा मनसेला युतीची जास्त गरज आहे. उबाठा शिवसेना आघाडीत ही निवडणूक लढवणार आहे, पण पुढे काय होईल हे आता माहीत नाही, पण आमची आघाडी आहे. त्यामुळे आघाडीत मनसेला घेतल्यास काँग्रेस, शप राष्ट्रवादी काँग्रेस आणि मनसेला जागा सोडाव्या लागतील. त्यामुळे उबाठा शिवसेनेच्या वाट्याला केवळ १०० जागा उरणार असतील, तर ते पक्षाच्या दृष्टिकोनातून योग्य नाही. त्यातच आघाडीत उबाठाच्या वाट्याला येणाऱ्या जागेतील वाट्यातून काही जागा मनसेला सोडाव्या लागतील. त्यामुळे उबाठाला कमी जागा लढवाव्या लागतील आणि याचे नुकसान उबाठा पक्षाला होईल.
त्यामुळे उबाठा शिवसेना पक्ष म्हणून आघाडीसोबतच ही निवडणूक लढवावी अशीच कार्यकर्त्यांची भावना आहे. आघाडी तोडून मनसेसोबत युती केल्यास उबाठा शिवसेना म्हणून आमच्या पक्षाचे मोठे नुकसान होईल. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत आघाडीचा फायदा आमच्या पक्षाला झाला आहे, असे असताना मनसेसोबत युती करण्यासाठी आघाडी तोडावी हे पक्षासाठी घातक आहे. त्यामुळे माध्यमे केवळ टीआरपीकरिता या बातम्या देत असले तरी प्रत्यक्षात हे शक्य नाही आणि लोकसभा आणि विधानसभा आम्ही आघाडीसोबत लढलो आणि महापालिकेसाठी मनसेसोबत गेल्यास लोकांचाही विश्वास उडेल तसेच उद्धव ठाकरेंवर जे दगाफटका केल्याचे आरोप होतात, तेही दृढ होतील असेही उबाठा शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्यांना वाटत आहे.
मात्र, मनसे पक्ष हा उबाठासोबत जाण्यापेक्षा शिवसेना पक्षासोबत जाण्याचा मार्ग स्वीकारेल. शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे हे आजही राज ठाकरे यांचा आदर करत आहेत आणि स्वर्गीय शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे वारसदार म्हणून ते राज यांच्याकडे पाहत आहेत. तसेच बाळासाहेबांच्या विचारांवर चालणारा शिवसेना पक्ष असल्याने राज शिवसेनेसोबत जाणे पसंद करतील. राज ठाकरे यांच्या स्थानिक भूमिपुत्र आणि हिंदुत्व या दोन्ही मुद्द्यांच्या विरोधात उबाठा असल्याने तसेच आघाडीतील घटक पक्ष असल्याने राज यांचे मन त्यांच्यासोबत जाण्यास धजावणार नाही. त्यामुळे मनसेसोबत आल्यास पक्षाला नवसंजीवनी मिळेल या भावनेने राज ठाकरे यांना आपल्यासोबत घेण्यासाठी जोरदार प्रयत्न होत असतील आणि माध्यमे टीआरपीसाठी बातम्या चालवत असतील, तरीही प्रत्यक्षात निवडणुकीच्या वेळी चित्र वेगळे दिसेल यात कोणतीच शंका नसावी.
प्रसारमाध्यमे केवळ टीआरपीकरिता या बातम्या देत असले तरी कोणत्याही परिस्थितीत राज आणि उद्धव ठाकरे एकत्र येणे शक्य नाही. मुळातच उद्धव ठाकरे यांच्याकडून आजवर झालेल्या दगाफटक्यामुळे राज यांचाच भावावर विश्वास नाही. आज पडत्या वेळेत उद्धव ठाकरे यांना मनसेची आणि राज ठाकरे यांची आठवण होत असली तरी त्यात स्वार्थ भावना आहे, याची पुरती कल्पना मनसे आणि त्यांचे पक्षप्रमुख राज ठाकरे यांना असल्याने ते त्यांच्यासोबत जाण्यास धजावणार नाहीत.