Sunday, June 15, 2025

रिल्स स्वैराचाराला आमंत्रण देतायत का...?

रिल्स स्वैराचाराला आमंत्रण देतायत का...?

मंदार चोरगे


सोशल मीडियावर गल्लोगल्ली
नितीमूल्यांची झाली पायमल्ली
मांडला अब्रूचा हा बाजार सारा
प्रसिद्धीच्या हव्यासाचा
हा खेळ न्यारा...

आजवर सोशल मीडियाकडे एकविसाव्या शतकातील सर्वांत महत्त्वाची क्रांती म्हणून पहिले जात होते. पण आज दुर्दैवाने सोशल मीडियाचा वापर केवळ भल्यासाठी होताना दिसत नाही ही क्रांती दुधारी आहे असे म्हणावे लागेल. त्याचा सुयोग वापर झाल्यास विधायक गोष्टी देखील सहज साध्य होऊ शकतात. गेल्या काही वर्षांमध्ये सोशल मीडियाचे दुष्परिणाम व उदाहरणे वाढत चालली आहेत. केवळ तंत्रज्ञानाच्या दृष्टीनेच नव्हे तर अगदी अबाल वृद्धांपासून सर्वसामान्यांच्या हातात अभिव्यक्तीचं स्वातंत्र्य देणारं सुलभ माध्यम असल्याने त्याचं लोण झपाट्याने देशोदेशांमध्ये अगदी खेडोपाड्यांमध्येही पसरलं आहे.
स्वैराचाराचे हे मोकळे रान
कित्येकांनी गमावला आपला प्राण
रिल्सची जडली फार वाईट नशा
अपंगत्वाने झाली कित्येकांची दुर्दशा...


आज या आभासी जगात प्रसिद्धी व पैशाच्या हव्यासापोटी तरुणाईने आपली नितीमूल्ये, संस्कृती, परंपरा यांना पायदळी तुडवून सोशल मीडियावर आपले अंग प्रदर्शन मांडले आहे. चार वर्षांपूर्वी ‘टिकटॉक’वर बंदी घातल्या नंतर निर्माण झालेल्या पोकळीचा फायदा घेण्यासाठी इन्स्टाग्रामने रील्स या संकल्पनेला जन्म दिला. आज या रिल्सनी तरुण पिढीवर अक्षरश: गारुड घातले आहे. अगदी घरातील लहान बाळाला जेवण भरविण्यापासून झोपेपर्यंत त्याच्या सोबतीला मोबाइल असल्यामुळे त्यातच येत्या पिढीचे विश्व सामावलेले दिसून येते.


