Sunday, June 15, 2025

आनंदाने जगावे!

आनंदाने जगावे!

रमेश तांबे


एक होती बाग. बागेत खूप फुले फुलली होती. गुलाब, झेंडू, अस्टर, चाफा, सूर्यफूल, मोगरा, जाई-जुई आणि पारिजात! पाण्यातले कमळ आणि झाडावरचे लालभडक गुलमोहर! असंख्य फुले पण वेगवेगळी! त्यांचा रंग वेगळा, आकार वेगळा. कुणाला सुगंध तर कुणाला रंग. कोणीच एक दुसऱ्या सारखा नाही. तरी आनंदी तरी समाधानी. बागेत फुलपाखरे, भुंगे, चतूर होते. ते फुलातील मकरंद खात होते. त्यांच्यात मध खाण्यावरून भांडणं नव्हती की रुसवे फुगवे नव्हते.
या बागेतल्या एका बाकड्यावर नेहा कधीपासून बसली होती. आजूबाजूला अनेक लहान मुलं-मुली खेळत होती. आजी-आजोबा बसले होते. कोणी बागेला फेऱ्या मारत होते. पण या कुणाकडेही नेहाचे लक्ष नव्हते. ती एकटीच शून्यात बघितल्यासारखी निर्विकार होती.


तेवढ्यात एक फुलपाखरू पिवळ्या जांभळ्या रंग छटांचं नेहाच्या हातावर येऊन बसलं. तेव्हा नेहा थोडी दचकलीच. ती फुलपाखराला झटकणार तोच फुलपाखरू चक्क तिच्याशी बोलू लागलं. “काय नेहा ताई, अशा शांत का बसल्या तुम्ही? तिकडे बघा किती मुलं खेळत आहेत. किती रंगीबेरंगी फुलं फुलली आहेत. किती भुंगे, चतूर, फुलपाखरे मजा घेत आहेत. छान थंडगार वारा सुटलाय. त्या सर्वांचा आनंद घेण्याऐवजी तू तर अगदी गप्प बसली आहेे. कसले दुःख आहे, कसला राग आहे तुझ्या मनात सांग मला सांग ना!


तशी नेहा बोलू लागली, “माझ्या मैत्रिणी छान छान कपडे घालतात. नवनवीन पदार्थ रोज डब्यात आणतात. स्वतःच्या गाडीने शाळेत येतात. त्यांच्यासोबत रोज त्यांची आई येते. पण माझ्याकडे मात्र काहीच नाही” असं म्हणून ती रडू लागली. फुलपाखरू म्हणाले, “नेहाताई अगं अशी रडू नकोस. मी काय सांगतो ते ऐक. नेहाने डोळे पुसले आणि फुलपाखरू काय सांगते ते ऐकू लागली. अगं नेहा तो गुलाब बघ. त्याचा लाल गुलाबी रंग किती छान आहे ना. हो पण त्याच्या अंगावर टोकदार काटे आहेत बरं का! ते सूर्यफूल बघ, केवढे मोठे पिवळेधमक अगदी सूर्यासारखे दिसते ना! पण सूर्य मावळले की बिचारे मान खाली घालून बसते. ते गुलमोहराचे झाड बघ, केवढे मोठे आणि त्याची ती लाल भडक फुले, त्याच्याच शेजारी ते जास्वंदाचे फुलझाड, तेही लालसर रंगाचे. पण जास्वंदाची जागा गणपती बाप्पाच्या जवळ आणि बिचारा गुलमोहर गळून पडतो मातीत! तुझ्या लक्षात येते का मी काय म्हणतो ते? अगं नेहा इथे कोणीच परिपूर्ण नाही. कुणाला रंग आहे, तर कुणाला गंध नाही. कुणाला रंग गंधांसोबत काटेदेखील आहेत. कुणाला कायमच पाण्यात राहावे लागते, तर कुणाला अगदी कमी पाण्यावर आयुष्य काढावं लागतं. प्रत्येकाचं आयुष्य किती वेगळं आहे बघ! तरी कोणी दुःखी नाही. निराश नाही की कसली तक्रार नाही. प्रत्येक जण आनंदात!


आपल्याकडे जे आहे त्यात आनंद मानावा. उगाच इतर कोणाशी तुलना करू नये हे लक्षात ठेव. स्वतःकडे बघ. तुझ्याकडे खूप छान छान गोष्टी आहेत त्या इतरांकडे नाही. म्हणून सांगतो, चल उठ, आनंदाने राहा, मजा कर असं म्हणून फुलपाखरू उडून गेलं. मग नेहादेखील निराशा झटकून बागेतल्या मुलांबरोबर आनंदाने खेळू, नाचू, बागडू लागली.

Comments
Add Comment