सध्या अनेक पालक देखील टेलिव्हिजनवरील मालिकांना बळी पडल्यामुळे त्यांचे अनुकरण त्यांच्या कौटुंबिक जीवनात दिसून येते. शिवाय सध्याच्या धावपळीच्या युगात पालकांचे पाल्याकडील दुर्लक्ष, बाहेरगावी शिक्षणासाठी कुटुंबापासून लांब असलेले विद्यार्थी विद्यार्थिनी यांना कोणाचा धाक किंवा भय राहिले नसल्यामुळे हा सोशल मीडियावरील स्वैराचार दिवसेंदिवस वाढत चाललेला आहे. सध्या नवनवीन शैली (ट्रेंड)च्या नावाखाली अगदी सकाळच्या व्यायाम, योगापासून ते रात्री झोपेपर्यंत अनेक कृतींचे भडक चित्रीकरण असणाऱ्या रिल्स सोशल मीडियाच्या माध्यमातून पाहायला मिळतात. रिल्स पाहणे आणि रिल्स बनवणे हे एक प्रकारचे व्यसनच काळाच्या ओघात सर्वांना जडत आहे. त्याचा मानवी जीवनावर आरोग्यावर विपरीत परिणाम होताना देखील पाहायला मिळतो. माणगावच्या कुंभे येथील धबधब्याजवळ रिल्स बनवताना पाय घसरून ३०० फूट खोल दरीत पडल्याने एका तरुणीला आला जीव गमवावा लागला. अशा अनेक घटना आपल्याला सोशल मिडीयामार्फतच पाहायला मिळतात. केवळ प्रसिद्धीसाठी रिल्स बनवणे अनेकांच्या जीवावर बेतलेले आहे, तर अनेकांना शारीरिक तर काहींना मानसिक अपंगत्वास सामोरे जावे लागले आहे. हे जरी सत्य असले तरी त्याकडे दुर्लक्ष करून खास करून पर्यटनस्थळे, धबधबे, दरी, डोंगर रस्ते, रेल्वे, रेल्वे महामार्ग अशा ठिकाणी काहीतरी स्टंट करायचा किंवा हुल्लडबाजी करून प्रसिद्ध होण्याचे फॅड हल्ली वाढत चाललेले आहे. जन माणसांचा सोशल मीडियावरील मिळणारा उत्स्फूर्त प्रतिसाद मित्र परिवाराचे समर्थन, पालकांचे दुर्लक्ष, कोरोना महामारीच्या काळापासून सुरू झालेला ऑनलाईन अभ्यासाच्या नावाखाली विद्यार्थ्यांचा मोबाइलचा वाढता वापर या गोष्टी स्वैराचाराला खतपाणी घालत आहेत. सोशल मीडिया व्यासपीठावरून मिळणारी प्रसिद्धी ही फार काळ टिकणारी नसते हे युवा वर्गाच्या निदर्शनास आणून देणे गरजेचे आहे. २०१८ मध्ये प्रिया प्रकाश वारीयर या अभिनेत्रीचा ओरू अदार लव या चित्रपटातील एका २८ सेकंदाच्या रिल्सला जवळपास १ कोटींहून अधिक हिट्स प्राप्त झाले आणि ती प्रसिद्धीस आली. त्या पाठोपाठ २०१९ मध्ये रेल्वे स्टेशनवर भीक मागता मागता गाणे म्हणणारी राणू मंडल सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या तिच्या एका गाण्याच्या व्हीडिओमुळे रातोरात प्रसिद्धीच्या झोतात आली; परंतु आज सोशल मीडियावर त्यांचा बोलबाला अजिबात पाहायला मिळत नाही. जसं जितक्या लवकर या कलाकारांना प्रसिद्धी मिळाली तसंच तितक्याच लवकर ते जनमाणसांच्या विस्मरणात गेल्याचे आपल्यास दिसून येते. ‘यशाला शोर्ट कट नसतो हेच खरं’ सध्या मराठी बिग बॉस या मालिकेमुळे प्रसिद्धीस आलेला अतिशय गरीब कुटुंबातील रिल्सस्टार सुरज चव्हाण हे आत्ताचे ताजे उदाहरण आहे.


ग्रामीण व शहरी भागातील दरी... रिल्सच्या बाबतीत मिटली खरी...
आज घडीला अगदी खेड्यापाड्यांपासून सोशल मीडियावर व्यक्ती आणि विचार स्वातंत्र्याच्या स्वैराचाराने अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. अभिव्यक्ती स्वातंत्र्य हा लोकांचा अधिकार असल्याने सोशल मीडिया कंपन्यांचे यावर म्हणावे तसे निर्बंध अद्याप नाहीत.
खरे पाहता सोशल मीडियाचे हे व्यासपीठ म्हणजे आरसा नसून आपण स्वतःवर रोखलेली एक अनधिकृत बंदूक आहे. ना त्यावर कोणाचे बंधन आहे, ना त्याला कोणता कायदा लागू आहे. ही डिजिटल व्यासपीठं केवळ तीन ते चार अमेरिकन खासगी कंपन्यांच्या मालकीची आहेत. या माध्यमातून या कंपन्या कोट्यवधी रुपये कमवत आहेत. सर्वांत मोठी लोकशाही असलेल्या आपल्या भारत देशात सोशल मीडियासाठी मोठी बाजारपेठ आहे.


कारण भारत लोकसंखेच्या बाबतीत जागतिक क्रमवारीत दुसऱ्या क्रमांकावर आहे. त्यामुळे सोशल मीडिया वापराचे भारतातील लोकांचे प्रमाण आज जगात सर्वाधिक आहे व उत्तरोत्तर ते वाढतच आहे. अशा वेळी जनमाणसांकडे स्वयंशिस्त अपेक्षित आहे. सोशल मीडियावर काय प्रदर्शित करावे, आलेले काय पाहावे, काय वाचावे, काय वाचू नये, कशावर विश्वास ठेवावा आणि कशावर ठेऊ नये, कोण आपल्या भावनांशी खेळ करीत आहे की कोण आपल्याला उत्तेजित करीत आहे हे ओळखण्यासाठी आता तिसरा डोळा हवा असे मला वाटतं.


Comments
Add Comment